श्रवणधारा
श्रवणधारा
त्या दिवशी जेवणानंतर सर्वांनी मिळून महाजन काकांना समजावलं, “बघ, इतक्या वर्षानी तुझं प्रेम तुला परत मिळालंय. म्हणजे तुझ्या समोर आलंय. तुझं आपलं आणि हक्काचं असं कुणी राहिलेलं नाही. त्यांनासुद्धा कुणी नाही असं दिसतंय नाहीतर त्या वृद्धाश्रमात आल्या नसत्या. तू स्वतःहून बोल त्यांच्याशी. त्यांना चांगलं वाटेल. त्या इथं नवीन आहेत. मन रामायला वेळ लागेल. कर विचार.”
महाजन काकांनी विचार केला, मंडळी सांगत होती ते देखील खरंच होतं म्हणा. दोघांच्या आयुष्यात एकाकीपणा अगदी अमावास्येच्या काळ्याकुट्ट अंधारासारखा भरला होता. इतक्या वर्षांनी पहिलं प्रेम समोर येणं हे केवळ योगायोगाने झालं नव्हतं, ती नियतीची एक ठरवलेली गोष्ट होती. आयुष्याच्या शेवटी का असेना दोघांना एकत्र आणून शेवट गोड करण्याची ती दैवी योजना होती. महाजन काकांनी सुधाकाकूंशी आपणहून बोलण्याचं ठरवलं. जवळपास अर्धा तास ते विचार करत अस्वस्थपणे फेर्या मारत होते आणि बाकी काका मंडळी बाकावर बसून त्यांच्या उत्तराची वाट बघत होती. बराच विचार करून महाजन काका बाकासमोर आले आणि काहीशा निर्धाराने म्हणाले, “मी बोलतो. आताच बोलतो.”
किचनमध्ये मदतीसाठी जाण्याची वेळ झाली होती. आज कुणी न बोलवताच चौघंजण किचनकडे जाऊ लागले. इतरांच्या चालण्यात एक उत्साह होता. पण महाजन काका मात्र संमिश्र भावनांनी चालत होते. किचनमध्ये जाताच जोशीकाकू दिसल्या. महाजन काकांनी जोशींकडे एक कटाक्ष टाकला. जोशी समजले, त्यांनी जोशीकाकूंना काहितरी सांगितलं. जोशीकाका आले, त्यांनी महाजन काकांना सांगितलं, “तू बाहेर थांब. आम्ही करतो आज.”
जोशींच्या सांगण्यानुसार महाजन बाहेर थांबले. उगाचच हात मागे बांधून वरती आकाशाकडे बघत फेर्या मारू लागले. पाच दहा मिनिटांनातर एक स्त्री किचनमधून बाहेर आली आणि सरळ मंदिराकडे जाऊ लागली. महाजन काकांनी बघितलं, त्या सुधाकाकू होत्या. त्या महाजन काकांच्या पुढे निघून गेल्या होत्या. मनातलं सर्व बळ एकवटून महाजनकाका म्हणाले, “मी त्या दिवशी आलो होतो. नंतर तुम्ही घर सोडल्यावरसुद्धा आलो होतो. खूप शोधलं तुला. पण तू सापडलीच नाहीस.”
अचानक आलेल्या आवाजाने सुधाकाकू दचकल्या. त्यांनी मागे वळून बघितलं आणि क्षणभर स्तब्ध झाल्या. महाजन काकांना बघून त्यांचा विश्वासच बसत नव्हता. इतक्या वर्षानंतर आणि अशा जागेवर. त्या उद्गारल्या, “अरुण तू?”
“हो सुधा, मी अरुण महाजन.” महाजन काकांना आता बोलणं अवघड होत होतं. सुधा काकूंच्या डोळ्यांतून केव्हाच अश्रु सुरू झाले होते. महाजन काकांनीसुद्धा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते दोघं एकमेकांच्या बाहुपाशात केव्हा विसावले ते त्यांनाच कळलं नाही. भावनांचा आवेग ओसरल्यावर आणि भानावर आल्यावर ते विलग झाले. मग काही वेळ असाच भयाण शांततेत गेला. यावेळी महाजन काकांनी पुढाकार घेत विचारलं, “कुठं होतीस तू इतके दिवस?”
“मी तुझ्या आठवणींत होते.” सुधाकाकू अश्रू पुसत म्हणाल्या. मग परत काही वेळ शांतता पसरली. आपलं दुःख सांगण्यासाठी बळ मिळावं म्हणून सुधाकाकू मनाने तयार होत होत्या. महाजनकाकासुद्धा गप्पच होते. मग मनाची तयारी झाल्यावर सुधाकाकू म्हणल्या, “आपला पेपर संपल्यावर मी घरी गेले तेव्हा घराला कुलूप होते. शेजारी विचारलं तेव्हा समजलं, मी जवळपास पळतच हॉस्पिटल गाठलं. तिथं पोहोचण्याआधीच बाबांनी जग सोडलं होतं. आम्हाला आमच्या जवळचं असं कुणीच नव्हतं. मग आम्ही लगेचच आजोळी राहायला जाण्याचा निर्णय घेतला. इतक्या तडकाफडकी निर्णय घेतला गेला की काही विचार करायला वेळच मिळाला नाही. बाबांचं दुःख आणि तू सोबत नसल्याचं दुःख अशी दोन राक्षसं माझ्या जिवावर उठली होती. अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला. पण आईकडे पाहून ते पाऊल मागे घ्यावं लागलं. पण आता या क्षणाला वाटतंय की बरं झालं मी मृत्युला कवटाळलं नाही, नाहीतर आजचा दिवस पाहिला नसता.”