शिक्षण - जीवन परिवर्तनाचे साधन
शिक्षण - जीवन परिवर्तनाचे साधन
शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. जीवनातील अमुलाग्र बदल फक्त शिक्षण करू शकते. सत्यासाठी आग्रह शिक्षण करते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पोटतिडकीने सांगितले आहे. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले,फातिमा शेख यांना फार कठीण काळात जाणीव झाली. त्यांचा काळ म्हणजे विरोध सहन करण्याचा काळ होता.त्या काळात विरोध सहन करूनसुद्धा शिक्षणाचे ध्येय सोडले नाही. शाहू, फुले, आंबेडकर हे त्रिसूत्र त्या काळात एकत्र आले नसते तर शिक्षणापासून समाज वंचित राहिला असता. त्या काळात समाजाला एकत्र आणून प्रबोधन करण्याचे साधन फक्त शिक्षण होते. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, सुधाकरराव नाईक, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नारायणराव नाईक, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
त्यांच्यासोबत राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्र संतभगवान बाबा यांच्या अनमोल प्रबोधनातून शिक्षणाची तळमळ असायची. वाईट चालीरीती वाईट रुढी परंपरा, अंधश्रद्धा यातून ते घणाघाती प्रहार करत होते. खेड्यापाड्यांमध्ये त्यांनी आपले समाजकार्य चालू ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आजही अनेक शिक्षण संस्था कार्यरत आहे. त्यांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक संस्था समाजसेवेचे व्रत पार पाडत आहे. त्यामुळे समाजाला आपल्या हक्काची व कर्तव्याची जाणीव होत आहे. राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय मूल्ये फक्त शिक्षणातूनच साध्य होऊ शकते.
आज समाजात अनेक तरूण व्यसनाधीन होत आहे. समाजमूल्ये पायदळी तुडविले जात आहे. दंगे, भांडणे, धार्मिक तेढ ही शिक्षणातील ढासळलेला दर्जा असू शकतो. शिक्षणातील गुणवत्तेला स्थान न देता फक्त विद्यार्थी उतीर्ण करून पालकांचे समाधान केले जाते. त्यातून निकृष्ट दर्जाचे शिक्षण नक्कीच असते. शिक्षण वाचवायचे असेल तर सरसकट बिनधास्त पास होणारे विद्यार्थी प्रमाण थांबविले पाहिजे. साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर फक्त विद्यार्थी शंभर टक्के उतीर्ण करून उपयोग नाही. देशातील प्रत्येक राज्याची शिक्षण गुणवत्ता सुधारली पाहिजे. तरच शिक्षाणाचा दर्जा सुधारेल अन्यथा विद्यार्थी भरकटले जातील. मुली मुलांपेक्षा उच्च शिक्षणात अग्रेसर आहे. मुलांचा दर्जा शिक्षणात का खालवला जात आहे.याची कारणे शोधली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण, तांत्रिक शिक्षण दर्जा सुधारला पाहिजे. दहावी, बारावी अनुतीर्ण विद्यार्थ्यांनाही शासकीय तांत्रिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी राज्य पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे. शासकीय, अनुदानित खाजगी शाळांना सुविधा पुरवून विद्यार्थीहीत साधले पाहिजे. विनामूल्य शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळालेच पाहिजे. शासकीय शाळांना मैदान, लाईट, पाणी, शौचालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, संगणकीय सुविधा शासनाकडून मिळणे फार गरजेचे आहे. परंतु फक्त संस्था पैसे कमाविण्याचे साधन राहू नये. कारण देशाची खरी संपत्ती विद्यार्थी आहे. त्यांच्यात जीवन परिवर्तन होणे काळाची गरज आहे.
विद्यार्थी घडविणे हे संस्थांचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. सकारात्मक दृष्टीकोन असायला हवा. ग्रामीण भागातील शाळा चालविण्यासाठी संस्थाचालकांना एक विशिष्ट रकमेची शासकीय आर्थिक मदत शासनाकडून होणे गरजेचे आहे. तरच त्या संस्था टिकतील. अन्यथा इमारती व इतर सोयी विद्यार्थ्यांना देण्यात अनेक अडचणी उभ्या राहतील. शिक्षणातील खाजगी धोरण बंद करून विना अनुदानित शाळा टप्याटप्याने अनुदानित करा. शिक्षणात समान कायदा लागू करून सर्व शाळा सरकारच्या अखत्यारीत असल्या पाहिजे. शिक्षणात नवीन ध्येयधोरणे राबविणे काळाची गरज आहे. शिक्षणासाठी राखीव निधी असला पाहिजे. शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन राजकीय व्यक्तीनी, समाजाने सकारात्मक ठेवला पाहिजे. ज्या देशात शिक्षणाची अवस्था वाईट तो देश मागास असतो. त्याची प्रगती न होता तो देश गुलामशाहीकडे ओढला जातो. देशात अराजकता माजते.
बळी तो कानपिळी अशी अवस्था निर्माण होते. देशातील उच्च अधिकाऱ्यांच्या कार्यावर व सन्मानावर गदा येते. त्यासाठी गुणवत्तायुक्त अभ्यासक्रम असायला हवा. तज्ज्ञ गुणवत्ता युक्त असायला हवे. शिक्षणाची उद्दिष्टे पाठ्यक्रमातून साध्य होण्यासाठी कल असावा. शिक्षण हे चार भिंतीच्या आड न राहता चांगल्या वातावरणात असले पाहिजे. शाळा मुलांना तुरुंग न वाटता आनंददायी व उल्हासित असायला पाहिजे. त्यात विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा कृतियुक्त सहभाग असायला पाहिजे. नवीन शिक्षणातील बदल काळानुरुप असावे.