शिक्षा
शिक्षा
मी तिला विचारले,
"असे का केलेस?"
ती चहा घेत होती.
चहा पिणे झाल्यावर ती म्हणाली, "माझ्याकडे काय पर्याय होता. किती वाट पाहिली मी तुझी. तुझ्या घरी गेले. कोणी काही बोलायला तयार नाही. काय करणार, माझ्यामागे अजून दोन बहिणी लग्नाच्या. वडिल रिटायर्ड आणि आजारी. त्याना रिटायर्ड झाल्यावर मिळालेल्या रकमेत आम्हा तिघींचे लग्न करायचे होते, ते ती रक्कम उराशी धरून बसले होते. धास्ती होते रे. तू दोन वर्षांपासून अरबस्थानात. समजून घे.
मी आता या पुढे तुला भेटू शकणार नाही. मी तुला झालेले विसरून जा असे म्हणणार नाही. कारण तुला लक्षात असायला हव की तुला खर प्रेम मिळालेले होते आणि तू ते गमावलेस.
मी पण तुझ्यामुळे मला मिळालेल खर प्रेम गमावून बसले. मी पण राहिले तितके दिवस हे सगळ लक्षात ठेवीन. आता माझ्या व तुझ्या जीवनात फक्त तडजोड, गरज व व्यवहार राहिला आहे.
आता तुला व मला कोणावरही मनापासून खरे प्रेम करता येणार नाही. कारण प्रेम हे एकदाच होत असते.
प्रेमाचसुद्धा फुलासारखे असत, एकदा उमलल्यावर तेच फुल पुन्हा उमलत नसते.
आता तुझ्या थोडयाशा पैशाच्या प्रेमात चार आयुष्य तडजोडीचे जीवन जगणार."
येवढे बोलून ती उठली व हळूच डोळ्याचे कडे पुसत निघून गेली.
मी ती जे कांही बोलली त्यावर विचार करत बराच वेळ तिथेच बसून होतो.
मी केवढी मोठी घोडचूक करून बसलो आहे ह्याची मला जाणीव झाली.
पण आता वेळ निघून गेली होती.
मला आता उर्वरित आयुष्य पश्चात्ताप करण्याशिवाय गत्यंतर नव्हती.
मीही जड मनाने तिथून उठलो.
मी तेव्हाच ठरवले की लग्न करायचे नाही.
कमीतकमी अजून एका व्यक्तीला दुःख द्यायचे नाही.
हीच पैशाचा लोभ केल्याची योग्य शिक्षा होऊ शकते.