शेवटच प्रायश्चित
शेवटच प्रायश्चित
खरचं नात्याच स्पष्टीकरण कोणीच देऊ शकत नाही. अस मला वाटत. असंख्य नात्यामधल नवरा बायकोच नात मला बिलकूल समजत नाही.
भूतकाळात केलेल्या चुकाच प्रायश्चित मला भविष्यात करायची संधी मिळाली आणि ते मी केल. जरी माझ खूप मोठ नुकसान झाल असेल तरी मी खूप समाधानी आहे.
आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला कधीतरी मिळणारच आणि ती मी भोगायला तयार झालो होतो. आज पण त्या गोष्टी मनाला आठवणींची फुंकर देऊन जातात.
माझ वय २७ झाल होत. २७ वय पूर्ण झाल की घरातल्याचे डायलॉग सुरु होतात. लग्न करुन घे, चांगल होईल. वय वाढल कि चांगल्या मुली भेटत नाहीत. अरे आपल्या घरात सर्व मुलांची लग्न झाली. तु कधी करणार.
माझ लग्न म्हणजे कुंटुंबाचा मोठा प्रश्न झाला होता. पण मला लग्नात खरच इच्छा नव्हती याच कारण माझ्यात काही प्रॉब्लेम आहे अस नव्हत. पण खरच जॉब नीट नव्हता. खाजगी क्षेत्रात १५००० हजाराची माझी नोकरी होती माझी, कधीही लाथ मारणार कंपनी सांगता येऊ शकत नाही. मी नकार देत असलो तरी मला पण हेच वाटायच कोणत्या मुलीला मी का आवडेन का ? दिसायला सावळा, १५००० ची नोकरी आणि ती पण खाजगी क्षेत्रात, नो प्रॉपर्टी. सगळा पगार घरात घर खर्चासाठी जात होता. ना पैलवान, हाडांचा सापळा माझ्नोयापेक्षा भारी वाटेल असा मी. सेव्हींग नव्हच. माझ्या कर्तबगारीची भांडी पूर्णपणे मोकळीच होती. पण तरी मला मुली देतील याच कारण माझे बाबा. माझ्या बाबांची प्रॉपर्टी, त्यांच चांगल राहणीमान, सर्वांना मदत करण्याच नेचर. बाबांना बाजूला केल तर तशी माझी किंमत शून्य असेल. मला कोण का म्हणून मुलगी देल. मी हार मानत नाही माझे प्रयत्न मेहनत चालू होती पण यश भेटल नव्हत.
स्वतःलाच जर स्वतःबद्दल अभिमान नसेल तर बायकोला कसा असणार.
दोन महिने घरात लग्नाची पिपाणी वाजतच होती. घरातल्यांना सांगून कळतच नाही.
आईः अरे मुलगी आली की नशीब बदलेल.
लगेचच बाबांचा टोमणा
बाबाः करुन घे आता लग्न. चांगली नोकरी मिळवता आली नाहीच परत चांगली मुलगीपण मिळवता येणार नाही. बाहेर काय असेल तर आत्ताच सांग.
आता तर मी आरोपी नसताना फाशी मिळणारच. इच्छा नसताना मी लग्न करायला तयार झालो होतो.
दुसऱ्या दिवसापासून पत्रिका जुळवन, फोटो बघण सुरुच. मी लक्ष देण सोडल होत घरातल्यांकडे.
१५ दिवसात चांगली मुलगी मिळाली. बघायला जायचा प्लेन घरातल्यांचा ठरला. मी जॉबच कारण सांगून सटकलो.
संध्याकाळी उशिरा घरी आलो तर खूश खबर घरचे पुढच्या महिन्यात साखरपुड्याची तारीख ठरवून आले.
हे ऐकून सर्व गोष्टी किती फास्ट होतात हे जाणवू लागल. मुलीच्या आई वडलांना मला भेटायच होत. माझ्या कुटुंबाच्या दबावाखाली मला रविवारी मुलीच्या घरी पाठवल गेल.
रविवार आला. आणि परिक्षेचा पेपर असल्यास टेन्शन सुरु झाल.
आईः सरळ बोल, चांगली कपडे घाल, तुझा निळा शर्ट काळी पँन्ट घाल.
मीः आई ते १० वी १२ वीचे काटावर पास झाल्याचे सर्टीफिकेट नेऊ का मुलीच्या आई बाबांना दाखवायला?
आईः मुर्खा, ऐक नीट माझ. नाटक करु नको. आई बापाला चार लोक ओळखतात.इज्जत घालवू नको. मुलीचे आई वडिल तुझ्यामुळे आम्हाला नाव ठेवतील.
अस वाटत होत दारु पिऊनच जाव. पण एवढी हिंमत नाही. व्यसन असत तर किती बर झाल असत. लगेच रिजेक्टच कारण मिळाल असत. कशाला भेटायच होत त्यांना हेच कळत नव्हत. मुलीच्या आई बाबांनी माझ्या आईबापाकडे बघून मला त्याच्या मुलीसाठी स्वीकारुन स्वतःच्या पायावर लोखंड मारल होत अस वाटतय.
मी घरी गेलो. तिच्या आई बाबांना भेटलो. खरच ते साधे आणि चांगले होते. मुलगी समोर आली पण मी लक्ष दिल नाही. मनातून लाजत होतो. पहिलीच वेळ मुलगी बघायची.
मी नाश्ता केला अर्धा तास गप्पा मारल्या आणि काम सांगून निघालो. त्यांनी खरच खूप आदर दिला.
आज मी मला खूप मोठा झाल्यासारख वाटत होतो. आणि तिचेआई बाबा मला भेटून खूश होते.
घरी गेल्या गेल्या आईने टीव्हीची मालिका सोडून माझी चौकशी सुरु केली. मी भाव खात बोललो ठीक होत नोकरीची मुलाखत. जावई म्हणून निवडतील मला.
आईः मुलगी आवडली का?
मीः मी पाहिलच नाही
आईः म्हणजे तुला आवडली नाही. अस असेल तर सांग बाळा. जबरदस्ती नाही. दुसरी मुलगी बघू. आयुष्य काढायच आहे तुला तिच्यासोबत.
मी आईला सोफ्यावर बसवल. हातात हात ठेऊन बोललो.
मीः माझ्या आई बापांनी माझ्यासाठी आजपर्यत सर्व चांगलच बघितल आहे. मी काही न देता त्यांनी मला खूप काही दिल. मग काय बोलू. मला कशीही मुलगी चालेल. मग ती काळी असो अपंग असो काही फरक पडत नाही. तुम्ही जे दिल तेच माझ्यासाठी योग्य. फक्त एकच इच्छा आहे. मुलगी बघून तिचा स्वभाव कळत नाही. पण जर ती मुलगी उद्या वाईट निघाली तर तुम्ही दोघांनी स्वतःला दोष द्याचा नाही. ते सर्व माझ नशीब असेल. मी जशी असेल तस तिला सांभाळेन.
शेवटी साखरपुड्याचा दिवस आला.
साखरपुड्याला तिच नाव कळल. आशा तीच नाव साक्षत अप्सरा भेटली. तीला बघून पाहतच राहिलो. कारण वाटलच नव्हत एवढी सुंदर मुलगी मिळेल. कॉलेजला किंवा कुठेही कोणतीही सुंदर मुलगी दिसली कि मी बघायचो आणि बोलायचो मनाला अशी काय आपल्याला भेटत नाही. साखरपुड्याला तिचा हात मला लागला अंगठी घालताना. आणि तेव्हापासून लग्नापासून पळणारा मी चक्क तिच्या प्रेमात पडलो. आता लग्नाची तारीख कधी जवळ येतेय याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. मी खूप खुश होतो.
बोलता बोलता लग्न ठरल आशा घरी आली. माझा आनंद डबल झाला.
पण डबल आनंदाला नजर लागली कुणाचीतरी असच वाटत होत. आशा साखरपुडा झाल्यापासून माझाशी एका अनोळखी माणसासारखी वागत होती. अस वाटत लग्न केल म्हणजे इच्छा नसताना केलेला करार केलाय आशाने.
तिला मी खूप वेळा विचारल लग्न करुन खूष आहेस का? ती हो बोलून कामात स्वतःला गुंतवायची.
एक दिवशी मला राहवल नाही आणि मी न राहून विचारल
मीःआशु काय झाल ? का टाळतेस मला ?
तीः अस काय नाही. मला तुम्हाला विचारय होत मी जॉब केला तर चालेल का?
मीः कर ग बिनदास्त. तुला हव ते कर.
मीः अजून काय?
तीः मला या घरात सेटल व्हायला वेळ पाहिजे.
मीः अग वेडी ऐवढच. तुला हव तेवढा वेळ घे. फक्त ही गोष्ट आपल्यातच ठेव. तू बेडवर झोप मी खाली झोपतो. जो पर्यत तुला मी तुझ्या लायक वाटत नाही तो पर्यत आपण फक्त मित्र मैत्रीण राहू. तूला काही त्रास होत असेल तर बिनदास्त सांग. मी आयुष्यभर वाट पाहेन तुझी.
मी स्वतःला परत जॉब मध्ये बिझी केल. आशा जॉब करुन घरातली सर्व काम करायची. एक चांगली सून म्हणून आई बाबा तीची खूप तारीफ करायची आणि मला पण ते आवडायच.
एक वर्ष झाल लग्नाला आशा अजून अस्वस्थ वाटायची. तब्येत खूप खराब झाली होती तिची. लग्न झाल्यापासून मी विचारल तेवढच बोलणार. एक रॉबर्ट घरात आणला असा वाटत होत.
मला एक दिवसपण ठीक वाटत नव्हत तिला अस बघून. एक दिवस मला बसस्टॉप वर आशाची मैत्रीण अनिता भेटली.
मीः हाय अनिता.
अनिताः हाय
मीः कशी आहेस. लग्नानंतर मैत्रीणीला विसलीस.
अनिताः नाही कॉल करते मी.
मीः फ्री आहेस का?
अनिताः हो घरीच चालले होते.
मीः चल कॉफी प्यायला. आणि तुझी मदत हवी जरा.
आम्ही कॉफी शॉपला गेलो. कॉफी पिली. मी आशाच सगळ वागण अनिताला सांगितल.
मीः एक वर्ष झाल लग्न होऊन पण आमच नात नवरा बायको या नावाचच. ती काही बोलत नाही. काम सांगून टाळते मला. मला तिचा त्रास कमी करायचा आहे. यात तुझी मदत हवी.
अनिताला विश्वासात घेतल्यावर तिने मला सर्व सांगितल.
अनिताः आशाच सिध्देश नावाच्या मुलासोबत प्रेमप्रकरण होत. दोघांनी लग्न पण करायच ठरवल होत. पण आशाच्या आई बाबांनी नकार दिला. आणि तुमच लग्न ठरल.
मी सिध्देशचा पत्ता घेताला अनिता कडून आणि तिला एकच बोललो
मीः तू मला कधी भेटली नाहीस आणि काय बोलली नाहीस सगळ विसरुन जा.
तिला बाय करुन थेट मी सिध्देशला भेटायला त्याच्या पत्त्यावर गेलो. मनात विचार आला होताच कि आपली फसवणूक झालीय. पण स्वतःला सावरल कारण ह्या गोष्टी होतच असतात त्या त्या वयात.
सिध्देशला भेटून खूप वाईट वाटल होत. सिध्देशला एक हात नव्हता. सिध्देशने मला बघितल्या बघितल्या ओळखल. तो आश्चर्यचकित झाला होता.
सिध्देशः या. मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही आशाचे मिस्टरना. मी आशाचा मित्र लग्नाला आलो होतो मी आपल्या.
मीः हे एवढ मोठ घर तुमच आहे का?
सिध्देशः हो सर. मीच घेतलय.
मीः मग तुमच्या घरी कोण नसत.
सिध्देशः मी अनाथ आहे. अनाथ आश्रमात वाढलोय.
मीः माफ करा.
मी पुढे गेलो तर पाहतच राहिलो. सिध्देश एक उत्कृष्ट चित्रकार होता. त्याच घर बक्षिसांनी आणि चित्रांनी भरल होत. मी ती जीवंत चित्र बघून त्याचा चाहताच झालो. खरच वाईट वाटल अंपग आणि अनाथ हा किती मोठा शाप आहे ज्यांनी दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळ केल. आत्ता कळाल होत सिध्देशला आशाच्या आई बाबांनी का रिजेक्ट केल. पण मी मनातच विचार केला की मी सिध्देशपेक्षा किती छोटा होतो. सिध्देशची चित्र हजार लाखात जातच असतील. त्यामुळे एवढा मोठ घर घेतल. त्याच घर किती बक्षिसांनी भरल होत. मला साध पेन पण कुणी बक्षिस दिल नव्हतं.
सिध्देशः सर कुठे हरवला. पाणी घ्या. चहा पिणार का कॉफी
मीः मला महत्त्वाच बोलायच आहे. मी पूर्ण विचार करुन बोललो. तुम्ही आशाशी लग्न कराल का ?
सिध्देशः काय बोलताय तुम्ही सर ?
मीः मी योग्य तेच बोलतोय. आशाने माझाशी एक करार आणि आई वडलांची इच्छा म्हणून लग्न केलय. ती प्रेम फक्त तुमच्यावरच करते. आणि सर्व चित्र सांगतात तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता आणि तिच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्हीच तिच्या योग्य आहात. हे माझ कार्ड तुम्ही विचार करुन मला सांगाव. तुमची आशा फक्त तुमचीच होती तुमचीच असेल.
मी सरळ तिथून निघालो.
विचार करत निघालो.
मला आई वडिल आहेत आणि मी अपंग नाही आणि पैसा नसताना मी किती श्रीमंत होतो.
पी पी पी पी पी
वाचलो. कारने उडवलच असत मला. एक बर झाल असत पण. मी सिध्देशला सांगून आलो आशाशी लग्न कर पण आता प्रश्न होता की माझ्या आई बाबांना आणि आशाच्या आई बाबांना कस समजवायच.
एक भारी कल्पना आली. कल्पना विचित्र होती. पण यामागे असलेल खोटपणा कुणाच्यातरी चांगल्या आयुष्यासाठी चांगलाच असेल.
घरी आलो आणि आई बाबांना एका रुम मध्ये बसवल.
आईः काय झाल ?
बाबाः अस एका बाजूला का आणलस
मीः मला महत्त्वाच तुमचाशी बोलायच आहे.
बाबाः बोल की मग
मीः ही गोष्ट ऐकून तुम्हाला त्रास होईल पण विचार केल तर तुम्हाला माझी गोष्ट नक्की पटेलच.
बाबाः मुद्द्याच बोल
मीः मी आशाला घटस्फोट द्याच ठरवलय
आईः ये मूर्ख आहेस का तू? तुला काय झालाय ? भांडण झाली का तुमची? अरे होत नवरा बायकोत अस.
मीः तू समजतेस अस काय नाही. सगळा दोष माझा आहे. मी तुम्हाला नातू देऊ शकत नाही कारण माझ्यात दोष आहे. हे खर आहे. मला खुप वाईट वाटल हे ऐकल्यावर पण सत्य हे समजून घ्यावच लागत. मी ३ महिने गोळ्या खातोय. खूप ट्रीटमेंट केल्या पण काहीच फायदा होत नाही.
आई बाबा पूर्ण शांत. कोणच काही बोलत नव्हत पण अचानक बाबा बोलले
बाबाः ठीक आहे अस होऊ शकत माझ्या मित्रात पण असा दोष होता. मग तु दत्तक घे मूल. नाहीतर बाकी दुसरे उपाय कर. आशाला का घटस्फोट देतोय तिची काय चुकी ?
मीः माझ्या दोषाची शिक्षा आशाला कशाला. ती आई बनू शकते. प्रत्येक स्रीला आई बनावस वाटत. तुम्ही जे मला बोलला तेच तुमच्या जावयाला बोलू शकला असता का?
परत दोघ शांत
मीः माझ्या आई बाबांनी मला एक शिकवल आहे जर आपण स्वतःच चांगल करु शकलो नाही तर दुसऱ्याच वाईट करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. आशाला दुसरा चांगला मुलगा १००% भेटेलच.
आईः आणि तुझ काय ?
मीः माझ टेन्शन घेऊ नको. ज्याने जन्म दिला त्याला माझी काळजी आहे ग.
तिथून मी निघून गेलो दुसऱ्या दिवशी असच सासू सासऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व सांगितल
सासरेः म्हणजे तुम्ही आमची फसवणूक केली.
मीः मला ही गोष्ट लग्नाआधी माहित असती तर मी कधीच लग्न केल नसत.. ही गोष्ट कुणाला माहिती नाही. वाईट वाटेल म्हणून तुम्हाला सांगण योग्य वाटल.
सासूः म्हणजे तुम्ही आमच्या मुलीला चुकी नसताना घटस्फोट देणार, आणि तीला कोण सांभाळणार ?
मीः मी घटस्फोट दिला नाही तर तुम्ही कधी आजी आजोबा बनणार नाही. आणि दत्तक मूल तुम्हाला चालणार नाही. घटस्फोट झाल्यानंतर आशुच दुसर लग्न करायची जवाबदारी माझी. तीच आयुष्य चांगल हव असेल तर तीच दुसर लग्न करा. माझा सिध्देश नावाचा माझा मित्र आहे. एकटा आहे, पैसेवाला आहे, फक्त अनाथ आणि अपंग आहे. पण अप्रतिम चित्रकार आहे.
सासरेः हे लग्न अजिबात होऊ शकत नाही ज्याला आई बाप माहित नाही त्याला मी माझी पोरगी देणार नाही.
मीः जर तुम्ही अनाथ असता आणि हेच कोणी तुम्हाला बोलल असत तर कस वाटल असत सासरेबुवा. अनाथ असला तरी त्याला माणुसकी आहे त्याच्यात. चार चांगली मोठी माणस ओळखतात त्याला. अपंग असुन सरकारी शाळेत शिक्षक आहे. त्यांच्या अप्रतिम कलेसाठी मोठे पुरस्कार मिळालेत. मोठी लोक दररोज भेटायला येतात. त्याच्या चित्रांच प्रदर्शन भरल तर परदेशी लोक चित्र घेतात. अनाथ असून स्वतःची प्रापर्टी आहे बंगला आहे, नोकर चाकर आहेत, पैसा आहे, अनाथ आश्रमांना दान करतो. आणि तो अनाथ आहे त्यात त्याची काय चुकी ? आशा त्याच्यासोबत माझ्यापेक्षा जास्त खूश राहिल. नाही राहिली मी परत लग्न करेन तिचाशी.
सासूः पण समाज काय बोलेल. का दिला घटस्फोट ?
मीः सांगा खरी गोष्ट सर्वांना सांगा नाहीतर अस मुलाने मुलीला खूप छळल. कोण बघायल येतय.
इथ पण पूर्ण वातावरण शांत.
मला भाषण करण्यात खोट बोलण्यात मोठा अवॉर्ड दिलाच पाहिजे. माझ्या शब्दांनी आई बाबा आणि सासू सासरे यांना समज पण आली आणि त्यांनी या गोष्टीला होकार दिला. चौघांची मन मी माझ्या प्रामाणिक खोट बोलण्यामुळे जिंकली. नर्कात जागा बुक झाली या खोट बोलण्यामुळे. दोन दिवसांनी सिध्देशचा पण फोन आला त्यांनी पण लग्नाला होकार दिला. सगळ माझ्या मनासारख झाल.
एवढ करण्यासाठी खरी ताकद मला आशाच्या हसणाऱ्या चित्राने दिली. ते चित्र मी सिध्देश घरी पाहिल होत. त्या चित्रात ती खूप खूश होती आणि आता ती माझ्यामुळे उदास होती.
तिला शरीराने जबरदस्ती मी मिळवल असत पण मला सुंदर मूर्ती नको हवी होती. सुंदर मूर्तीपेक्षा जीवंत स्रीच बरी.
पुढच्या आठवड्यात मी आशाला घेऊन हॉटेलला गेलो
आशाः पैसे जास्त झाले का? जे हॉटेल मध्ये आणल आज.
मी शांत होतो. टेबलवर केक आला.
मीः आज माझा वाढदिवस आहे. बोललो तुझ्यासोबत बाहेर साजरा करु.
आशाः वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मीः धन्यवाद. नुसत्या शुभेच्छा नकोत
आशाः मग आजून काय हव. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही.
तिच्यासमोर पेपर ठेवले
मीः सही दे ह्यावर तुझी.
तिने पेपर पाहिले. ते घटस्फोटाचे पेपर होते.
आशाः लवकर कंटाळला माझा. मी करते सही. काळजी करु नका.
मीः सही सोबत अजून एक गोष्ट करशील
आशाः आता अजून काय ?
मीः सर्वांच्या आणि माझ्या इच्छेने तुला सिध्देशशी लग्न करायच आहे. तो तुझाशिवाय खूश राहणार नाही. मी सर्वांची संमती घेतली आहे. तू फक्त लग्नाला उभी राहा.
हे ऐकूनच आशा खूप रडायला लागली. तीच रडण थांबतच नव्हत
मीः चल जाऊया घरी. अग वेडी लग्नाआधीच बोलली असतीस एवढा तुला माझा त्रास झाला नसता. प्लीज रडू नको. लोक मला मारतील तुझ्या रडण्यामुळे. तू खूश राहा एवढीच माझी इच्छा आहे.
२ ते ३ महिन्यात घटस्फोट मिळाला. आणि सिध्देश आणि आशाच लग्न पण ठरलं. आता आशा परत पहिल्यासारखी खूश वाटत होती.
हे सगळ वाचून तुम्ही विचार करत असाल किती मूर्ख आहे मी. पुरुष असून दोष नसून मी सर्वांच्या नजरेत नपुंसक झालो. मला काही फरक पडत नाही. मला कोण काय बोलेल.
आणि मी कोणी महान आत्मा तर बिलकूल नाही. हे एक शेवटच प्रायश्चित होत माझ.
आपला वाईट भुतकाळ नेहमी आपल्या समोर येतोच.
कॉलेजच्या दिवसात मी रजनी नावाच्या माझ्या मैत्रीणीच्या प्रेमात पडलो. माझ एक तर्फी प्रेम. वय असतच अस भयानक जे चुका करायला भाग पाडतच. मी तिचा दोन वर्ष मानसिक छळ केला. तिला फोन करायचो, मँसेझ पाठवायचो. तु माझाशी लग्न नाही केलस तर मी जीव देण. धमकी द्यायचो तिला.
एक दिवस माझ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. पण तिने आत्महत्या मध्ये अभ्यासाच कारण दिल. मी खूप रडलो पण तिची माफी पण मागू शकलो नाही.
आज आशाला मुक्त करुन आणि आयुष्यभर एकटा राहून एका मोठ्या चुकीच प्रायश्चित करतोय मी.
कदाचित माझ हे बलिदान बघून रजनी मला माफ करेल.
चुका सर्वाकडून होतात. पण आपल्याला माफ करण जमल पाहिजे. स्वतःलापण आणि दुसऱ्यालापण...