रेशीमगाठी.....
रेशीमगाठी.....
*सप्तपदीच्या वाटेवरती*
*साथ असे ही शतजन्मीची*
*कुमारिका ती वधू जाहली*
*भाबडी निरागस मनीची*
सप्तपदी चालून तुजसवे बंधनात रेशीमगाठ बांधली.......सुख-स्वप्नांना घेऊनी ओंजळीत एक नवी दिशा मिळाली..... अवखळ, अल्लड पणाला जबाबदारीच्या मोकळ्या सागरात किनारा सापडेना..........आभास तुझा छळूनी मला प्रीत सागरात नेई.....तेजोमय सोनेरी किरणात न्हाऊनी सुखावले जीवन माझे.........मोकळ्या आकाशाखाली सारे गहीवरलेले क्षण हळूहळू उजळत गेले......
भुरळ पडली स्वप्नांना.... भुरळ पडली मनाला...... आणि तन-मन तुझ्या मिठीत अलवार विसावले........नजर तुझी भेदूनी घेऊ पाहे कवेत मला........या कल्पनेने ती लाज अलवार गाली ओघळली......चूर-चूर झाली मिठीत तुझ्या.........हृदयीची स्पंदने आपसूकच वाढत गेली.........तुझा मखमली स्पर्श जाणवला मुसमुसलेल्या देहाला.......... शहारा उठला अंगावरी साद देत सळसळत्या यौवनाला.......... तारूण्य माझे साठवूनी नजरेत करी घायाळ या मनाला.....त्या हळव्या स्पंदनातुनी प्रीतीच्या धारा हलके-हलके बरसत गेल्या.....मोहरला ऋतू लोभस अन् चिंब चिंब जाहली धरा........प्रीतीच्या तुषारांनी पुलकित मन झाले........ नवा अनुभव देऊनी तारूण्याला बहर आला.............मोकळे कुंतल बट गाली रूळतांना ........केशसंभारात तुझे मन हे गुंतले...........भिरभिरती पापणी लाजेने मिटून बंद झाली........ मदन-बाण घायाळ करीत दो जीव एक झाले.......... प्रीतीचा गारवा झोंबला प्रणयासवे अन् यौवनाला दिलासा मिळाला........
भिजला आसमंत सारा पाहूनी प्रणयातील बरसात...........मनमोगरा ही अलवार फुलत गेला...........दरवळ उठला मिलनाचा.........सुगंधित करूनी दाहीदिशा साऱ्या.........प्रेमाचा परिमळ उधळीत भेटलास तु मला .........छेडीत मना-मनाच्या तारा सूर-साज मोहरला..........शब्दांची झाली कविता....... भाव शब्दातून सजले......प्रीत-प्रणयाचे गीत रेशीमगाठीत सदा गुणगुणले