पत्र
पत्र
'आई, हे बघ मला वाटते पप्पांचा इमेल आला आहे.
'हो का? चेक कर बघू किती दिवस झालेत जाऊन, अजून ह्यांचा पत्ता नाही. साधा फोन नाही की खुशाली ही कळवली नाही.'
दीपा ई-मेल्स चेक करत होती आणि आईच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. 'आई हे बघ, ईमेलवर बाबांचे पत्र आहे माझ्यासाठी.'
तोपर्यंत फोनची घंटी वाजली, 'हॅलो, मिसेस केदार....' फोन वरून तिकडून कोणीतरी बोलत होते. 'हो, मीच आहे. बोला, कोण बोलत आहात आपण?' एक मिनिट च्या संवादानंतर आईच्या हातून मोबाईल निसटला आणि आई जोरात किंकाळी मारून खाली जमिनीवर पडली. तसे मला काहीच सुचले नाही बाबांचे पत्र वाचण्या आधीच मी आईकडे धावले. 'आई, आई !काय झाले. अशी का पडलीस तू? आई काय होतंय तुला? आई माझ्याशी बोल ना ग, कोण होते मोबाईलवर ?आई थांब मी पाणी आणते तुझ्यासाठी.'
मी पाणी आणून आईच्या तोंडावर शिंपडले आणि ग्लास पुढे करून पाणी पिण्यास दिले.
'दिपू .... दिपू, कसं सांगू बाळा तुला, तुझे बाबा आपल्याला सोडून गेले. मी काय करू आता? दिपू कोण आहे आता आपल्याला!! आणि मी स्तब्ध झाले. मला रडावे, का आईला सांभाळावे ? काहीच कळत नव्हते. असं नको व्हायला पाहिजे होतं. 'बाबा, बाबा , मला माझे बाबा हवेत !! आई, मला माझे बाबा हवेत, मी नाही राहणार बाबां शिवाय.'
'आई, आई, बाबांचा ई-मेल बघ! बघ, त्यात त्यांनी काय लिहिले?' आणि माझी पावले कम्प्युटर कडे वळली आणि मी माझ्या बाबांचे ते शेवटचे पत्र वाचू लागले.
प्रिय पिल्या दीपूस,
गोड गोड पापा, कशी आहे बाळा तू? काळजी घेतेस ना? म्हणजे तुझ्या मम्मी ची ग!! मला माहित आहे,माझी दिपू स्ट्रॉंग आहे. बाळा बाहेरच्या जगात रोगराई खूपच वाढली आहे, या करणामुळे मी तुम्हाला भेटू ही शकत नाही आणि बघू ही शकत नाही, याची मला खंत वाटते. पण काय करू राणी, माझे प्रोफेशनच असे आहे, आज माझी गरज इथे आहे. या लोकांच्या सेवेसाठी मला इथेच थांबावे लागते. कोरोना सारख्या भयंकर महामारी ने साऱ्या विश्वाला गराडा घातला आहे. कितीही जीव तोडून वाचवण्याचा प्रयत्न करतो, तरीही रोजचे लोक जीव गमावत आहे. तुम्ही सगळे आम्हाला कोरोना वाॅरियर म्हणता, पण हे युद्ध लढता लढता मीच जीवनाशी हरलो आहे.
बाळा तू, तुझ्या मम्मीची काळजी घे, तुझी काळजी घे. बाहेर फिरू नकोस. मास्क लावत जा. वारंवार हात धूत जा. बाहेर जरी गेली तरी सामाजिक अंतर पाळून ठेव.पौष्टिक आहार घेत जा. हिरव्या पालेभाज्यांना खाण्यास नको नको करू नकोस. मम्मीचे ऐक. स्वतःची इम्युनिटी वाढव. मी रोज बघतोय ग माझ्या बछड्या, लोक कसे मरत आहेत. बऱ्याच ठिकाणी इंजेक्शनचा, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. लोकांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या लोकांना या व्हायरसचा फटका बसत आहे. आज माझ्या दवाखान्यात आम्ही समोर असूनही आमच्या पेशंट्सना वाचू शकलो नाही. मला खूप दुःख होतंय. वैद्यकीय शिक्षणाच्या वेळी जी शपथ घेतली, त्याला खरच आम्ही पात्र ठरतोय का? असा प्रश्न मला पडू लागला. ह्या वायरस ची भीती इतकी वाढली, की लोक घाबरूनच आजारी पडू लागले.
पण दुसरीकडे काही लोक पूर्णपणे बरे होऊन घरी आपल्या प्रियजनांकडे पोहोचले. परवाचीच एक गोष्ट 35 ते 40 च्या दरम्यान चा एक पेशंट पूर्णपणे बरा झाला. त्याला आपण बरे होण्यापेक्षा घरच्या लोकांना भेटण्याचा जास्त आनंद झाला. त्याच्या घरच्यांनीही त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. आम्ही सगळ्यांनी ही त्याला टाळ्या वाजवून निरोप दिला, तर त्याच्या घरच्यांनी आम्हाला सॅल्यूट करून कृतज्ञता व्यक्त केली. खरच त्यावेळी हे सर्व पाहून आपोआप माझ्या डोळ्यातून पाणी आले.
पिल्या, असे खूप अनुभव यावर्षी आले आहेत. ज्या वेळी एखादा पेशंट बरा होऊन घरी जातो, त्यावेळी आमच्या कष्टाचे फळ मिळाले असे वाटते. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करणे म्हणजे खरोखरच लोकसेवा करणे असेच आहे. परंतु एखादी घटना आपल्या हाताबाहेर गेली तर अतोनात दुःख होते.
'दिपू........!!' आईची किंकाळी ऐकून दिपूने पत्र वाचायचे थांबवले व आईकडे धावत गेली. आई बाहेरच्या पाळण्यावर स्तब्धपणे बसली होती. समोर एक व्यक्ती पार्सल घेऊन उभा होता. ते पार्सल माझ्यासाठीच होते. ते पार्सल बाबांनी पाठवले होते. तोपर्यंत जवळचे नातेवाईक ही गोळा झाले होते. मामी, मामा सगळे आले होते. मामी आईकडे उभी होती. मी काही सांगण्याच्या आधीच मामाने पार्सल कलेक्ट केले होते. सगळे सुरक्षित अंतरावर उभे राहून आईचे सांत्वन करत होते. मला तर काहीच बोलण्याचे धाडस होत नव्हते. मामा आईला सांगत होता की बाॅडी घरी देत नाही, मुखाग्नि तिथेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत द्यावी लागणार होती. मी, आई आणि ठराविक लोक इस्पितळात पोहोचलो. बाबांची इलेक्ट्रिक शबवदहन करून, सर्व कार्यक्रम आटोपून आम्ही घरी आलो. घरी मी व आई दोघे एकमेकांना बिलगून बसलो होतो.
मला तो दिवस आजही आठवत होता, ज्या वेळी बाबा आम्हाला सोडून इमर्जन्सीत इस्पितळात गेले होते. फक्त आमच्या काळजीपोटी ते घरीही येत नव्हते. ते इस्पितळाच्या गेस्ट रूम मध्ये राहत होते. पण बाबा न चुकता रोज वेळ मिळाला की फोन करायचे. हॉस्पिटल मधली परिस्थिती पेशंट विषयीचे सर्व काही सांगायचे. हळूहळू फोन पण कमी होऊ लागले. तशी मी माझी नीट ची तयारी हि जोराने सुरू केली.
घरी आल्यावर, पप्पांच्या पत्राबद्दल, मी मामाला सांगितले. पप्पा नेहमी मला ई-मेल पत्र स्वरूपात पाठवायचे. पण हे ई-मेल पप्पांचे शेवटचे पत्र होते. आम्ही सगळे परत ते पत्र वाचायला गेलो. मी कम्प्युटर चालू केला व ईमेल ओपन केले. मामाने व आईने मी वाचलेलं पत्र परत एकदा वाचले.
'काही दिवसांपूर्वी एक मुलगी जेमतेम तुझ्याच वयाची कोरोनाने पीडित असलेली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तिची खूपच क्रिटिकल कंडीशन होती. तिचे आई-वडील दोघेही सतत रडत होते. आम्हा सगळ्यांचे हात पाय जोडून विनवण्या करत होते. तरुण मुलीला हॉस्पिटल मध्ये कोवीड सेंटरमध्ये एकटेच कसे सोडावे, शिवाय पेशंट सेंटर मध्ये आणि नातलग एकदम बाहेर, या विचाराने त्या मुलीचे आई-वडील खूपच चिंताग्रस्त झाले होते. त्यांची तळमळ बघवत नव्हती मी स्वतःला त्यांच्या जवळ जाऊन त्यांना दिलासा दिला. त्यांना सांगितलं की मी माझ्या मुलीसारखं तिला जपेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी ही त्या मुलीची देखभाल अगदी तुझ्यासारखी करत होतो. तिचे रोजचे औषध, खाणे-पिणे, ऑक्सिजन लेवल, टेंपरेचर सर्व काही व्यवस्थित तपासत होतो. तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघितले की तुझी आठवण येत होती. मला तुझी खूपच आठवण येत होती. तुझ्याशी, अश्विनीशी मला बोलायचे होते. तुम्हाला पहायचे होते. पण पेशंट एकदम इतके वाढले, की पेशंट जास्त व डॉक्टर्स कमी पडू लागले. आमची ड्युटी वाढली. दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. दिवसभर पी पी ई किट काढता येत नव्हता. खाणे पिणे त्यांच्या वेळाही बदलल्या. पुरेशी झोपही मिळत नव्हती.
त्यात मागच्या महिन्यातील घटना तर मन सुन्न करण्यासारखी होती. त्याच्याबद्दल मी तुला सांगितले होते. आज पिल्या मलाही तुला काही सांगायचे आहे. मी ही कोरोणा पॉझिटिव्ह आलो आहे. खूप दिवस झाले पण रिकव्हर होत नाही थोडीशी भीती वाटत आहे. पण उद्या तुझा वाढदिवस आहे. मी कसा विसरु शकेन. मी एक पार्सल पाठवले आहे. बघ तुला आवडते का ? मी नक्की तुम्हाला भेटायला येईन. तोपर्यंत तुझी काळजी घे.अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. ओके, बाय बाय !! गुड नाईट .
बाबांचे हे शेवटचे पत्र. बाबा आज हयात नाही, हे माहीत नव्हते की हे त्यांचे शेवटचे पत्र ठरू शकेल...