पाऊस आणि शाळा
पाऊस आणि शाळा
पावसाशी जोडलेला दिवसशाळेचा तो पहिला दिवस आजही मला चांगलाच आठवतो. त्या पहिल्या दिवसाची तयारी तीन चार दिवस आधीपासूनच सुरू झालेली असायची. नवीन युनिफॉर्म, नवी कोरी वह्यापुस्तकं, दप्तर... वह्यांच्या कागदांचा तो वास आजही डोक्यात घर करून आहे. नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी शाळा सुरू व्हायच्या आधी तीन चार दिवसांपासून बाबांच्या मागे लागायचं. मग, सगळे मिळून खरेदीला जायचो. भाऊ-बहिण आणि मी असं आम्हा तिघांना घेऊन बाबा दादरला जाऊन खरेदी करायचे.पहिली ते चौथी मी शिवडीच्या पालिका शाळेत जायचो. पाचवीपासून मग नायगावच्या सरस्वती हायस्कूलमध्ये जाऊ लागलो. पांढरा शर्ट, नेव्ही ब्लू पँट आणि लाल टाय असा आमचा सरस्वती हायस्कूलचा युनिफॉर्म असायचा. पाचवी ते सातवी हाफपँट होती, तर आठवीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना फूल पँट होती. पण, मी मात्र पाचवीला फूल पँटच घेतली होती.जूनच्या १३/१४/१५ तारखेला साधारण शाळा सुरू व्हायची. पहिल्या दिवशी शाळेत जायला मुलं द्गारशी उत्सुक नसायची. मी मात्र दरवषीर् पहिल्या दिवसापासून शाळेत हजर असायचो. या दिवशी वर्गात फारशी मुलं नसायची. शाळेची तुकडी कोणती, शिक्षकांची ओळख, तासांचं वेळापत्रक, हजेरी क्रमांक असे सगळे सोपस्कार या दिवशी व्हायचे. खूप मजा यायची मला तेव्हा. एक्साइटमेंट म्हणतो ना आपण तेच. पण, ते तेव्हा काही कळायचं नाही.पहिल्या दिवशी विद्याथीर् संख्याही कमी असायची. त्यामुळे सगळी वह्यापुस्तकं कुणी घेऊन यायचा प्रश्नच नसायचा. पण, मी मात्र सगळी वह्यापुस्तकं घेऊन जायचो. आईबाबा, ताईदादाही मला सांगायचे, की पहिल्या दिवशी फार काही अभ्यास घेत नाहीत. पण, मला कुठचा धीर. या वह्यापुस्तकांना मी स्वत: कव्हर घालायचो, स्टीकर लावायचो. त्यामुळे कधी एकदा ती शाळेत घेऊन जातो, असं व्हायचं मला.दादा आणि माझ्या शाळेची वेळ वेगळी असायची. तेव्हा मला बहिणीबरोबर शाळेत जावं लागायचं. पण, तिच्याबरोबर जावं लागू नये म्हणून अनेक बहाणे बनवत तिला गुंगारा द्यायचो आणि मित्रांबरोबर शाळेत जायचो आणि त्यांच्याबरोबरच घरी यायचो.पाचवीत आल्यावर हिंदी इंग्रजी या नवीन विषयांची ओळख झाली. 'मेरा छाता' ही तेव्हा शिकलेली हिंदीमधील कविता आजही मला पाठ आहे. शाळा सुरू व्हायचा हा काळ म्हणजे पावसाचा मौसम. रेनकोट तर मी कधी वापरला नाही. पण, छत्रीसुद्धा बऱ्याचदा वापरायचोच नाही. म्हणजे भिजायला मिळायचं ना. खूप मजा यायची. आम्ही सगळे मिळून मोठा पाऊस कधी पडतोय, याची वाट पाहायचो. खूप पाऊस पडला म्हणजे शाळा लवकर सुटायची. पावसातून घरी येताना मग मी माझी फुल पँट गुडघ्यापर्यंत वर खेचायचो, कॅनव्हासचे शूज भिजू नये म्हणून दप्तरात ठेवायचो आणि अनवाणी पायाने नायगावपासून शिवडीपर्यंत चालत घरी यायचो. खूप मजा यायची.शाळेतला जो सगळ्यांचा लाडका विद्याथीर् असतो, ना तो मी होतो. शाळेत होणाऱ्या भजनाच्या वेळी टाळ वाजवणं, राष्ट्रगीत म्हणताना ड्रम वाजवणं, वर्गावर्गांमधून नोटीस फिरवणं एवढंच काय कधी कधी शिपाईकाका नसल्यावर तासाची घंटा देणं अशी अनेक कामंही केली आहेत. याच शाळेत गॅदरिंग, नाटक यांची ओळख झाली. माझ्यातल्या अभिनेत्याचं बीज तिथेच रोवलं गेलं म्हणायचे. आजही शाळेतले अनेक शिक्षक, मित्रपरिवार लक्षात आहे. तेसुद्धा माझी आठवण काढतात. अनेक जण आवर्जून भेटायला येतात. खूप बरं वाटतं.-
