निसर्ग पुष्प
निसर्ग पुष्प
प्रदूषणाचा निषेध करण्यापलीकडे आपली उडी जात नाही.उपाय सुचविणे,आपापल्या परिसरात योग्य त्या यंत्रणा वापरणे,पाठपुरावा करणे यासाठी समाज जागा व कृतिशील हवा.दिल्लीतील हवेचा दर्जा धोकादायक झाल्यावर पर्यावरण चर्चेला जोर चढला.संकट गडद झाल्याशिवाय आपण जागे होत नाही.दिल्ली पाठोपाठ इतर अनेक शहरांनाही भविष्यात अशा संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते.परंतु पर्यावरण रक्षण हे सरकारचे काम आहे अथवा काही संस्थांचे काम आहे,अशी अनेकांची भावना असते.ती होण्याची कारणे काय आहेत आणि प्रत्येक जण पर्यावरण वाचवण्याच्या मोहिमेत आपल्या परीने कसा सहभागी होऊ शकतो,याचा गंभीरपणे विचार आणि आचारही करण्याची वेळ आली आहे.पर्यावरण शिक्षण शाळा-महाविद्यालयांत आल्यावर लहान मुलांच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यास-परीक्षामधून पर्यावरणाची परिभाषा हळूहळू पसरू लागली.घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण,कंपोस्टिंग,जल प्रदूषण,वायू प्रदूषण,व्हर्मी कंपोस्टिंग, गांडुळ खत,रेन वॉटर हार्वेस्टिंग,सोलर अशा अनेक शब्दांचा आपल्या दैनंदिन बोलण्यात समावेश होऊ लागला.जागतिक पर्यावरण परिषदा, त्यात वाचले जाणारे क्लिष्ट प्रबंध,त्यामध्ये दिली जाणारी सांख्यिकी माहिती आणि त्या माहितीचा उद्गम व सत्यासत्यता याबद्दल सामान्य खातरजमा करण्याची काही व्यवस्था नसते. होणाऱ्या संशोधना बद्दल, संशोधकाबद्दल तसेच या संशोधनासाठी आर्थिक रसद पुरवणाऱ्याबाबतही पुरेशी माहिती न मिळाल्याने या संशोधनवृत्तांवरही सर्वांचा पूर्ण विश्वास नसतो.अनेकदा तर या संशोधनाचा व संशोधकांचा हवाला देऊन परस्परविरोधी दावेही केले जातात.या संशोधन परिषदांतील किंवा जागतिक संघटनांच्या अहवालातील निष्कर्ष हे अनेकदा सामान्य माणसाला न कळणारे असतात.म्हणजे त्या अभ्यासात केलेल्या विचारांचा वा परिणामांचा आपल्यावर काय परिणाम होईल, त्याबद्दल सर्वसामान्य अनभिज्ञ असतात.अनेकदा त्या संशोधनातील अत्यंत छोट्या मुद्द्यावर रान उठविले जाते.परंतु त्यातून होणाऱ्या मोठ्या नुकसानाकडे लक्ष दिले जात नाही.
