निसर्ग पुष्प
निसर्ग पुष्प
निसर्ग पुष्प क्रमांक १७
निसर्गाचा विचार करताना असे लक्षात येते की, पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे आपण,आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण पर्यावरणाचा/ निसर्गाचा जसा पाहिजे तसा उपयोग करून आपला विकास साधला आहे,पण त्याची परतफेड करायला मात्र आपण साफ विसरलो आहोत,सर्वप्रथम आपण पर्यावरणाचा एक घटक आहोत याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे त्यातील प्रत्येक व्यक्ती कुटुंबाचा एक घटक असल्याचे भान ठेवून वागतो त्यामुळे त्या कुटुंबात सुख समृद्धी व स्थिरता दिसून येते, त्याच प्रमाणे कुटुंबातील एखादी व्यक्ती जर बेजबाबदारपणे वागली तर पूर्ण कुटुंबाला त्याचे फळ भोगावे लागते तसेच पर्यावरणाचे देखील आहे,निसर्गाचे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे आणि ते मला फेडायचे आहे हा नियम जर प्रत्येक व्यक्तीने पाळला तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा होईल.उगवणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपल्या पुढे कोणती ना कोणती समस्या उभी असते,पण विसाव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वी पुढे जी भयावह समस्या निर्माण झाली आहे ती पाहिली की मनोमन अस्वस्थ व्हायला होतं,मानवा पुढील समस्या मानवानेच निर्माण केली आहे, निसर्गाबरोबर सुखात रमलेल्या या माणसाच्या स्वार्थी वृत्तीला पंख फुटले स्वतःच्या बुद्धिमत्तेचा गर्व झालेला हा माणूस दूरदृष्टी न ठेवता भोवतालच्या निसर्गाचा नाश करू लागला आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला, मानवाने आपल्या बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती साधली आहे,स्वतःच्या यशाने उद्दाम झालेल्या मानवाने कारखान्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा विचारच कधी केला नाही,खरं तर पर्यावरण आणि मी,हे पर्यावरणातून कधी वेगळे होऊच शकत नाही,कारण हे संकट फक्त माझ्यापुरतं किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्ती पुरतं मर्यादित नसून संपूर्ण मानव जाती वर आलेलं संकट आहे, पर्यावरण आपले सर्वांचे आहे. याची जाणीव जेव्हा आपल्या सर्वांना होईल तेव्हा या साऱ्या समस्या नक्की मिटतील. तेव्हा आपणच आपल्या भविष्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
