Preeti Sawant

Inspirational Others

2  

Preeti Sawant

Inspirational Others

मी एक वाचक!

मी एक वाचक!

2 mins
136


वाचन हा माझा आवडता छंद..पण अभ्यासाची पुस्तके सोडून हा !! पण तरीही मराठी हा विषय माझा सगळ्यात आवडता होता ..मला अजूनही आठवतंय की, जून मध्ये शाळा सुरू व्हायच्या काही दिवस आधीच घरी शाळेची तयारी सुरू व्हायची..नवी कोरी पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल ई.

त्यामध्ये मराठीचं पुस्तक हे माझं सगळ्यात आवडतं होत.. माझे पप्पा एक आठवडा आधीच माझी सर्व पाठ्यपुस्तके आणि वह्या आणून ठेवत असत. मग मी त्यामधील मराठीच पुस्तक जमेल तितके शाळा सुरू व्हायच्या आधी वाचून काढत असे. 


तेव्हा वाचनालय हा प्रकार मला माहित नव्हता..त्यामुळे तोपर्यंत मराठीचे पुस्तक आणि देवी-देवतांची पुस्तके हीच माझ्या वाचनात होती..

हो, आमच्या देव्हाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये बहुतेक देवी-देवतांची पुस्तके असायची आणि मला सुट्टीत आजी ती वाचायला ही देत असे. किती मस्त मस्त गोष्टी असायचा त्या पुस्तकांत..


असंच एकदा मी राहत असलेल्या कॉलनीमध्ये ओपन वाचनालय हा उपक्रम केला गेला होता. तो ही विनामूल्य. पण एका वेळेला एकच पुस्तक. म्हणून आम्ही मुलांनी एक आयडिया केली होती. मी आणि माझे दोन मित्र आम्ही एकत्र पुस्तक घ्यायला जायचो. मग बाजूच्याच मैदानात बसून तिन्ही पुस्तके अदली-बदली करून वाचत असू आणि मग अजून एक पुस्तक बदली करून घरी जात असू. त्यामुळे एकाच दिवशी ६ पुस्तके वाचायला मिळायची..तेव्हा मी खरी वाचनाची मजा लुटली. चाचा चौधरी, सिंदबादच्या सात सफरी, जादूचा दिवा, ईसापनीती, अकबर- बिरबल, हितोपदेश, महाभारत, रामायणातील कथा अजून बरीच पुस्तके मी वाचली..


तसेच वर्तमानपत्रे, दिवाळी अंक ही मी वाचत असे..त्यावेळेला कोणी गोष्टीचं पुस्तक गिफ्ट केलं तर काय अप्रूप वाटायचं!! त्यांनतर कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला असताना मी सार्वजनिक वाचनालयात माझे नाव नोंदविले आणि मग माझी वाचनाची भूक अजून वाढली. तिथे मी पुलंची जितकी मिळाली तितकी पुस्तके वाचून काढली. ते माझे सगळ्यात आवडते लेखक !! पण जेव्हा "चेटकीण" हे पुस्तक मी वाचलं. तेव्हापासून नारायण धारप हे सुद्धा माझे सगळ्यात आवडते लेखक बनले. मला भयकथा वाचायला खूप आवडायच्या..त्यांची भरपूर पुस्तके मी वाचली. अक्षरशः अंगावर काटा यायचा वाचताना..भीती वाटायची..पण जेव्हा वाचता वाचता त्या कथांमध्ये भगत, समर्थ ह्या सकारात्मक पात्रांची एन्ट्री व्हायची तेव्हा भीती कुठल्याकुठे पळून जायची.. मला अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे "मोरपंखी" आणि अभिनेत्री अश्विनी भावे यांचे "मनोभावे" ही पुस्तके ही खूप आवडली..त्यांचे लिखाण फारच उत्तम आहे..हे तेव्हा कळले..


आता तर डिजिटल जमाना आला. त्यामुळे हवे ते पुस्तक आता आपल्या सवडीनुसार वाचता येते.. फोनवर वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात पुस्तक वाचणे हे कधीही चांगले हे जरी खरे असले.. तरी आता मला कोणत्याही ठिकाणी माझ्या आवडत्या लेखकांची हवी तेवढी पुस्तके विकत घेऊन ई-बुक स्वरूपात वाचता येतात..त्यामुळे वाचनात खंड पडत नाही..


वाचता वाचता मी कधी लिहायला लागले हे सुद्धा मला कळले नाही..पण उत्तम लिखाणासाठी खूप वाचनाची गरज आहे हे मात्र मला कळले..

ह्याच वाचनामुळे माझी वाणी, माझे शुद्धलेखन बऱ्यापैकी चांगले झाले..ह्याच वाचनामुळे मला नवीन नवीन कल्पना सुचून "गुंतता हृदय हे!!" , "अकल्पित", "शोध अस्तित्वाचा" अशा उत्तमोत्तम कथा माझ्याकडून लिहिल्या गेल्या.

आणि ह्या सगळ्याचं श्रेय??

अर्थातचं वाचनाला !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational