लग्न समारंभ
लग्न समारंभ
साधारण ऐंशीच्या दशकात घरासमोर लग्न लागायची. बेताचा खर्च, पाहुणे मंडळींची लगबग असायची. सगळे नातेवाईक, भावकी कार्य पार पाडण्यासाठी झटून कामाला लागायची. लग्न लागल्यानंतर वऱ्हाड घालविण्याचा एक विशेष कार्यक्रम असायचा. त्यानंतरच घरातले लोक आणि भावकी जेवण करायचे.
काळ बदलला, कार्यालये आली. कार्यालयाच्या बाजारपेठा निर्माण झाल्या. लग्नाच्या विधीला अनेक नवनवीन पायंडे जोडले जाऊ लागले. हजारात असणारा लग्नाचा खर्च काही लाखांवर गेला. काही लग्नांचा खर्च तर कोटीच्या घरात गेला. लग्नाच्या खर्चाने नवनवीन उंची गाठली.
ज्याची ऐपत आहे तो हौसेखातर करतो. ज्याची ऐपत नाही तो कर्ज करतो किंवा शेती विकतो. हौसेच्या नावाखाली लाखो करोडो रुपयांचा चुराडा एका दिवसात होतो. सगळेच लोक लग्नाला खर्च करत असल्यामुळे लोकांची वाहवा पण नाही मिळत. एवढा खटाटोप कोणाच्या हट्टापायी. साधी लग्न लावून नवीन दाम्पत्याला त्यांच्या नवजीवनासाठी मदत करावी.
त्यांच्या नावे एखादा व्यवसाय सुरू करून त्याची घोषणा कार्यालयात सर्व लोकांपुढे करून असा एखादा नवीन पायंडा घालण्याची समाजाला गरज आहे. ज्यामुळे त्या नवीन दाम्पत्याला त्यांच्या पुढील जीवनात त्याचा उपयोग होऊन नुसत्या अक्षतारुपी आशीर्वाद न मिळता खऱ्या अर्थाने आशीर्वाद मिळतील.