Nitin Chinchwade

Others

3.2  

Nitin Chinchwade

Others

व्यथा शेतकऱ्याची

व्यथा शेतकऱ्याची

2 mins
218


        मित्रांनो मी एक शेतकरी तुमच्या पुढ्यात माझे मन हलके करत आहे. लोक मला शेतकरी राजा म्हणतात पण राजानि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले नवल फक्त आपल्या देशातच ऐकायला मिळते. 

        उत्तम शेती, मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी हे समीकरण मी लहानपणीच ऐकलं होतं. शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदलाही तसा मिळत होता. साधारण ऐंशीच्या दशकातील ही गोष्ट आहे. कोणत्याही शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेली बातमी कधीही वाचायला मिळत नव्हती. शेतकरी शेतात कष्ट करून आनंदात दिवस कंठत होता. 

          पण जस आधुनिकरण झाल तसा सगळ्या दुनियेचा कायापालट झाला. गावाचं शहर, शहराच मेट्रो शहर, मेट्रो शहराच महानगर झालं. कंपन्या आयटी पार्क आली. नोकरीवाले लाखो रुपये महिना पगार घ्यायला लागले. शेतकरी राजा मात्र होता त्या परिस्थितीतही खालावला. त्याच्या वाट्याला कायम दुःख, कर्जबाजारीपणा, अपेक्षाभंग, निसर्गाचे संकट, काळजी हेच आलं. 

          इस्रायल सारख्या देशात फक्त दहा टक्केच पाऊस वर्षाला पडतो. पण तो देश जगात शेतीक्षेत्रात एक नंबर आहे. तेथील शेतकऱ्यांची स्वतःची विमान आहेत.  शेतकरी परदेश दौरे करतो. त्याला उद्याची चिंता सतावत नाही. कारण तिथला शेतकरी जे पिकवतो त्याचा त्याला पुरेपूर मोबदला मिळतो. तेच आपल्या देशातल्या शेतकऱ्याचा आयुष्य जगण्यासाठी धडपड करण्यातच जातं. पिकासाठी घेतलेले कर्ज सुद्धा त्याला फेडता येत नाही. वर्षान वर्षे ते वाढतच जातं. त्याची आर्थिक परिस्थिती खालावत जाते. 

             पावसाची अनिश्चितता तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट तर कधी ओला दुष्काळ, रोगराई आणि एवढ्या सगळ्यातून पीक शेतात आलं तर हमी भाव मिळेल याची खात्री नाही. एवढं सगळं होऊनही तो धीर धरतो आणि काळ्याआईची सेवा करतो. 

        कर्ज फेडता फेडता त्याच्या पाठीचा कणा मोडतो. त्यात पोटच्या पोरीचा लग्न आलं तर त्याला आभाळ कोसळल्या सारखं होतं. त्यातच घरची परिस्थिती कर्जबाजारीपणा, आणि शेतीचा जुगार या सगळ्यात तो एवढा खचतो अन म्हणतो.प्यावा वाटत नाही विषाचा घोट पण मातीच्या वासाने भरत नाही पोट. आणि विषाच्या घोटाणे आपले आयुष्य संपवून टाकतो. घरातला कर्ता पुरुष गेल्याने बायका पोरांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. दुःख करत बसले तर पोटात भुकेचा डोंब उठतो. 

            लहानपणी खेळताना नवीन भिडू आला तर म्हणायचो नवा गडी नव राज्य. आणि मग त्या नवीन गड्यावर राज्य असायचे. 

          पण आता मला प्रश्न पडतो, कधी कोरडा दुष्काळ, कधी ओला दुष्काळ कधी रोग राई तर कधी कवडीमोल भाव तर कधी आत्ता सारखी करोनाची महामारी हे सगळे नवीन गडी येतात पण राज्य कायम शेतकरी राजा वरच का असते? 


Rate this content
Log in