खरे सौदर्य
खरे सौदर्य
सौंदर्य सौंदर्य असते
प्रत्येकात ते नसतेच
बाह्यरुपी सौंदर्य ते नव्हे
तर स्वभावात ते असतेच.
शारदा एका शाळेत शिक्षिका असून विद्या दानाचे पुण्य कर्म करत होती. रंगाने सावळी, रुपाने डावी, पण शिकवणीच्या बाबतीत तिच्याहुन कोणीही वरचढ नव्हते. त्यामुळेच साऱ्या शिक्षक वर्गात सहकारी तिचा द्वेष करत होते. फक्त तिच्या शाळेचे मुख्याध्यापक मात्र तिच्यावर खूश होते. तिने मोठ्या कष्टाने बी.एड. केले होते आणि पहिल्याच मुलाखती तिला नोकरी मिळाली होती. शाळेत तिने मुलांची मने जिंकली होती. तिच्या शिक्षणाची पद्धत सर्वांपेक्षा वेगळी होती. तिच्या तासाला मुले शांत शहाण्यासारखी वागायची. ती रुपाने सुंदर नव्हती पण तिचे अक्षर मोत्यांच्या माळेसारखे नीट नेटके होते. काळ्या फळ्यावर एका रेषेत सरळ लिहिणारी तीच एकमेव शिक्षिका होती. प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष द्यायची. तिने कधी मुलांना शिक्षा किंवा धाक दाखवला नव्हता. उलट उडाणटप्पू मुलांनासुद्धा तिने तिच्या प्रेमळ वागण्याने सुधारले होते. मुलांना आईच्या मायेने ती पाहायची. ती लहान असताना तिची आई वारली होती. वडीलांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवले होते. तिचे लग्नाचे वय झाले होते. मुलगा मिळत नाही या कारणाने वडिलांचा जीव वर खाली होत होता. पण शारदा मात्र शांत होती. लग्नाच्या बाजारात रूप व पैशांना फार किंमत असते हे ती जाणून होती. हे देवान आपल्याला दिले नाही, काही हरकत नाही, जे आहे ते ज्ञान आपण मुलांना देऊन त्यांना आदर्श नागरिक बनवू याच विचाराने ती वागत होती.
तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली झाल्याने नवीन मुख्याध्यापक आले. ते तरुण, रंगाने गोरे व फारच रुबाबदार दिसत होते. बायांनी भाळुन जावे असे त्यांचे रूप होते. ते रूपाने सुंदर व कर्तव्य आणि वागणुकीने ही दक्ष होते. पहिल्या मुख्याध्यापकांकडून त्यांना शारदेची सगळी खबर कळली होती. त्याच बरोबर बाकीचे शिक्षक तिचा द्वेष करतात हे ही त्यांना माहीत होते. नवीन मुख्याध्यापक आले म्हणून शारदेच्या शिकवणीत काही बदल झाला नाही. पण बाकीच्या शिक्षकांना मात तारेवरची कसरत करावी लागली. नवीन मुख्याध्यापक शिस्तप्रिय व शिकवणीत काटेकोरपणे वावर करत होते.
शारदेच्या कार्यावर ते खूप भाळले होते. शाळेचे नाव व मुलांच्या उत्कर्षाकरता शारदेसारखी सहकारी असले तर आपण ते सहज करु असे त्यांना वाटले आणि त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. शारदेच्या पायाखालची जमीन सरकली. ध्यानीमनी सुद्धा लग्नाचा विचार नव्हता आणि त्यात एवढे रुबाबदार मुख्याध्यापक स्वतःहून आपल्याला विचारतात म्हणून तिला खरंच भोवळ आल्यासारखे झाले. मुख्यध्यापकांनी तिला सावरले आणि तिला समजावले, "शारदा, तुझ्याकडे रूप रंग नसला म्हणून काय झाले, तुझ्याकडे ज्या कला आहेत त्या लाख मोलाच्या आहेत. आणि तुझा स्वभाव एवढा प्रेमळ मायाळू मी आज पर्यंत आई शिवाय कुठल्या ही स्त्रीत पाहिला नाही. मी तुझ्या स्वभाव व कार्य सौंदर्यावर खूप खूष आहे. माझी होशील का राणी?" असे म्हणून त्याने तिचा हात धरला.