काकस्पर्श
काकस्पर्श
हा लेख लिहिण्या मागे कोणाच्या ही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तीचे विचार ,मत या बाबतीत वेगवेगळे असू शकते. शेवटी ज्याला जे पटते किंवा ज्या चालीरीती असतील तसेच जो तो वागत असतो. मला जे वाटते माझे जे मत आहे ते मी इथे मांडणयाचा प्रयत्न केला आहे. उगाच गैरसमज किंवा वाईट उद्देशाने हा लेख लिहिला गेला नाही. जे वाटले ते लिहिले हे फक्त माज्या पुरते विचार आहेत. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. साधारण 2/3 वर्षा पूर्वीची घटना आहे. आमच्या नात्यातील एका आजी चे वृद्धापकाळाने निधन झाले. आजी बरेच वर्ष छान जगल्या. त्यांना तीन मुलं होती काही ही कटकट नवहती. साऱ्या इच्छा अपेक्षाची पुर्ती झाली होती समाधानाने त्यांचा मृत्यू झाला होता. ते ही आजारपणा मुळे बाकी आयुष्य चांगले जगल्या होत्या. त्या आजींच्या तिसरा होता. त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. बरेचसे नातेवाईक त्या कार्यक्रमाला आले होते. तिसऱ्या दिवशीचा कार्यक्रम हा शक्यतो सकाळीच असतो. सकाळी सकाळी आम्ही त्या आजीच्या गावी गेलो. त्यांच घरापासून थोड्या अंतरावर एक नदी होती तिथेच स्मशान घाट होता. आम्ही सगळे तिथे गेलो. आजीची मुले सुना नातवंडे सगळे होते. आजींना आवडणारे सर्व पदार्थ सुनांनी बनवून आणले होते. तो नैवद्य एका केळीच्या पानावर ठेवून पूजा केली अगरबत्ती लावली.एक एक करून सर्व नातेवाईक त्या नैवेद्याला नमस्कार करून आले. मला मुळात ही संकल्पना पटत नाही पण नाईलाजाने अशा कार्यक्रमाला जावे लागते. पण मी दुरुनच हात जोडले. आता सर्वजण कावळयाची वाट पाहत बसले. तिथे भरपूर झाडी होती आणि मुळात ते खेडेगाव होते. पण दूर दूर पर्यंत कुठेच कावळे दिसत नवहते. एक तास झाला तरी एक ही कावळा त्या नैवेद्य कडे फिरकला सुद्धा नाही. मग कोण बोलले की आजीची कोणती इच्छा अपूर्ण राहिली आहे का? काय त्यांच्या मनात होते का? तेव्हा मुल आणि सुनां नी त्या नैवेद्य जवळ जाऊन पुन्हा हात जोडले. अशातच दोन तास झाले. आलेले नातेवाईक आपलं काम सोडून इथे आले होते हळूहळू ते ही कंटाळून गेले. ज्याला त्याला परत जाण्याचे वेध लागले होते पण काय करणार? जो पर्यंत कावळा पिंडाला शिवत नाही तो पर्यंत तिथून हलायचे नसते. कावळयाला तिथे बोलवण्याचे खूप प्रयत्न केले पण बिलंदर कावळा काही तिथे येईना. असेच तीन तास झाले आता मात्र सगळ्याचा नाईलाज झाला. आता वाट बघणे बास आणि आपण निघून जाऊ मग येईल कावळा कदाचित असे एकमताने ठरले. सगळे नातेवाईक सुटलो बुवा एकदाचे म्हणत घरी जायला निघाले. कारण तिथे एकाच जागी उभ राहून सगळ्याचे पाय कामातून गेले होते.
आपल्या हिंदू धर्मात असा समज आहे की कावळा पिंडाला चटकन शिवला तर मृत व्यक्तीच्या सर्व इच्छा तृप्त झाल्या असे मानायचे नाहीतर काहीतरी इच्छा बाकी राहिली असे समजले जाते. अन्नाकडे कावळा फिरकलाच नाही तर कावळयातून प्रकट होणाऱ्या आत्म्याला वचन द्यायचे की काही बाकी राहिले असेल तर तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. प्रत्येक प्राण्याला किंवा पशूला आपल्या जीवाची भीती असते. इतर वेळी आपल्याला हुसकावून लावणारी माणसे आज का आपल्याला बोलवत आहेत? या मागे आपल्या जीवाचे काही बरे वाईट तर नाही ना? अशी शंका कावळ्यालाही येत असेल. भूक नसतानाही आवडीच्या पदार्थांवर ताव मारणे ही वृत्ती माणसाची आहे कावळ्याची नाही. कावळा पिंडाला शिवणे या वरून मृत व्यक्तीच्या इच्छापूर्तीचा निष्कर्ष काढण्याची घाई माणसालाच असते. समजा एखादा व्यक्ती आजन्म शाकाहरी असेल आणि त्याच्या मृत्यूनंतर मांसाहारी पदार्थ पिंड म्हणून ठेवला तर काय कावळा त्या पदार्थांला तोंड नाही लावणार का? कारण मृत व्यक्ती शाकाहारी होता म्हणून? नाही उलट मांसाहार हा कावळयाचा आवडीचा आहे तो लगेच ते खायला तुटून पडले. मग अशा पद्धती आणि रीतीरिवाज खरंच गरजेचे आहेत का? असा प्रश्न पडतो? कावळ्यासाठी कामधाम सोडून ताटकळत बसणे योग्य की अयोग्य? तुम्हाला काय वाटते वाचक हो? तुमची मते, विचार आवर्जून सांगा. काळासोबत जरा डोळसपणे वागायला हवे की नको?