जीवनातील आनंद
जीवनातील आनंद
आनंदी जीवन किंवा जीवनातील आनंद हा एक गहन विषय आहे. आनंदी जीवनाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत .कोणासाठी तो भौतिक सुखात म्हणजे पैसा, ऐश्वर्य .कोणी तो नात्यांमध्ये शोधतो तर कोणाचा अध्यात्मात असू शकतो .
आनंद नुसता चेहऱ्यावर दिसून चालत नाही तर तो आत्मिक असावा लागतो .काही माणसे वरून खूप आनंदी दिसतात पण खरंतर दुःखाने ग्रासलेली असतात. कुणाला ईतरांना आनंदी पाहण्यातच आंनद वाटतो. तर काहीजण स्वतःचा आनंद स्वतः शोधतात.
भूतकाळातल्या कटू आठवणी आठवून दुःखी राहण्यापेक्षा वर्तमानातील क्षणांमध्ये आनंद मानावा. शाळेत असताना ऐकलेली" आनंदी आनंद गडे इकडे, तिकडे चोईकडे" ही कविता मनाच्या कोपऱ्यात जिवंत ठेवावी. आपल्या संतांनी ,तुकाराम महाराजांनी आनंदाचे किती सुंदर वर्णन केले आहे ."आनंदाचे दोही आनंद तरंग". खरंच तासंतास रांगेत उभे राहून आषाढी वारीला विठुरायाचे दर्शन घडले म्हणजे वारकऱ्यांसाठी परमानंदाचा क्षण .असह्य प्रसववेदना सहन करून बाळाचे मूख पाहिल्यावर आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ,वर्षभर मातीत राबून सोनेरी टपोरी मोती पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, दुष्काळात एक अन्नाचा कण मिळाल्यावरचा आनंद काय वर्णावा .
आनंद माणसांनाच होतो असे नाही .पशु पक्षांनाही होतो. पावसात थुई थुई नाचणारा मोर ,वसंत ऋतुच्या आगमनाने भेधुंद होऊन गाणारा कोकीळ , वाट चूकलेल्या वासराला अचानक आई मिळाल्याचा आनंद, त्याच्या हंबरन्यावरुंन कळतो.बऱ्याच वेळाने मालक भेटल्याचा आनंद कुत्र्याच्या, मांजराच्या चेहऱ्यावर दिसतो.
आनंदाकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा .भौतिक सुखाकडे धावावे की अलिप्त राहून अध्यात्मिक सुख शोधावे आपणच ठरवावे.
