Shilpa Dange

Abstract

2.8  

Shilpa Dange

Abstract

जीवन

जीवन

2 mins
182


नदी सागराला मिळते अन् कशाचीही पर्वा न करता आपलं गोड पाणी सागराच्या खारट पाण्यात मिसळून खारट करते. पण सागरही त्याची परतफेड करतोच की मेघांना जन्म देऊन. मेघांच रुपांतर पावसात होतं आणि पाऊस गोड पाणी नदीला देउन तिचं अस्तित्व अर्थपूर्ण बनवतो. जसं सागराचं पाणी खारं हे खरंय तसं अश्रुजल पण खारट हेही तेवढंच खरं! या निसर्गासारखंच निर्व्याज मन मानवाचं असतं तर?काही नात्यांचा आपल्याला फायदा /नफा /उपयोग होत नाही पण हीच नाती आपल्या जीवनाला अर्थपूर्ण श्रीमंती देतात.


सागर कसा भरती अन् ओहोटीमध्ये तेवढ्याच उल्हासाने निखळ वाहत राहतो तसं आपणही निखळ मनाने, स्वच्छंद आनंदाने, उत्साहाने

भरभरून जीवन जगावं,नाही का? आपण नेहमी आपल्याच भावनांना वाव देतो पण कधी या सुंदर निसर्गाच्या मनाचाही विचार करावा जो आपल्याला सतत आनंद देऊन आपल्या जगण्याला अर्थ देतो .तर नदी आणि सागराचं नातं असंच अतुट आहे.नदीचा सागरापर्यंतचा प्रवास खडतर असूनही ती सागराला मिळेपर्यंतच्या तिच्या अव्यक्त,निरागस,प्रेमळ भावनांची ही कथा.

 

तिच्या घराला समुद्राचे दारं होते आणि खिडक्यांना लाटांची तावदानं आणि वर खुळ्या ढगांचं छत.कित्येक वर्षं खिडक्यांना उजळणार्‍या अस्ताचलाच्या सोनेरी रविबिंबांची ती साक्षीदार. उन्हं तुषारांच्या रांगोळ्या रेखत असताना सागरात होणारी पाण्याची उलाघाल रोजचीच! अथांग सागरात विरघळून जाणारी ती छोटीशी नदी. ती सागरात मिसळल्यावर तिचं समाधान म्हणजेच अस्पष्टपणे भरतीच्या वेळी ऐकू येणारा

तिचा उसासा!! तिच्या जिवाची नुसती घालमेल,बेचैनी... ती म्हणजे नदी... वाहात निघालेली! त्याच्या दिशेने.. तिच्या सागराच्या दिशेने! कोण होता हा समुद्र? या प्रश्नाला उत्तर नाहीच. तिच्या मनात नुसता शंकांचा समुद्र!! तिचं स्वागत होईल? कदाचित. तोच उसासा पुन्हा एकदा! तिच्या मनात कुढत राहीला. तो स्वागत करेल का माझं मधली अस्वस्थता,अस्थिरता!!

ती ऐकते कुणीही न बोलता एक हाक! Oh sea..वाट पाहतेय ती !! वाळूवर उमटलेल्या पावलांचे ठसे मोजत, कधी येणार्‍या लाटेला आपलं म्हणत उभी आहे तिथेच..फक्त एकदा बघ स्नेहार्द्र नजरेने! लाटांची आवर्तनं रोजचीच आणि सूर्य गिळण्याचा हव्यासही रोजचाच!! असलं जीणं तिला नदीला परवडतच नाही. कुठून कुठून वाहात आलेल्या लहानमोठ्या झर्‍यांची चिंता. त्यांनी आणलेल्या सुगंधित फुलांची आणि वाळलेल्या पाचोळ्याचीही!! पानगळीची चिंता समुद्राला कधीच नसते.... नदीला मात्र पानांची कलेवरं वाहून न्यायची असतात. तीसुद्धा भर उन्हात..सावलीशिवाय! आणि मग अशीच ती थोडा जिवंतपणा शिल्लक असताना थोडी थोडी करत नष्ट होऊन विदीर्ण होते..त्या अथांगात.


ती अशीच तुटत गेली असावी.. कुणीतरी अज्ञाताची वाट पाहाणं हे जिकिराचं कर्तव्य शेवटपर्यंत पार पाडत राहीली असावी... आणि मला तुझ्यात सामावून घे? नंतरचं विनवणी करत येणारं प्रश्नचिन्ह ही वाहत राहिली असावी..!!! कुणाचीतरी सोबत असणे...कुणाचेतरी आपल्यासाठी असणे ,जगणे या शब्दांत प्रेमाची व्याख्या म्हणा किंवा principle म्हणा दडलेलंच असतं. ते तसं होऊ न शकणे म्हणजे मनाचा अवेळी झालेला पालापाचोळा. जगणं उध्वस्त करणारा!! एकटेपणा खूप सोसावा लागतो...खूप हिम्मत लागते सगळं एकटं पचवायला...नदी तेच करते सागरापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास जिवघेणा असतो..तरीही वाहत राहते विरघळेपर्यंत ती त्याच्यात..त्याच्या खारेपणाचा थोडाही विचार न करता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract