नासा येवतीकर

Drama

3  

नासा येवतीकर

Drama

गुरुदक्षिणा

गुरुदक्षिणा

5 mins
403


सरांशी मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ. गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ. गिरीश ज्या दाते मेमोरियल हॉस्पीटलमध्ये काम करत होता त्या मुंबईच्या दवाखान्यात येणे आवश्यक होते. यासाठी मला काय करता येईल? याच विचाराच्या तंद्रीत खुर्चीला मान टेकवून मोटे सरांनी संकटात आपणासं कशी मदत केली? त्याच्या मदतीने आपण आज या खुर्चीवर बसू शकलो नाही तर.. गिरीश मनोहर काकडे हा सातपूर गावातील राहणारा. त्याच्या आईवडिलांकडे एक गुंठासुध्दा जमीन नव्हती. मोलमजुरी करुन ते आपला उदरनिर्वाह करीत. सुटीच्या दिवसात गिरीशसुध्दा त्यांच्यासोबत मजुरीला जाऊन तेवढाच वडिलांच्या कारभाराला हातभार लावीत असे. गिरीशच्या वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. तर त्याची आई अक्षरशत्रू होती. सातपूर गावात फक्त सातवीपर्यंतचीच शाळा होती. पुढील शिक्षणासाठी येथील मुलांना दहा किमी दूर असलेल्या तालुक्याच्या गावी जावे लागत. तेथे जाण्यासाठी ना बसची सोय ना रेल्वेची. शिकायचं असेल तर तेथेच जाऊन रहावे लागायाचे. गिरीश चांगले मार्क घेऊन सातवी पास झाला. पुढील शिक्षणासाठी त्याला आता तालुक्यातला जायचे होते. पुढे शिकण्याची त्याची खुप इच्छा होती. परंतु घरची आर्थिक बिकट परिस्थिती आणि आईच्या हट्टामुळे गिरीशच्या शिक्षणावर पाणी पडणार, असे वाटतांना त्याच गावातील परंतु तालुक्याच्या ठिकाणच्या सरस्वती विद्यालयात गणिताचे शिक्षक असलेले श्री विनायक संपतराव मोटे यांनी गिरीशच्या वडिलांना खूप समजाविल्यानंतर ते गिरीशला पाठविण्यास तयार झाले. 


गिरीश हा एक चुणचुणीत आणि चाणाक्ष विद्यार्थी होता. सातव्या वर्गात त्याला 80 टक्के गुण मिळाले होते. मोटे सरांनी त्यांचे गुणपत्रक पाहिले आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची शाप दिली. गिरीशला मोटे सरांची फक्त तोंडओळख होती. परंतु आज त्यांना जवळुन पाहतांना ते खरोखरच नावाप्रमाणे मोठे जाणवत होते. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशीच मोटे सरांनी त्याला आपल्या सायकलवर बसवून शाळेला नेले. त्यांच्याच सरस्वती शाळेत आठव्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. शहरातली ती मोठी शाळा पाहून गिरीश हैरान झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगावर महागडा पोशाख होता, पायात पायमोजेसह बुट होते आणि दोन्ही खांद्याला बॅग लटकवलेली होती. तर गिरीशकडे फाटलेला ड्रेस, पायात फाटकी चप्पल आणि मेनकापडात काही वहया, आपला येथे निभाव लागणार नाही या विचारात तो चितांग्रस्त बनला होता. सरांनी त्याला प्रवेश तर मिळवून दिला परंतु रहायचे कोठे आणि खायचे काय? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. प्रवेश झाल्यानंतर दिवसभर शाळा करुन सायंकाळी सरांनी गिरीशला घरी नेले. एक, दोन,नव्हे तब्बल पंधरा दिवस त्यांनी गिरीशला आपल्या घरी ठेवले, त्याला जेवण दिले. सातव्या वर्गात त्याला चांगले गुण होते म्हणून सरांनी शासकीय वस्तीगृहात अर्ज भरुन दिला होता. सरांना व गिरीशला त्याचीच प्रतिक्षा होती. वसतीगृहात नंबर लागतो की नाही. अखेर तो आनंदाचा दिवस उजाडला गिरीशला वसतीगृहात प्रवेश मिळाला. आता मोटे सरांची काळजी मिटली होती. गिरीशला वस्तीगृहात प्रवेश देऊन परततांना सरांनी गिरीशला धीर दिले आणि काही लागलं केलं तर बिनधास्त मला मागायचं, घाबरायच नाही.


गिरीश हा शांत स्वभावाचा आणि मनमिळावू वृत्तीचा होता त्यामुळे त्याला अनेक मित्र लाभले. वस्तीगृहातून त्याला पेन, पुस्तक, वही, ड्रेस आणि जेवण इ. मोफत मिळत होते त्यामुळे आता त्याला कश्याचीच काळजी नव्हती. त्याची शाळेतील तयारी खूप चांगल्या प्रकारे चालु होती. तसा तो हुशार होता परंतु शहरातल्या मुलांच्या स्पर्धेत तो मागे पडू लागला. ती सर्व मुलं श्रीमंत घरातली होती, त्यामुळे वर्गातल्या शिक्षणाबरोबरच त्यांना शिकवणी सुध्दा होतं तर गिरीश आर्थिक परिस्थितीमुळे शिकवणी लावू शकत नव्हता. इंग्रजी व गणित विषयात अधिक गुण मिळविण्यासाठी शिकवणी लावणे गरजेचे आहे. ही शंका मोटे सरांना बोलून दाखविले. मोटे सर स्वतः गणिताचे शिक्षक होते आणि त्यांची इंग्रजी ही चांगली होती. त्यामुळे सरांनी त्यास शिकवणी लावण्यास सहमती दर्शविली. त्याचाᅠ अभ्यास आता चांगला चालला होता. आठव्या वर्गातून शाळेत द्वितीय येण्याचा मान अखेर त्याला मिळाला. उन्हाळी सुट्टयांत गावी परतलेल्या गिरीशच्या तोंडावरील प्रसन्नता पाहुन आईवडिलांनाही अपार आनंद झाला. दरम्यान संस्थाचालकांनी मोटे सरांना जबरदस्तीने वॉलेन्ट्री घेण्यास भाग पाडले. ही बाब गिरीशला शाळा सुरु झाल्यावर कळाली तेव्हा खूप दुःख झाले. मोटे सर आता पूर्ण वेळ रिकामे झाले होते. दोन मुलींच्या लग्नामुळे ते स्वतः कर्जबाजारी झाले होते. परंतु त्यांनी गिरीशला हे कधी जाणवू दिले नाही. गिरीश रात्रं दिवस अभ्यास करुन माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष प्रावीण्यात तर बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतुन राज्यातून विसावा क्रमांक मिळविला होता. प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या या यशामुळे आईवडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता तर मोटे सरांना आभाळ ठेंगणे वाटत होते. गिरीशला पुण्याच्या वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश तर मिळालाच शिवाय राज्य सरकारची शिष्यवृत्ती ही.


काही वर्षांनंतर गिरीश वैद्यकीय अभ्यास पूर्ण करुन डॉक्टर बनला. स्वतःचे हॉस्पिटल थाटण्याएवढी ऐपत नसल्यामुळे मुंबईच्या दाते मेमोरियल हॉस्पीटलात नोकरी स्विकारली. आईवडिल आणि मोटे सरांचे आर्शिवाद घेऊन गिरीश मुंबईला गेला. त्यानंतर वर्ष भरानी आज मोटे सरांचे मोबाईल वर बोलणे झाले. सेवानिवृत्तीच्या दहा वर्ष अगोदरच त्यांना वॉलेंट्री घ्यावी लागली आणि दोन मुलींचा लग्नाचा बोझा त्यामुळे असली नसली पूंजी सर्व त्यातच गेली. इतरांवर नेहमी उपकार करणार्‍या सरांवर मात्र आज खूपच वाईट वेळ आली होती. अधूनमधून त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता. त्यावर ऑपरेशन हा एकच इलाज बाकी होता आणि त्यासाठी जवळपास लाख दीड लाख खर्च अपेक्षित होते. आज घडीला त्यांच्याकडे एवढी रक्कम नव्हती. गिरीशला फोन करुन त्रास द्यावा असं त्यांना मुळीच वाटले नाही. परंतु सरांचे दुखणे गिरीशच्या आईवडिलांना कळाले तसे ते शहरात धावत आले आणि याबाबतीत गिरीशची मदत घेण्याचा तगादा लावला. त्याचमुळे मोटे सरांनी आज गिरीशच्या मोबाईलवर बोलले. गिरीश दवाखान्यात कामाला येऊन वर्ष झाले नव्हते. त्यामुळे त्याच्याकडे सुध्दा पैशाची चणचण होती. परंतु एका वर्षाच्या कारकिर्दीत त्याने दाते मालकांचा आणि तेथील स्टाफमधील लोकांची मने जिंकली होती. गिरीश खुर्चीवरुन उठला आणि डॉ. दाते यांच्या केबिनकडे धाव घेतली. डॉ. दाते सुध्दा मनाने खूप चांगले होते. त्यांनी डॉ. गिरीशला होकार देत पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्या किडनीच्या ऑपरेशनची तारीख दिली.


गिरीश मनोमन धन्यवाद देत बाहेर पडला आणि आईवडिलासोबत मोटे सरांना येण्यास कळविले. डॉ.दाते यांनी ठरलेल्या दिवशी सर्व टेस्ट रिपोर्ट पाहून मोटे सरांचे किडनीचे ऑपरेशन यशस्वी रित्या पार पाडले. डॉ. गिरीश स्वतः किडनी स्पेशालिस्ट असल्यामुळे, तो जातीने तिथे हजर राहुन हे काम केले. महिनाभर दवाखान्यात व गिरीशच्या क्वार्टरमध्ये राहून ते गावी जाण्यासाठी निघाले. मोटेसर मुंबईत आले तेंव्हा ते चिंताग्रस्त होते. परंतु आज परत जातांना त्यांच्या प्रसन्न चेहर्‍याने डॉ. गिरीशला मनातल्या मनात खूप आनंद होत होता. आज माझ्या मुलांने आपल्या गुरुला खरी गुरुदक्षिणा दिल्याचा अभिमान डॉ. गिरीशच्या आईवडिलांना वाटत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama