नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस

5 mins
204


महाराष्ट्र पोलीस म्हणून संजनाची निवड झाल्याचे पत्र घेऊन ती राजे सरांकडे आली. सर आपल्या घरातील बैठकीत टीव्ही पाहत बसले होते. अचानक संजनाला पाहून ते म्हणाले, " अरे, संजना, आज सकाळी सकाळी कसे काय येणं केलीस ? " संजनाने घरात येताच सरळ राजे सरांच्या पायावर आपले डोके ठेवली आणि भावनाविवश झाली. सरांना काहीच कळेना, सर म्हणाले, " संजना, काय झालंय, तुला रडायला ? " यावर संजना म्हणाली, " सर, महाराष्ट्र पोलीस मध्ये माझी भरती झाली. तुम्ही केलेली मदत फळाला आली." हे ऐकून सरांना देखील खूप आनंद झाला. सर म्हणाले, " अभिनंदन संजना बेटा, तुला आज तुझ्या मेहनतीचे फळ मिळाले. अशीच प्रगती करत राहा माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. " यावर संजना सरांना धन्यवाद देत पेढ्याचा बॉक्स हातात दिला. सरांनी तिला बसण्यास सांगून आपल्या सौभाग्यवतीला आवाज दिला, " अगं ऐकलीस का, संजना पोलीस झाली." सरांची पत्नी स्वयंपाक घरातून अभिनंदन अभिनंदन म्हणत बाहेर आली. संजनाने त्यांचे ही पाया पडून आशीर्वाद घेतली. थोडा वेळ गप्पा मारून ती निघून गेली. तेव्हा राजे सर भूतकाळातील घटना आठवण करण्यात गुंग झाले. 

संजना सातवी पास होऊन आठव्या वर्गात राजे सरांच्या हायस्कुलमध्ये प्रवेशित झाली होती. राजे सर त्या शाळेत गणित विषय शिकवायचे. त्या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील गरीब होते. बहुतेक विद्यार्थ्यांना गणित विषय खूपच अवघड जात असे. कारण प्राथमिक शाळेत त्यांच्या गणिताच्या संकल्पना स्पष्ट झाले नसल्याने माध्यमिक शाळेत गणित काही समजायचे नाही. राजे सर हे सारे जाणून होते, त्यामुळे त्यांनी या विद्यार्थ्यांना एका वेगळ्या पद्धतीने शिकवायचे. गणित विषय अवघड वा कठीण नसून खूप सोपे आणि मनोरंजनात्मक आहे, असे विद्यार्थ्यांना सांगायचे. तश्या प्रकारे शिकवून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करायचे. संजनाला देखील गणित विषय कठीण वाटायचे. पण राजे सरांच्या शिकवणीमुळे तिला गणित विषयात गोडी निर्माण झाली आणि गणित हा तिचा आवडीचा विषय बनला. अर्थात त्यामुळे ती राजे सरांची देखील आवडती विद्यार्थी बनली. 

शहरापासून तीन किमीवर असलेल्या एका छोट्या गावातून संजना रोज शाळेला येत होती. तिचे आईवडील शेतात मोलमजुरी करायचे. घरची गरीब परिस्थिती होती मात्र संजनाच्या मनात शिकण्याची खूप जिद्द होती. शरीराने ती हडकुळी होती. आईच्या कामात मदत करता करता शाळेला जाण्यास कधी उशीर झाला तर ती आपल्या गावापासून शाळेपर्यंत धावत धावत 15-20 मिनिटांत पोहोचायची. बहुतांश वेळा तिला धावतच शाळेत यावे लागायचे कारण सकाळचे काम लवकर संपतच नव्हते. या रोजच्या धावण्यामुळे ती शालेय क्रीडा स्पर्धेतील धावण्याच्या वेगवेगळ्या प्रकारात पहिला क्रमांक मिळवीत गेली. धावण्याच्या स्पर्धेत तिने तालुका आणि जिल्हा स्तरावर देखील आपल्या शाळेसाठी बक्षीस मिळविली होती. एके दिवशी राजे सरांनी तिला सहज विचारले, " संजना, शिकून तुला काय व्हावे असे वाटते ? " प्रत्येक मुलांप्रमाणे ती डॉक्टर वा इंजिनिअर व्हावे वाटते पण होईन की नाही खात्री नाही पण शेवटी मला आपल्यासारखे शिक्षिका व्हायला नक्की आवडेल." राजे सरांना संजनाचा अभ्यास माहित होता आणि घरची परिस्थिती देखील त्यामुळे राजे सर म्हणाले, " संजना तुला पोलीस व्हावे असे वाटत नाही का ?" यावर संजना थोडी विचारात पडली, म्हणाली, " सर, पोलीस होणे जरा कठीण आहे वाटते." यावर राजे सरांनी पोलीस होण्यासाठी काय काय करावे लागते याची माहिती दिली आणि त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी तिला मार्गदर्शन केले. तिला देखील आता पोलिस व्हावे असे वाटू लागले होते. म्हणून आता आपल्या शारीरिक क्रियाकडे जास्त लक्ष देऊ लागली. 

अभ्यासात नियमितपणा ठेवून संजना माध्यमिक परीक्षेत उत्तम गुण मिळविले. तिला अजून पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र संजनाचे आईवडील तिला पुढील शिक्षण घेण्यास सहमत नव्हते तर तिचे लग्न लावून देण्याचा विचार करत होती. संजनाने आपल्या आईवडीलांशी शिकण्यासाठी खूप वाद केली. आईवडील ऐकत नाही हे पाहून तिने राजे सरांना फोन लावून आईवडील यांना समजावून सांगण्याविषयी सांगितले. सरांनी फोनवर समजावून सांगितले आणि संजनाचा हॉस्टेलला नंबर लावून देण्याची जबाबदारी देखील घेतली. सरांच्या बोलण्यानुसार आईवडीलांनी संजनाला पुढे शिकण्याची परवानगी दिली मात्र आर्थिक मदत मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले. राजे सरांच्या ओळखीने एका हॉस्टेलवर संजनाला प्रवेश मिळाला. ती कसेबसे दिवस काढत कॉलेज करत होती. घरून फुल नाही तरी फुलांची पाकळी समजून थोडीफार मदत मिळत होती. कॉलेजचे शिक्षण घेता घेता ती आपल्या रोजच्या शारीरिक कवायतीकडे दुर्लक्ष केले नाही. रोज सकाळी जवळपास पाच किमी जाणे येणे रनिंग करत होती. सायंकाळी वेगवेगळे खेळ खेळून स्वतःला तंदुरुस्त ठेवत होती. कॉलेजमध्ये ही ती विविध खेळात बक्षीस जिंकली होती. या सर्व बक्षिसाचा फायदा तिला पोलीस भरतीच्या वेळी होणार होता. म्हणून ती कॉलेज कडून खेळता खेळता स्वतःचे ही भविष्य रचू लागली होती. हॉस्टेलमध्ये राहून दोन वर्षे निघून गेले. या दोन वर्षात तिची पोलीस भरतीसाठीची भरपूर तयारी झाली होती. बारावी झाल्यावर तिला घरी जाणे भाग पडले. तिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेण्याची इच्छा झाली. मात्र यास आईवडील तयार होत नव्हते. त्यांनी तर तिच्या लग्नाची पूर्ण तयारी करून ठेवली. पण संजना स्वतःच्या पायावर उभा होईपर्यंत लग्न करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. मदतीसाठी परत राजे सरांशिवाय तिच्या समोर दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता. म्हणून तिने परत राजे सरांना फोनवर संपर्क करून पोलीस प्रशिक्षण विषयी विचारणा केली आणि आर्थिक मदत करण्याची विनंती केली. यावेळी संजनाच्या आईवडिलांनी आर्थिक प्रश्न तर मांडलाच शिवाय तिला बाहेर पाठविण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राजे सर काहीच करू शकत नव्हते. पण पोलीस प्रशिक्षण केंद्र चालविणारे थोरात सर हे त्याचे माजी विद्यार्थी होते. ते देखील गरीब कुटुंबातील होते आणि त्यांना त्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी थोरात सरांना संपर्क करून संजनाची पूर्ण माहिती दिली व तिला मदत करण्याविषयी सांगितले. 

राजे सरांच्या बोलण्यामुळे थोरात सर एके दिवशी संजनाचे घर गाठले. तिच्या आईवडिलांना प्रशिक्षणाविषयी सर्व माहिती सांगितले आणि या परीक्षेत संजना नक्की यश मिळवेल आणि ती पोलीस होईल, असा विश्वास दिला. तेव्हा तिचे आईवडील संजनाला प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यासाठी तयार झाले. पण याचे पैसे कुठून आणणार ? हा प्रश्न त्यांच्या मनात होते. त्यावेळी थोरात सरांनी राजे सरांचे नाव न सांगता तिच्या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची सोय झालेली आहे, तरी तुम्ही त्याची काळजी करू नये असे सांगितले. दुसऱ्या दिवशी पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतली. तेथेच राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली होती. काही दिवसात पोलीस भरतीची जाहिरात निघाली. काही करायचं पण पोलीस व्हायचं या निष्ठेने ती कसून तयारी करत होती. मैदानावरील सर्व खेळ प्रकारात ती अव्वल होती आणि अभ्यासात बरी होती. अखेर पोलिस भरतीची परीक्षा झाली. त्यात ती चांगल्या मार्काने पास झाली. मैदानी चाचणीत देखील पात्र ठरली. अखेर तिला महाराष्ट्र राज्य पोलीस म्हणून नेमणुकीचे पत्र मिळाले. त्यादिवशी तिला आकाश ठेंगणे वाटत होते. संजनाने ते आदेश घेऊन थोरात सरांना धन्यवाद सांगण्यासाठी प्रशिक्षण केंद्रात गेली. त्यावेळी थोरात सर म्हणाले," संजना धन्यवाद मला देऊ नको, कारण तुझ्या यशात माझा थोडा वाटा आहे पण राजे सरांचा सिंहाचा वाटा आहे." यावर संजना चकित झाली. ती म्हणाली, " कसे काय सर, मला काही कळाले नाही." थोरात सरांनी राजे सरांसोबत झालेले बोलणे सांगितले. संजनाच्या पोलीस बनण्याच्या स्वप्नासाठी जो काही खर्च येणार होता तो सारा खर्च राजे सर उचलले होते. पण ही गोष्ट संजनाला कळू द्यायचे नाही असे ही ते म्हणाले होते, त्यामुळे ही गोष्ट लपविण्यात आली होती, असे थोरात सर सांगताच संजनाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. थोडा ही वेळ न दवडता ती थेट राजे सरांच्या घरी गेली. राजे सरांना पाहताच तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू गळू लागले. ती मनातल्या मनात विचार करत होती की जर राजे सर जीवनात आले नसते तर मी कधीही पोलीस होऊ शकले नसते. याच विचाराने ती राजे सरांच्या पायावर पडली होती. संजना पोलीस झाल्याचे पाहून राजे सरांना ही समाधान वाटले. 


Rate this content
Log in