एकांत
एकांत
तेजस्विनी बागेतील लॉनवर एकटीच बसली होती. अजून सूर्योदय झाला नव्हता. इतक्या पहाटे ती इथे येऊन का बरं बसली असेल ? ती दूरवर टक लावून पाहत बसली होती. नेहमीप्रमाणे हसणारी, बागडणारी, खोड्या काढणारी तेजस्विनी कुठेतरी हरपली आहे असं वाटत होतं. काही वेळाने सूर्योदय झाला. कितीतरी माणसे सकाळी मॉर्निंग वॉकला तिथे येत. आजही बरीच माणसे होती. पण तेजस्विनी त्या सर्वांपासून अलिप्त एकटीच बसली होती. जॉगिंगला आलेल्या जयला ती दिसली. तसा धावत तिच्याजवळ आला.
"अग तेजू, तू काय करत आहेस इथे ? ते पण एवढ्या लवकर ?"
तेजस्विनीने मान उंचावून पाहिलं. जय आहे हे पाहूनही तिने पुन्हा शून्यात नजर लावली.
"अरे बोल ना.. काय झालं ? बोलत का नाहीयेस ?"
"काय बोलू ? "
तेजस्वीनीची नजर झुकलेली होती.
"तेजू, तू ते सगळं माझ्याशी बोलू शकत्येस जे तुला शेअर करावसं वाटत आहे. "
तेजस्विनी फक्त हसली. तिच्या हसण्यात वेदना जाणवत होत्या.
" जय, तुला एक प्रश्न विचारू ? अगदी खरं खरं उत्तर देशील ? "
"हा विचार ना. "
"मी तुला नकार दिला होता जय; पण आज मी तुला होकार दिला आणि तुला कळलं की मला दुर्धर आजार आहे तर काय करशील ?"
तेजस्विनीची नजर त्याच्यावर रोखली गेली होती.
"तेजू, मी तुझ्यासोबत राहीन यार. हा काय प्रश्न आहे ? आणि कुठलाही आजार दुर्धर नाहीये. तुझे डॅड खूप मोठे बिजीनेसमन आहेत. ते तुझ्या उपचारांचा खर्च नक्कीच करू शकतात. "
जय तिला समजावत म्हणाला.
" ते करू शकतील..पण उपचारच होणार नसेल तर ?"
"तर.. "
जय विचारात पडला.
तेजस्विनी मोठ्याने हसत होती.
" हेच नकोय मला. माझ्याबद्दल सिरीयस विचार करत बसणारे लोक. थोडेसेच दिवस बाकी आहेत माझ्याकडे तर कोणीतरी येऊन निरपेक्षपणे माझ्यासोबत राहावं. माझ्यावर प्रेम करावं एवढीच अपेक्षा होती मला. तू ही त्या सगळ्यांसारखाच आहेस जय. म्हणून मला एकांत हवा आहे. माझे शेवटचे दिवस त्याच्यासोबत छान घालवू शकेन मी. "
तेजस्विनी तिथून उठली. जयची मान खाली गेली होती
तेजस्विनी वाट फुटेल तिथून चालतच होती.
एकांत हवा आहे मला,माझे दुःख आठवण्यासाठी..
खोट्या सुखाचे क्षण सारे, विसरून जाण्यासाठी..
सुख कसलं म्हणा, भ्रामक मृगजळच ते होतं..
गरजेच्या वेळी माझ्या,माझ्याजवळ कोणीच नव्हतं..
नकोच आता या प्रेमाच्या,मजसोबत खोट्या आठवणी..
एकांताच्या साथीने जगेन,आयुष्याच्या शेवटच्या क्षणी...