Sagar Nanaware

Inspirational

4  

Sagar Nanaware

Inspirational

आंब्याच्या झाडाला आंबेच का ?

आंब्याच्या झाडाला आंबेच का ?

3 mins
309


आत्मपरीक्षण कराच...! ‘लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ ही म्हण आजही आपल्यापैकी अनेकांना लागू होते. अनेकांना इतरांत फक्त दोष आणि उणीवाच दिसत असतात. परंतु इतरांच्या उणिवांवर बोट ठेवण्यात आपण इतके व्यस्त असतो की आपल्याला स्वतःतील दोष दिसत नाहीत. बऱ्याचदा आपण पूर्वग्रहदूषितपणा मनात ठेऊन इतरांच्यात फक्त वाईट गोष्टींनाच पाहत असतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन दिवसेंदिवस दूषित होत जातो. परिणामी लोक आपल्यापासून दुरावतात आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. संत कबीर यांनी माणसाच्या या प्रवृत्तीबद्दल आपल्या दोह्यांतून अतिशय वास्तववादी वर्णन केले आहे. ते म्हणतात,बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलया कोये। जो मन खोजा आपना, तो मुझसे बुरा न कोये॥ म्हणजेच प्रत्येक माणूस स्वतःला अतिशय योग्य समजत असतो. आणि या भ्रमात जेव्हा तो वाईट लोकांना शोधण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याच्या हाती काहीही लागत नाही. आणि यानंतर जेव्हा तो स्वतःमध्ये डोकावून पाहतो,आत्मपरीक्षण करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्यापेक्षा वाईट माणूस कोणी नाही. म्हणूनच इतरांबद्दल पूर्ण समजून घेऊन मगच आपला दृष्टिकोन ठरविणे केंव्हाही चांगलेच. माणसांच्या याच वृत्तीबद्दल एक अर्थपूर्ण गोष्ट आवर्जून शेअर करावीशी वाटते.

स्वातंत्र्यपूर्व काळात एका खेड्यात एक अतिशय गरीब शेतकरी राहत होता. शेतमाल तालुक्यातील बाजारात विकून येणाऱ्या पैशात तो आपले गुजराण करायचा. एके दिवशी तो बाजाराला गेला असता त्याची एका किराणा दुकानदारही ओळख झाली. व त्या दुकानदाराने त्या शेतकऱ्याला आपण तुझ्याकडून कडधान्ये विकत घेऊ असे सांगितले. शेतकऱ्याला अतिशय आनंद झाला त्याने त्या दुकानदाराकडून किराणा खरेदी केला आणि आनंदाने गावी गेला. पुढच्या आठवड्यात तो शेतकरी पाच सहा प्रकारच्या कडधान्यांच्या वेगवेगळ्या बांधलेल्या थैल्या घेऊन आला. दुकानदाराने ते वजनकाट्यावर वजन केले आणि त्याबदल्यात त्या शेतकऱ्याला किराणा दिला. असेच अनेक महिने चालू राहिले दुकानदार व शेतकरी दोघेही एकमेकांबद्दल खुश होते. एके दिवशी शेतकरी नेहमीप्रमाणे त्या दुकानदाराकडे आला त्याला कडधान्याच्या थैल्या दिल्या. आणि त्याच्याकडून किराणा घेऊन तो आपल्या घरी परतला. दुकानदाराने काही वेळाने त्या कडधान्यांचे वजन करायला घेतले. परंतु यावेळी प्रत्येक थैलीत १ किलोऐवजी प्रत्येकी केवळ ९०० ग्रॅम कडधान्य भरले. दुकानदार कमालीचा संतापला आणि शेतकऱ्याला दोष देऊ लागला. पुढच्या आठवड्यात पुन्हा तो शेतकरी त्या दुकानदाराकडे कडधान्ये घेऊन गेला. शेतकऱ्याला पाहून तो दुकानदार लालबुंद झाला आणि त्याला रागाने बोलला," अरे लबाड माणसा मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू मला फसवलंस? , पहिला चालता हो माझ्या दुकानातून."शेतकरी गोंधळला आणि म्हणाला, " शेठ काय झालं? माझं काय चुकलं व्हय."तो दुकानदार ओरडून बोलला," अरे तू गेल्या आठवड्यात प्रत्येक थैलीमागे १०० ग्रॅम धान्य कमी दिलेस मला. तू मला काय वेद समजतोस काय? शेतकरी हताशपणे म्हणाला, " शेठ मी लबाड नाय व्ह, कष्ट करून घामाचंच दाम घेतुय बघा."आणि राहिला प्रश्न धान्य कमी भरायचा, म्या गरीब माणूस हाय माझ्याकडं एक जुना तराजू हाय पण त्यात वजन करायला वजनच नाय." तो दुकानदार म्हणाला," खोटं बोलू नकोस, मग सर्व थैल्या बरोबर ९०० ग्रॅमच कशा भरल्या? शेतकरी नम्रतेने उत्तरला, " शेठ मी तुमच्याकडून दर बाजाराला एक किलो साखर घेऊन जातो. ती एक किलो साखर एका पारड्यात टाकतो आणि तितक्याच वजनाचे धान्य दुसऱ्या पारड्यात टाकून मोजतो." या उत्तराने दुकानदार मात्र पुरता भांबावला त्याला स्वतःचा धूर्तपणाही समजला. 

 मित्रांनो आपण जसे देतो तसेच आपल्यालाही मिळत असते. माणसाच्या चुका,दोष,उणीव किंवा कमतरता या परिस्थितीप्रमाणे घडत असतात. आणि या प्रत्येकाच्या बाबतीतच घडत असतात. म्हणूनच आपण आधी परिस्थिती लक्षात घ्यावी. परिस्थितीसापेक्ष विचार करावा आणि दुसर्यालाही त्याची बाजू मांडू द्यावी. आणि या साऱ्यातून मगच योग्य तो निष्कर्ष काढावा. आपण आपली प्रतिमा नेहमी सकारात्मक म्हणून जपायला हवी. कारण आपली प्रतिमा ही आपले नातेसंबंध, दृष्टीकोन, आपले विचार, हेतू आणि ध्येय ठरवत असते. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देताना किंवा अनुमान बांधताना यथायोग्य विचार करावा,आत्मपरीक्षण करावे. इतरांत स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी स्वतः प्रथम चांगला बदल घडवायला हवा. स्वतःला घडवण्यात इतका वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी वेळच मिळणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational