काय चूक होती?
काय चूक होती?
काय चूक होती त्यांची ? की त्यांना प्राण गमवावे लागले,
भारतमातेचं रक्षण करताना रक्त सांडावे लागले.
काय चूक होती ? त्यांची की त्यांच्यावर जीवघेणा हल्ला व्हावा,
बाबा घरी कधी येणार म्हणून मुलाने हुंदका द्यावा.
काय चूक होती त्यांची ? ते देशा साठी लढत होते.
स्वतःचा संसार बाजूला सारून इतरांचे संसार सुखी करत होते.
काय चूक होती त्यांची ? ते घरी परतण्याची वाट पाहत होते,
त्यांना तरी काय माहित ? घरी त्यांचे पार्थिव जाणार होते.
काय चूक होती त्यांची ? ज्यांना कपाळावरचे कुंकू पुसावे लागले.
लग्नात भरलेल्या हिरव्या चुड्याचे तुकडे-तुकडे करावे लागले.
काय चूक होती त्यांची ? त्यांना देशासाठी जगायचं होतं,
हृदयाच्या शेवटच्या ठोक्यात फक्त ‘जय हिंद’ म्हणायचं होतं.
काय चूक होती त्यांची ? ज्यांनी अश्रू गाळले,
देशासाठी शहीद होऊन आपले जवान अमर झाले.
काय चूक होती त्यांची ? की नियती ने असे करावे,
ज्यांच्या मुळे देशाचं आयुष्य आहे त्यांनाच दूर न्यावे.
काय चूक होती त्यांची ? त्यांनी भारतमातेवर प्रेम केलं,
प्रेमासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करून आईलाच पोरकं केलं.
