॥ तुकोबाची अभंगवाणी११३।।
॥ तुकोबाची अभंगवाणी११३।।
॥ तुकोबाची अभंगवाणी११३।।
॥जय जय राम कृष्ण हरि॥
॥ तुकोबाची अभंगवाणी११३।।
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥
आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥
*तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे॥ पंढरी निर्माण केली देवे॥*
आमच्यासारख्या भगवंताच्या भक्ताकरीता भूवैकुंठ निर्माण केले म्हणजेच पंढरी निर्माण केली असा पंढरी प्रति जीव्हाळा असणारे संत श्रेष्ठ संत शिरोमणी सत्याचेही सत्य सत्यनिष्ठ देहु निवासी जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की कन्या, गाई आणि हरीकथेचा अनादर करतो किंवा त्यांची विक्री करून जो धन कमावतो तो जातीने ब्राह्मण जरी असला तरी वृत्तीने तो चांडाळ आहे. भगवंत मनुष्यातील गुण-अवगुण पाहूनच त्याच्यावर कृपा करतो तो कोणत्याही मनुष्याची जात बघत नाही ना धर्म बघत नाही जो मनुष्य गुणवंत आहे अहंकार विरहीत आहे त्याच्यावर भगवंत आतोनात कृपा करतो. तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की जे आशाबद्ध लोक आहेत आशेने बांधलेले आहेत. सतत ते त्या आशेच्या मागे धावत असतात. असे लोक अधोगतीस जातात त्यांचा कधीही उद्धार होत नाही कारण ते स्वतःचे सार्थक कशात आहे हे पाहत नाही. तुकोबाराय एका अभंगात प्रमाण देत आहेत की विठोबाची भक्ती आणि विठोबाचे नाम गाण्यातच पूर्ण जीवनाचे सार्थक आहे. *विठोबासी शरण जावे । निजनिष्ठा नाम गावे ॥*