॥ तुकोबाची अभंगवाणी११२।।
॥ तुकोबाची अभंगवाणी११२।।


ॐ॥जय जय राम कृष्ण हरि॥ॐ *॥
तुकोबाची अभंगवाणी११२।।*
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥
वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥
जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥
पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥
पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥३॥
कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥
यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥
देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥
अर्थ:- *तुका म्हणे काही।। न मागे आणिक।। तुझे पायी सुख।। सर्व आहे।।* हे भगवंता तुला माझे काहीही मागणे नाही, काहीही अपेक्षा नाही. कारण तुझ्या चरणी सर्व सुखे आहेत आणि त्या चरणात मला लीन व्हायचे आहे. अशाप्रकारे भगवंताशी एकनिष्ठ असणारे संत श्रेष्ठ संत शिरोमणी सत्याचेही सत्य सत्यनिष्ठ देहु निवासी जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की मनुष्याने मनुष्य जन्मात येवून काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. कारण या मनुष्यजन्मात येऊनच स्वतःचा उद्धार स्वतः करू शकतो. मग नित्यनेम हा केलाच पाहिजे. अखंड नामाचा नित्यनेम धरावा. असा नित्यनेम न करता जो अन्न खातो त्याची अव
स्था कुत्र्याप्रमाणे आहे. त्याचा नित्यनेमाविण मनुष्यजन्म वाया गेल्यासारखे आहे जसे की तो रेडा फक्त ओझे वहाण्याचे काम करतो त्याप्रमाणे मग त्या मनुष्याचे आयुष्य आहे. ज्ञानोबाराय एका अभंगात प्रमाण देतात. *नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ।। लक्ष्मीवल्लभ तया जवळी।।* मनुष्यजन्मात येऊन आपल्या कुळाचा उद्धार करुण स्वतःचा उद्धार करणे हे मनुष्याचे लक्ष असले पाहिजे. पण तो या सगळीकडे दुर्लक्ष करून तो भूमीचा भार झाला आहे. तो नको ते व्यर्थ कर्म करून त्याच्या पूर्वजांना कष्टवित आहे. अखंड जो अभद्र बोलत राहतो अशुभ बोलत राहतो आणि जो स्वप्नातही खरे बोलत नाही. त्याच्या पेक्षा दुसरा पापी कोण आहे. जो स्वतः स्वतःचा स्वार्थ करतो व स्वतःचे पोट भरण्याचे काम करतो तो कधीही दानधर्म करत नाही. दारात आलेल्या अतिथीचा सन्मान करत नाही ना भिक्क्षाही वाडत नाही. जे संतांचे पूजन करत नाही आणि जे संतांचे विचार आचरणात आणत नाहीत. जे तीर्थाचे भ्रमण करत नाहीत. त्याला यमाचा फासा पडणारच आहे. त्याचे आयुष्य घडीघडीने संपत संपत आहे. तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की असे मनुष्य मनुष्यपणाची हानी करत आहेत आणि स्वतः स्वतःचा नाश करून घेत आहेत. ते भगवंताला विसरून स्वतःचा मीपणा पुढे धरत आहे. त्याने त्यांची हानी होणारच आहे. तुकोबारायांना एवढेच सांगायचे आहे की मीपणा विसरून भगवंतामध्ये विलीन होऊन अखंड त्याचे स्मरण करीत राहणे हाच नित्यनियम सर्वात श्रेष्ठ आहे.