तिचा हात सुटताना
तिचा हात सुटताना
माणसांच्या भावना मोजण्याचे परिमाण नसते हे जेवढे खरे आहे, तेवढेच हे देखील खरे आहे की भावना समजायला भावनेने ओतप्रोत असं ऱ्हदय असावं लागतं. तसं तर तिची माझी भेट झालेली नव्हती.आजही मी तिला भेटलेलो नाही. पण अंतकरणाची भाषाअंतकरणाला समजली. मला ती भावली. कदाचीत मी ही तिला भावलो असेन. नव्हे भावलोच म्हणावे लागेल. कारण मला बोलताना तसे वाटत होते. पण या भावनेत निव्वळ मैत्री होती, माझी आणि तिची सुध्दा. प्रत्येक जवळीकतेत वासना किंवा आणखी वेगळा अर्थ निघू नये. पण हे आपल्या हातात कधी कधी राहात नाही. आणि विपरीत काहीतरी होऊन बसते. शब्दाशब्दात अनेक अर्थ दडलेले असतात.बोलता बोलता कांही शब्द समोरच्या व्यक्तीला लागतात... तेव्हा आपण भान ठेवले पाहिजे हे आता पुरेपुर कळून आले. थोडा आकर्षक चेहरा असला आणि तुमच्यात एखादा कलागुण असेल तर आणखी त्यात भर पडते. आणि या बाबत माहिलाना या गोष्टीचा त्रास झाल्यावाचून राहत नाही. त्या दिवशी तिला कोणी तरी फोन केला, पेपरला आलेल्या लेखाखालचा फोन नंबर घेऊन.
वाचकांचे फोन येणे अपेक्षीत आहेच, पण हा फोन निव्वळ वाचकाचा नव्हता. तर तिच्याशी जवळीक साधन्याचा होता. लेख आवडला यापेक्षा तिची स्तुती करण्यासाठी केलेला फोन होता. त्याला तिने सामंजस्याने उत्तरे दिली. पण मनात चीड आणि राग होताच. त्याच रागात,त्याच वेळी माझ्याशी संवाद सुरू होता तिचा, मलाही तिने सुनावले......, "आपली फक्त मैत्री आहे, माझ्या प्रेमात पडू नकोस.... ! " मी चाट पडलो.मला हे काय घडते कळलेच नाही. कारण मी खरंच आणि अगदी खरंच मैत्री केली होती तिची. त्याच साठी हात पुढं होता माझा. पण तिने मला का म्हणावं असं, हा संशय म्हणावा की आक्षेप... मला खूप वाईट वाटले, मी गप्प झालो.... आपण आता या मैत्रीचा निरोप घ्यावा असं वाटून गेलं.मी कांही असंबंध शब्द वापरला का तिला ,कांही नको ते बोललो का ...याचा विचार आणि आत्मपरिक्षण करत होतो. मी स्त्री सन्मान करणारा, त्याना कधीही न दुखवणारा, मग माझ्याकडून हे असं काय घडलं असेल...? आता आपण नातं तोडावे. पण ते सहज सुलभ नव्हते.नजरेदेखत एखादया नात्याचा शेवट होत असताना डोळे पाणावत नसतील तर भावना शुन्य स्पंदनाचेच आपण ठरुत. म्हणून की काय मी रडून घेतले... नव्हे ते आपोआप घडले. पण होईन कठोर, परिस्थिती बनवेल तसे.. या विचारानं थोडं स्थिरावलो.
जुळल्या नात्याला नाव नाही देता आले मला...पण माझ्यासाठी मैत्रीच होती ती.ऱ्हदयाच्या ओलाव्यावर वाढत चाललेली. मैत्रीचे पीक बहरण्याआधीच टोळधाड यावी आणि सारं पिकंच नष्ट व्हावं.. अशी शब्द फेक झाली.मी कुठे, ती कुठे आम्ही संसारात रमलेली माणसं. शेकडो किलोमिटर अंतरावरून संवाद चालू होता. हो मी नाही प्रेमात पडणार.... तुझं काय...?का सांगावं वाटलं तसं मला..? कोण गैरव्यक्ती नंबर मिळवून तिच्याशी जवळीक साधन्यासाठी फोन करतो. किमान वर्षापेक्षा अधिक काळ ओळखत होतो आम्ही. पण फोन नाही केला कधी मी. ही माझी नैतिकता नाही वाटली तिला... शब्दांच्या जखमा भरुन येत असत्या तर बरं झालं असतं.. हसत खेळत चाललेला संवाद एकदम रंग बदलतो आणि वीज कोसळावी असं आक्रमण होतं... सावरता सावरता त्रेधा उडाली माझी. मी स्वतःला अपराधी समजत राहिलो, काय चुकले कांहीच कळले नाही... मी काय बोललो. मी कोणता नको तो शब्द तिला बोललो..... आणि हो मैत्रीत प्रेम नसते...? ते नसावे का....? मी खूप विचार केला.त्याचा मला खूप त्रासही झाला कारण मी प्रांजळ होतो..., वागताना निर्मळ होतो..
मी दोष नाही देणार तिला. ती पण मला दुखावण्या हेतूने नाही बोलली असं मला तरी वाटते. पण एकदा जीव गुंतला तर गुंता सुटत नाही. आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला तर वेदना होतात. हे ओळखून मला सूचीत करायचे असेल तिला. पण खऱ्या अर्थानं आताच तिचा मी अधीक विचार करू लागलो... पण एक मित्र म्हणूनच.आमच्यात पुन्हा संवाद होणार नाही, आम्ही पुन्हा एकमेकांचे मित्र होणार नाही, आमच्यातील दुरावा मलाच छळतो की तिलाही... असे विचारवादळ उठले होते. तिचा मैत्रीचा हात सुटताना खुप छळवणूक झाली मनाची. समज गैरसमजामुळे. तिला काय वाटते अगर वाटले हे तिने नाही सांगितले. पण संवाद पूर्वरत झाला आहे. तू दूर दूर आहेस, खूप दूर पण माझ्या मनात आहेस एक मित्र म्हणून.... पुढं केलेला हात हातात घे. निखळ मैत्रीची वीण घट्ट होवू दे.