Rupali Shinde

Inspirational

2.6  

Rupali Shinde

Inspirational

स्त्रीस्वातंत्र्यवादीनी!

स्त्रीस्वातंत्र्यवादीनी!

4 mins
23.3K


भक्तीला आत्मशोधाचे आणि आत्मस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन भक्ताचे अवघे जगणेच समाजाभिमुख असण्यातील विसंगती, परस्परविरोध नाहीसा करणारी मुक्ताबाई स्त्रीस्वातंत्र्यवादीनीच आहे.


वारकरी संप्रदायातील पहिली संत स्त्री मुक्ताबाई हिला आपण नेहमीच एका परिपूर्ण रूपात पाहिले आहे. आपल्या तीनही भावंडांच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनात शीतल सावली होऊन मुक्ताबाई जगली. तिचा आजवर आपण विचार केला, तो परिपक्व माणूस म्हणून. तिने मायेच्या आणि भक्त जाणीवेच्या अधिकारवाणीने ज्ञानदेवांना केलेला उपदेश म्हणजे 'ताटीचे अभंग' ही तिची रचना होय. तिने रोकड्या, काहीशा बोचऱ्या शब्दांनी भक्त नामदेवाला केलेला प्रश्न,

अखंड जयाला। देवाचा शेजार। कारे अहंकार। नाही गेला।।

हे तिचे उद्गार महत्त्वाचे आहेत. येथे आपल्याला चिकित्सक भक्त मुक्ताबाई दिसते. असाच प्रत्यय योगी चांगदेव आणि मुक्ताबाई यांच्या संवाद भेटीमध्ये येतो.


चतुर्दश वयाने लोटली। परी नाही गेली। मनोभ्रांती।।

व्यर्थचि सायास योगाभ्यासी केले। नाही ओळखिले। आत्मतत्व।।


पहिल्या भेटीत योगी चांगदेवांना आध्यात्मिक जाग आणणारी मुक्ताबाई पुढे त्यांची गुरू माऊली झाली. वयाने लहान, धाकटी; परंतु अधिकाराने मोठी आणि योग मार्गाने भक्ती करीत विश्व चैतन्याशी एकरूप होणारी मुक्ताबाई. प्रगल्भता ही तिची ओळख आपल्या मनावर कोरलेली आहे.


त्याबरोबर किंवा त्याहीपेक्षा भक्त मुक्ताबाईची जडणघडण, भक्तिमार्ग अनुसरल्यानंतर झालेला तिच्या जाणीवांचा विकास, हा अधिक महत्त्वाचा आहे. अर्थात, याची सुरुवात वारकरी संप्रदायाने रुजविलेल्या तत्त्वज्ञानामध्ये आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी स्त्रियांना संन्यास घेण्याची, परमार्थ साधना करण्याची मोकळीक दिली. हा त्यांनी घेतलेला खूप मोठा निर्णय होता. वारकरी संप्रदायाने त्याही पुढे जाऊन अधिक क्रांतिकारक पाऊल उचलले. मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी स्त्रीदेह हा अडथळा, अडसर नाही. भक्ती करणाऱ्या स्त्रीला याची देही, याची जन्मी परम चैतन्याशी एकरूप होण्याचे, मुक्तीचा अनुभव घेण्याचे स्वातंत्र्य वारकरी संप्रदायाच्या आचार-विचारांमध्ये समाविष्ट करण्याचा धाडसी निर्णय ज्ञानेश्वरांनी घेतला. मुक्तीच्या वाटेने जाण्याचा, भक्ती असणे हीच आपली नवी ओळख प्रस्थापित करताना सर्वांत कठीण असा योगमार्गाचा पुरस्कार करण्याचा मुक्ताईचा निर्णय दीपस्तंभाप्रमाणेच दिशादर्शक आहे. तो जगण्याला स्वायत्त अर्थ देणाऱ्या स्त्रियांसाठी प्रकाशाची वाट आहे, असे नेहमीच म्हणता येते. जगण्याचे स्वतंत्र प्रयोजन, कारण शोधणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी दुहेरी स्वरूपाची असते. तिला स्वत:च्या जगण्याला आकार द्यायचा असतोच; पण त्याशिवाय त्या जगण्याचा विधायक अर्थ समाजजीवनाशी जोडून द्यायचा असतो. या दिशेने विचार केला, तर मग मुक्ताबाई सतत भक्त आणि मानवी आचरण, मानवी व्यवहार, त्यांचा परस्परांवरील परिणामाचा, भक्ती-नैतिकता, भक्ती-सामाजिक सदाचरण यांच्या परस्परसंबंधांचा शोध घेत होती. मुक्ताबाईने तिच्या जगण्याला भक्तीच्या माध्यमातून आत्मशोध घेणे, हा स्वतंत्र अर्थ दिलेला आहे.

आत्मस्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भक्त मुक्ताबाईचे हे रूप लोभस आहे; परंतु संतसाहित्याच्या अभ्यासकांनी अधिकार वाणीने बोलणाऱ्या मुक्ताबाईची अधिक दखल घेतली. भक्त होऊन गुरू ज्ञानदेवांना प्रश्न विचारणाऱ्या लहानग्या मुक्ताबाईच्या संवादपर अभंगांची दखल क्वचित घेतली जाते. धाकट्या बहिणीच्या नात्याने आणि ज्ञानलालसेमुळे मुक्ताबाईने विचारलेल्या प्रश्नरूपी अभंगांचा विचारही करायला हवा.

मुक्ताबाईने ज्ञानदेवांना विचारलेल्या शंका या तत्त्वचर्चाच आहेत. त्यात बहीण-भावाच्या नात्यातील लळा, जिव्हाळा मिसळल्यामुळे त्या रूक्ष, कठोर ज्ञानचर्चा होत नाहीत. लहान मुलाने आईला प्रश्न विचारण्यातील बालसुलभता त्या अभंगांमध्ये उतरलेली आहे.

विटेवरी मूर्ती दिसते सगुण। सगुण का निर्गुण म्हणू दादा।।१।।

सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण। वाचेचे भिंग पडले दादा।।२।। (अभंग क्र. ४)


मुक्ताबाईच्या मनातील गोंधळ ओळखून ज्ञानेश्वर तिच्या शंकांचे निरसन त्यांच्या स्वभावातील ऋजुतेसह देतात.


ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई। सांगेन ते पाही गुरूमुखे।।१।।

निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला। कर्दम तो झाला एकाएकी।।२।।

स्थापिलासे गेला सगुणाचा साकार। तयाचा आधार एक आहे।।३।। (अभंग क्र. ५)


ज्ञानदेव मुक्ताईच्या प्रश्नांना उत्तरे देतात. हा सहज घडणारा संवाद गुरू-शिष्य यांच्यातील आदरयुक्त समानता मनोमन जपत केला जातो. म्हणूनच स्त्री-पुरुष विषमतेचे आणि संकुचित स्त्रीत्वाचे गालबोट ज्ञानदेव-मुक्ताईच्या संवादाला लागलेले नाही. या संवादात मुक्ताबाईच्या मनातील जिज्ञासा, चिकित्सा उत्तरोत्तर वाढलेली दिसते. म्हणून भक्त आणि साधक अवस्थेतील मुक्ताबाई पुढे प्रगल्भ झाली; पण तिच्या व्यक्तिमत्त्वातील भक्त आणि त्याचे आचरण, भक्त व समाज यांचे नाते, भक्तियोगातील सामाजिक आशय, यांच्यातील आत्मशोध घेण्याची प्रेरणा अखंड जागृतच राहिली. मुक्ताईने नामदेवांना दिलेली समज, हा तिचा आध्यात्मिक अधिकार तर होताच; पण त्याहीपेक्षा त्या प्रश्नामध्ये तिने भक्त आणि सामाजिक जीवन, भक्ताचा सामाजिक व्यवहार कसा असावा, तसेच भक्ताचे सामाजिक-आध्यात्मिक आचरण एकसंध असावे, अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. परमार्थ साधनेतून वैयक्तिक उन्नती साधणे, मोक्ष मिळविणे किंवा योगसामर्थ्य वाढविणे, हे सारे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत नव्हतेच. मुक्ताबाईने तत्त्वज्ञान, आचरण आणि समूहजीवन यांचे एकसंध नाते निर्माण होण्यासाठी आत्मशोध घेतलेला दिसतो. म्हणूनच तिच्या अभंगरचनेतून व्यक्त होणारी आत्मशोधक भक्त स्त्री आजमितीला महत्त्वाची आहे. आत्मस्वातंत्र्य आणि समाजजीवन यांच्यातील नाते समजण्यासाठी त्यांच्या अभंग रचनांची मदतच होते.

आत्मशोधक असणे, आत्मशोध घेण्याची प्रेरणा मुक्ताबाईने तिचे शिष्य चांगदेवांमध्ये परावर्तित केली. म्हणूनच चांगदेवांचा हा अभंगरूपी कबुलीनामाही महत्त्वाचा आहे.


अभिमानाने आलो अलंकापुरी। अज्ञान केले दुरी मुक्ताबाईने।।

अवघ्या विद्येचा करूनी अभ्यास। पावलो मी क्लेश देवराया।।

कृपावंत झाली जेव्हा मुक्ताबाई। स्वरूप दिशा दाही दाखविले।।

पाठी-पोटी स्वरूप केले मुक्ताईने। तव अभिमान गेलासे माइण।।


संत एकनाथांनी भक्ती करताना अंतर्मुख झालेल्या मुक्ताबाईचे आत्मचिकित्सक, आत्मशोधक रूप जाणले होते. म्हणूनच तिच्यावर आरती रचताना एकनाथांनी,..


अज्ञानासी बोध। सज्ञानासी शुद्धी।

तोडिली उपाधी। सर्वगांची।।


असे तिच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे.


योगमार्ग आणि भक्तीमार्ग यांचा संयोग साधणारी मुक्ताबाई ही खूप मोठी आहे. स्त्री स्वातंत्र्याचा विचार करताना 'स्त्रियेचे शरीर' असणे ही नियती ओलांडून ती विरक्तीच्या वाटेने चालत राहिली. विरक्ती आणि वात्सल्य, अनासक्त असणे आणि समाजमनाचे असणे, जग बोलणे सोसणे आणि क्षमाशील होणे यांचा समतोल साधण्याची साधना तिने आयुष्यभर केली.


पहिली माझी ओवी। परतूनी पाहिले।

दृष्टीने देखिले। निजरूप।।


असा सुरू होणारा मुक्ताबाईचा आत्मशोध अखेरीस,


दहावी माझी ओवी। धाले मन। डोळा दिसे ऊन। रागिमाजी।।

म्हणे मुक्ताबाई। निवृत्तीचे देणे। योगियांची खूण। योगी जाणे।।


या निवृत्तीनाथांनी खुल्या केलेल्या भक्तिमार्गापाशी पूर्ण होतो. आध्यात्म हा व्यक्तीच्या आचरणाचा, जगण्याचा आणि समाजजीवनाचा एक भाग आहे. यासाठी सतत आत्मशोध घेणारी मुक्ताबाई


अवघी साधने हातवटी। मोले मिळत नाही हाटीं।

अहो आपण तैसे व्हावे। अवघे अनुमानी घ्यावे।।


असे म्हणते. भक्तीला आत्मशोधाचे आणि आत्मस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन भक्ताचे अवघे जगणेच समाजाभिमुख असण्यातील विसंगती, परस्परविरोध नाहीसा करणारी मुक्ताबाई स्त्रीस्वातंत्र्यावादीनीच आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational