Jyoti gosavi

Inspirational Thriller

4.5  

Jyoti gosavi

Inspirational Thriller

सरसेनापती संताजी घोरपडे

सरसेनापती संताजी घोरपडे

5 mins
441


तळहाती शिरं घेऊनीया

 दख्खनची सेना लढली

 परी विजयी मोंगल सेना

 नच नामोहरम जाहली

 पडली मिठी रायगडाला

 सोडविता नाही सुटली

 राजरत्न राजाराम

 कंठास त्यास लावून

 जिंजी वरती ठेवून

 परते सरसेनापतीजी

 घोडदौड संताजीची

 गिरसप्पा वाहे धो धो

प्रतिसारील त्याला कोण

 शिशिरा चा वारा सो सो

रोधील तयाला कोण

 होता जो गंगथडी ला

 आला तो भीमथडी ला

 एकाच दिवसात परी उडाला

 करि दैना पर सेनेची घोडदौड संताजीची 


अशी शाळेमध्ये इयत्ता सातवी आठवी ला कविता होती. त्याच वेळी मला संताजी घोरपडे या व्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल होते. 

त्यानंतर धन्य ते धनाजी संताजी नावाचा चित्रपट बघितला आणि थोडीफार इतिहास कळला. 

असे म्हणतात की या महावीराने मोगलांच्या तंबूचे कळस कापुन आणले होते. 

त्यावेळी बादशहा नमाज पढत होता म्हणून बादशाहाला त्यांनी सोडले. परंतु आपल्याच नागोजी माने यांनी संताजी शंकराच्या पाया पडत होते तेव्हा त्यांच्या मानेवरती वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. 

शिवाय फंद फितुरीचा शाप आणि दुहीचा शाप मराठ्यांना पहिल्यापासूनच आहे जोपर्यंत धनाजी संताजी एकत्र लढत होते तोपर्यंत मोगलांना सळो का पळो करून सोडले होते. 

 नंतर संताजी घोरपडे या व्यक्तिमत्त्वाविषयी आकर्षण वाटण्याचे कारण श्रीमंत बाजीराव पेशवे यांची एक बहीण तिचे नाव "अनुताई घोरपडे" या घोरपडे आडनावामुळे मला प्रश्न पडला होता की बाजीरावांच्या बहिणीचे नाव अनुताई घोरपडे कसे काय? कारण त्या काळात तरी नक्की परजातीमध्ये विवाह होत नव्हते. 

मुळात विवाहच खूप लहान वयात होत असल्यामुळे पळून जाण्याचा आणि पर जातीत लग्न करण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि ती बाजीरावांची लाडकी बहीण होती .माहेरपणाला शनिवार वाड्याला येत होती. मग ती घोरपडे कशी? त्या प्रश्नाचे उत्तर असे मिळाले "अनुताई घोरपडे" यांचे सासरे संताजी घोरपडे यांच्या सैन्यामध्ये होते. आणि त्यांचे संताजी घोरपडे त्यांच्यावर इतके प्रेम होते की, आपल्या सरसेनानी च्या प्रेमापायी त्यांनी स्वतःचे आडनाव घोरपडे घेतले होते. त्यामुळे मला संताजी घोरपडे यांच्या बद्दल उत्सुकता होती आणि आजच्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शोध घेतला. 

 

पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे यांचा २९ ऑक्टोबर हा जन्मदिन.  

रणमार्तंड, रणवैभव, सरसेनापती संताजी घोरपडे  यांचा जन्म २९ ऑक्टोबर १६६० रोजी झाला. 


संताजी घोरपडे यांचे घराणे उदयपूर येथील सिसोदिया वंशापासून उगम पावले. छत्रपती शिवाजीराजांनी कर्नाटकात स्वारी केली. त्या वेळी संताजी घोरपडे त्यांच्या बरोबर होते. पुढे कृष्णेच्या दक्षिणेकडील कर्नाटकाचा बहुतेक भाग घोरपडे यांनी जिंकल्यावर सोंडूर, गजेंद्रगड, दत्तवाड, कापशी, इत्यादी शाखा उत्पन्न झाल्या. संताजी घोरपडेंना छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापतिपद दिले. संताजींचे वास्तव्य नेहमीच शंभू महादेवाच्या डोंगरात असे. तेथूनच ते चारही दिशांत विजेसारखे चमकत राहिले. बादशहाने जिंकलेला विजापूर प्रांत संताजी घोरपडे यांनी लुटून फस्त केला. संताजी घोरपडे अत्यंत शूर व धाडसी होते. ‘बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानींना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तृण धरावयास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजींची ख्याती होती.’ 


संताजी घोरपडे यांचे नाव ऐकताच मुघल सेनानींच्या उरात धडकी भरत असे. संताजींशी लढण्याचा प्रसंग आला, तर भल्या भल्या सरदारांना कापरे भरत असे. संताजीराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळात संताजीराव घोरपडे व धनाजीराव जाधव या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ म्हणजे सतरा वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला. 


मुघल सैनिकांमध्ये संताजीराव घोरपडे यांची प्रचंड दहशत होती. संताजींच्या या महान विजयाची कहाणी सर्वस्वी त्या काळातील शत्रुपक्षीय मुघल इतिहासकारांनी लिहून ठेवली हे किती विशेष आहे. 


अत्यंत नाजूक, पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले ते संताजी घोरपडे यांनी. जिंजी-तंजावरपर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तीर्ण प्रदेश संताजीराव यांच्या कार्याचे खास क्षेत्र होते. मोहिमेत ठिकठिकाणी मुघली सैन्याचा समाचार घेत विविध ठिकाणच्या चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचा हा सेनानी छत्रपती राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असत. संताजीराव घोरपडे मुघल फौजेच्या हालचालींची व तिच्या सेनानीच्या योजनांची बित्तंबातमी राखून असत. 


संताजीराव घोरपडे यांचा पराक्रम आणि युद्धकौशल्य याचा मुघल सरदारांना धाक आणि दरारा वाटत होता. मोठमोठ्या शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला तर एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होऊन त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे वाटे. 

युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जात असत तिकडे त्यांचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारापैकी एकही तयार होत नसे. संपूर्ण साम्राज्यात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहोचले, की वाघासारखे काळीज असलेल्या सेनानीच्या हृदयात धडकी भरे. संताजी आपल्या युद्धनीतीने मुघलांना सळो की पळू करून सोडत. 

छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर असताना मुघल सरदार झुल्फिकार खानाने किल्ल्याला वेढा घातला होता. त्यामुळे महाराज किल्ल्यावर अडकले होते. त्या वेळी महाराजांना सोडवण्याची जबाबदारी मराठा सरदार संताजी घोरपडेने स्वीकारलेली होती. त्या काळात संताजी आणि धनाजी असा काही पराक्रम गाजवत होते, की औरंगजेबानेही त्यांचा धसका घेतलेला होता. मुघल सैन्याला तर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी हे दोघे दिसायचे. घोडे जर पाणी प्यायले नाही तर त्याने दोघांचा धसका घेतला असावा, असे बोलले जायचे. 


पुढे संताजी छत्रपती राजाराम महाराजांच्या संरक्षणासाठी जिंजीला जात आहेत, हे समजल्यानंतर औरंगजेबाने कपटी कासीमखानला मोठ्या फौजेसह पाठवले. कासीम राक्षसी महत्त्वाकांक्षेने आला होता. त्याच्याजवळ ६० हजारांचे सैन्य होते. पण संताजीच्या गनिमी काव्याने त्याला सळो की पळो करून सोडले. राजाराम महाराज जिंजीवरून सुखरूप सुटले. त्यानंतर जिंजीचा किल्ला झुल्फिकार खानाने जिंकला. परंतु छत्रपती राजाराम महाराज मात्र त्याच्या तावडीतून सहीसलामत सुटले. मराठेशाहीवर आलेले खूप मोठे संकट टळले. 


संताजींना नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने अनेक नामवंत सरदार पाठवले होते. त्यांच्याबरोबर तोफखाना, भरपूर धन आणि सैन्य दिमतीला दिले होते. संताजी मुघल सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. कासीमखानाने आपले सैन्य रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजीने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्याप्रमाणे आपल्या सैन्याच्या तीन तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासीमखानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतवण्यासाठी कासीमखानने आपले बरेच सैन्य खानाबरोबर तिथे पाठवून दिले. संताजीच्या दुसऱ्या तुकडीने खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरू केली. आता कासीमखानाच्या छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसऱ्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मुघल सैन्याची पुरी वाताहत करून टाकली. मुघल सैन्य रणांगण सोडून पळत सुटले आणि दोड्डेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजीने या गढीला वेढा घातला आणि मुघलांची रसद मारली. दोड्डेरीच्या मुघल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासीम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकळे सोडले. 


कासीमखान आणि त्याचे सरदार दोरखंड लावून एक रात्री सेनेला संताजीच्या तोंडी देऊन किल्ल्यात निघून गेले. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद संपत आली. खानाचे सैन्य उपाशी मरू लागले. शेवटी मुघलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजीने मुघलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होऊन कासीमखानाने विष पिऊन आत्महत्या केली. या लढाईचे दाखले मुघल इतिहासकारांनी दिले आहेत. 


जोपर्यंत धनाजी आणि संताजी खांद्याला खांदा लावून लढत होते तोपर्यंत त्यांनी सतरा वर्षे मोगलांना यशस्वी लढत दिली परंतु सरसेनापती या पदासाठी यांच्या दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली किंवा निर्माण केली गेली तेव्हा मात्र ते एकटे एकटे पडले शिवाय राजाराम महाराजांची संताजी घोरपडे यांचे मतभेद झाले लोकांना देण्यात येणाऱ्या व तणांमुळे मुळे हे मतभेद होते राजाराम महाराजांनी वतन पद्धती सुरू केली संताजी घोरपडे यांना ती आवडत नव्हती ती मान्य नव्हती त्यामुळे राजाराम महाराजांनी मध्ये आणि त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि ते कर्नाटकातून पुन्हा महाराष्ट्रात आले त्यानंतर मात्र धनाजी चे सैनिक संताजीच्या मागे पडले आणि संताजीचे 11 सरदार सैन्य धनाजी ला जाऊन मिळाले आणि अशा मध्येच शिंगणापूरच्या डोंगरांमध्ये एकट्याला गाठून नागोजी माने यांनी त्यांचा खून केला आणि महाराष्ट्र एका शूर सरदाराला मुकला. 

 धनाजी संताजी एकत्र राहिले असते तर मोगलांना इथे इथून केव्हाच गाशा गुंडाळावा लागला


असे हे थोर शौर्यशाली मराठा सेनापती संताजीराव घोरपडे यांना अभिवादन...


-


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational