सावित्रीबाई फुले यांना पत्र
सावित्रीबाई फुले यांना पत्र
आई सावित्रीस...
प्रिय आई सावित्री तुला प्रथमतः नमस्कार. आज तुला पत्र प्रपंच यासाठी केला की,तुझे कार्य,योगदान कुठेतरी मागे पडत आहे. किंवा तुला तुझ्या कामाएवढे मोल दिले जात नाही. तु ज्या सन्मानाची हक्कदार आहेस तो सन्मान तुला मिळत नाही. पण आई एक सांगतो तुझे कार्यच एवढे महान आहे की,तुझ्या नावाकडे एकवेळ दुर्लक्ष करतील पण तु तयार करून दिलेल्या रस्त्यावर ते नक्की चालतील.
आई तुझं कार्य या संपूर्ण भारत देशासाठी वरदान देणारं ठरलेलं आहे. भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना बरेचसे अधिकार नाकारण्यात आले होते. स्त्रिया चुल आणि मुल सांभाळण्यासाठीच असतात; असा गैरसमज संपूर्ण समाजात पसरवण्यात आला होता. तो गैरसमज दूर करून वळचणीला पडलेल्या भारतीय स्त्रियांना शिक्षणाचा प्रकाशमार्ग तु खुला करून दिलास.आणि त्या प्रकाशवाटेवर कसं चालायचे हे ते दाखवून दिलस.
आई जर तु नसतीस तर भारतीय समाज आज ज्या प्रगतीच्या शिखरावर जाऊन बसला आहे तो कदाचित इथपर्यंत पोहचलाच नसता.कारण पन्नास टक्के समाज अशिक्षित राहिला असता. त्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त समाजात स्त्रिया ,मागास समाज आजही मागासच राहिला असता.स्त्री शिक्षण सुरू झाले असते पण त्याला किती काळ लागला असता कोणालाच सांगता येणार नाही. स्त्री शिक्षणासाठी जेवढा संघर्ष, यातना तु सहन केल्यात तेवढ्या कदाचित दुसऱ्या कोणी सहन केल्या नसत्या.
आई तु केवळ स्त्री शिक्षणासाठी लढलीस असे नाही तर प्रस्थापिताविरोधात, समाजाविरुद्ध, कसं उभे रहायचे,संघर्ष कसा करायचा हे तु स्त्रियांबरोबर पिडीतांना दाखवून दिलंस.म्हणून तु जर नसतीस आजही स्त्रिया,शोषित हे मानसिक दृष्टीने आजच्या एवढ्या कणखर झाल्या असत्या किंवा झाले असते का ?ही शंकाच आहे.
धर्म,अंधश्रद्धा, परंपरा यात गुरफटून गेलेल्या स्त्रिया आजही उपवास तापास करत आपला बराच वेळ वाया घालवत असतात. शिक्षणापेक्षा किंवा शिकलेल्या बाबीपेक्षा मनावर जे संस्कार रूढ झाले आहेत त्या जोखडातून आजही त्या बाहेर येत नाहीत. त्यात पुरुष पण तेवढेच जबाबदार आहेत. पुरुषही अंधश्रद्धेच्या विळाख्यात अडकून पडले आहेत. तु दाखवून दिलेल्या मार्गावर चालत असताना अशी वैचारिक दृष्ट्या दयनीय अवस्था आहे. जर आई तुच नसतीस किंवा तुच शिक्षणाचा मार्ग दाखवला नसता तर भारतीय समाज आजही अधोगतीच्याच दिशेने मार्गक्रमण करत राहिला असता.
आई तुला ज्योतिबा सारखा उच्च विचार सरणीचा पती मिळाला.त्याला 'महात्मा' सारखे पद मिळाले. पण तुही एखाद्या 'महात्म्याची पत्नी कशी असावी' हे जगाला दाखवून दिलंस.त्यांच्या खांद्याला खांदे लावून समाजकार्यात बरोबरीने उभी राहिलीस.ज्योतिबाच्या विश्वासाला सार्थ ठरवलीस.आई तु जर ज्योतिबा सोबत नसतीस तर त्यांच्या कार्याला यशसिद्धी प्राप्त झाली असती का? हे विचार करण्यासारखे आहे.
आणि तु पती गेल्यावर पतीचे कार्य हिरारीने चालू ठेवलंस.न हरण्याचा मंत्र तु लोकांसमोर ठेवून दिलंस. मुल दत्तक घेण्याचा क्रांतिकारी निर्णय तु त्या काळात घेतलास.स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता प्लेगच्या साथीत तु रूग्णांची सुश्रुषा करत राहिलीस.तुझ्या कार्यातून प्रेरणा,क्रांतिकारी विचार तु पेरतच राहिलीस.जर तु नसतीस तर या विचारांची पेरणी आतापर्यंत झाली असती का हे विचार करण्यासारखे आहे.
आई तु नसतीस तर इंदिरा गांधींनी पंतप्रधान झाल्या असत्या का? प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या असत्या का?आज स्त्री विमान ,रेल्वे चालवत आहेत. वैज्ञानिक आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषाच्या सोबत आहेत. किंवा एखादे पाऊल पुढेच आहेत. जर आई तु नसतीस तर हे भाग्य आज पाहायला मिळाले असते का ही शंकाच आहे.
आई जिजाऊ ने जसे स्वराज्य निर्माणासाठी शिवबास घडवले.अगदी त्याच धर्तीवर भारत निर्माणासाठी इथल्या स्त्रियांना तु शिक्षणाचा मार्ग दाखवलस.मुख्य प्रवाहात आणलंस.त्यामुळे आई तुझ्या कार्याचे मुल्य कशातच होणार नाही. ते अमुल्य आहे.
असो.तु नसल्याचा का विचार करावा. तुझ्या असण्याने आज स्त्रिया ,शोषित भारतीय समाजाचा अविभाज्य अंग बनले आहेत. आणि वेळोवेळी भारताची मान जगात उंचावत आहेत.
तुझाच..
तुझ्या कार्यातून प्रेरणा घेणारा..
