पुराचा अनुभव
पुराचा अनुभव
1988 किंवा 89 साल असेल मी दाभोळ येथे सर्विस करत होते. ज्या वर्षी जांभूळपाडा वाहिले ते वर्ष आहे. मी दाभोळ येथे एकटीच राहत होते. अशा वेळी हे वादळ आले. मी पूर आणि वादळ दोन्हीच्या कचाट्यात सापडले.
दाभोळ गावात जागोजागी माडाची झाडे मोडून पडली होती. रस्ते सगळे बंद होते. दाभोळमध्ये ट्रान्समीटर जळला होता. त्यामुळे लाईटदेखील नव्हती. अंगणामध्ये कमरेएवढे पाणी साठलेले होते. माझे गाव सातारा, गावाकडे जावे असा विचार केला, तरी सगळीकडे दरडी कोसळून रस्ते बंद पडलेले होते. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेव्हाच मला लूज मोशन लागल्या, आणि कोकणामध्ये संडास खाडीवर म्हणजे लांब असल्यामुळे, माडाची बाग ओलांडायची तेव्हा कुठे खाडीवर जाता यायचे. त्या रात्रीच्या भयाण अंधारात कमरेएवढ्या पाण्यातून हातामध्ये ढण् ढण् पेटलेला दिवा घेऊन मी रात्रभर जात राहिले.
मी स्वतः आरोग्य खात्यात होते परंतु नेमकी घरात कोणतीही गोळी नव्हती. आठ दिवस तसेच त्या अंधारात भुतासारखे एकटीने काढले. कारण कोकणातली घरे म्हणजे अगदी लांब लांब असतात. एक या टोकाला तर दुसरे त्या टोकाला. एवढ्या मोठ्या त्या घरामध्ये एकटीच मी.
पडचिठ्ठीसारख्या बांधलेल्या खोलीमध्ये भाडेकरू, घर मालक मुंबईला आपल्या मुलांकडे चार-चार
महिने जाऊन राहत होते. ते नेमके तेव्हा मुंबईला होते आणि ते आठ दिवस मी भुतासारखे अंधारामध्ये टेंभा लावून मी वावरले. पण आलेल्या परिस्थितीला तोंड दिले त्यानंतरदेखील तेथून पळून गेले नाही तर पुढे अजून एक वर्ष तेथे व्यवस्थित नोकरी केली आणि नंतर बदली घेऊन ते दाभोळ सोडलं पण आयुष्यात मी ती घटना कधी विसरू शकत नाही.