पर्यावरण
पर्यावरण
पाच जून ची सकाळ आजी बागेत लहान लहान रोपटीं लावत होत्या. तेवढ्यात संकेत तिचा नातू धावत धावत तिच्या कडे आला आणि तिला विचारू लागला ,"आजी, आजी ,आज सकाळी सकाळी बागेत झाडे का लावते गं?"
"अरे बाळा, मी नेहमीच बागेत झाडांची देखभाल करते ना रे? आज फुलझाडे लावावी म्हटले. काल तुझ्या मामांनी आणून दिली होती ना तीच लावते रे."
"व्वा आजी, आताच बातम्यात ऐकलेले शब्द
*झाडे लावा झाडे जगवा* आणि आजी तू तर सांगितल्या बरोबर त्याची अंमलबजावणी करते."
"चल आजी, मी ही तुला मदत करतो. आज पर्यावरण दिन आहे ना!"
काय रे पर्यावरण म्हणजे काय माहीत आहे का?"
"नाही गं आजी, बाईनी शाळेत थोडं सांगितले तेवढच. म्हणजे पर्यावरणचे संतुलन राखा. हवा पाणी दुषीत करू नका एवढेच. तुला माहीत आहे तर सांग ना गं"
"हं,सांगते अगोदर ते पाण्याची बादली इकडे आण. आणि मला मदत कर. आणि मी काय सांगते ते नीट ऐक." असे म्हणून आजी संकेतला सांगू लागल्या:-
*वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे*
संत तुकारामाच्या ह्या अभंगात सुद्धा वृक्षाबद्दल आत्मियता व नातेबंध जोडलेले आहेत. पुर्वी मानव निसर्गाशी नाते जोडून निसर्गाच्या कलेने वावरत होता तेव्हा तो सुखी संपन्न होता. पण आज मानवाने स्तःच्या स्वार्थासाठी जंगलाची नासाडी केली आहे. शहरीकरणासाठी, वाहने चालवण्यासाठी मोठे रस्ते बनवण्यासाठी, उद्योग धंदे व कारखान्यासाठी झाडांची अमानुषपणे कत्तल केली आहे. आणि त्याचमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
वनस्पतीमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. हवामान शुद्ध व पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो. झाडांची कत्तल म्हणजे वनस्पती कमी झाली. मग तिथले पशू पक्षी यांचा आसरा कमी झाल्याने पर्यावरण संरक्षण करणे कठीण झाले. ग्लोबल वॉर्मिंग प्रमाण वाढले व त्या कारणाने ओझन थर कमी झाला नंतर वातावरण दुषीत व प्राणवायूची कमतरता!!
आज कोरोनाचे महामारीला एक वर्ष होऊन गेले तरी रोगराई कमी झाली नाही बघतो ना! सध्यातर प्राणवायू बाह्य रिते रोग्याला देण्यासाठी लोकांची धावपळ बघवत नाही. आणि तो वेळेवर मिळत नसल्यांने बऱ्याच जणांना प्राणास मुकावे लागले. प्रत्येक वर्षी वन महोत्सव पुढाऱ्यांच्या हातून केला जातो तो फक्त दिखावूपणासाठी. बातम्या छापण्यासाठी. 'झाडे लावा झाडे जगवा' नुसती झाडे लावून काही होत नाही तर त्यांच जतन ही करायला हवे.
उदाहरणार्थ प्रख्यात सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी कसे कार्य केले ते आपण बघितले ना टी. वी. वर . किती छान काम करतो बघ एवढा प्रख्यात अभिनेता असून! असे जर बाकीच्यांनी ही पुढाकार घेऊन कार्य आरंभिले तर वृक्षाची लागवड होईल की नाही.
"हो आजी. उत्तम योजना आणि संकल्प आहे त्यांचा. आणि त्यात ते स्वतः जातीने लक्ष घालतात."
म्हणजे जर प्रत्येकाने असा संकल्प करून एक तरी झाड लावून ते वाढवावे. थेंबे थेंबे तळे साचे त्याप्रमाणे जंगल वाढायला वेळ लागणार नाही. झाडाची मुळे पाणी शोषून घेतात व त्यामुळे भू तलाचे पाणी सुरक्षीत असल्याने उन्हाळ्यात पाण्याची आभाळ होत नाही. वनराई जंगले सुरक्षीत असली तर पावसाचे येणे जाणे हे सुद्धा बरोबर होऊन सुजलम् सूफलम् पुर्वीसारखा आपला देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही.
लहान थोरांनी जिथे जिथे मोकळी जागा दिसते तिथे झाडे लावावी व त्यांची निगा घेऊन ती वाढवावी. मोठ्यांचे अनुकरण लहान मुले ही करतील व त्यांचे पुढील जीवन सुखकर होईल अशी शाश्वती आपण मनी धरू शकतो. चलातर मग सगळे सज्ज व्हा आणि झाडे वाढवा व तणाव मुक्त व्हा.
"मग आजी, आजपासून मी आणि माझे सगळे मित्र या कामाला लागतो. तू मदत करशील ना?"
"हो रे माझ्या राजा" असे म्हणून आजीने संकेतच्या डोक्यावरून हात फिरवला जणू त्याला त्याच्या शुभ कार्याला शुभ कामना दिल्या.
मनात मात्र त्या जुनं गाणं गुणगुणू लागल्या,
*हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंड्याळाचो घाट*