प्रवास
प्रवास
खरंतर आयुष्य हा एक प्रवास असतो. या प्रवासात प्रत्येकाच पोहोचण्याच ठिकाण वेगळं असतं अगदी! म्हणून शेवट पर्यंत कुणीतरी आपली सोबत करेल हा निव्वळ गैरसमज! शेवटपर्यंत कुणी सोबत नसणार म्हणून एकटं चालत राहणं सुद्धा अयोग्यच.या प्रवासात आपली माणसं असणं खुप महत्वाचं.चांगल्या माणसांमुळे आपला प्रवास हा आनंददायी होत असतो. अगदी मैफिल जमवावी, आनंदाची उधळण करावी मात्र कुणातही अडकून जाऊ नये अथवा हा प्रवास खडतर होऊन जाईल.गर्दीत राहुनही अलिप्त राहण्याची कला प्रत्येकाला जमायलाच हवी.आपल्याला ह्या प्रवासात भेटलेला प्रत्येक व्यक्ती त्याचं ठिकाण येईल तेव्हा निघुन जाणारं हे सत्य सहज स्वीकारलं तर दु:खी होण्याचं कारण उरतच नाही. आपल्या प्रत्येक अडचणीत कुणीतरी आपल्याला सावरेल ही अपेक्षा करणं सुद्धा दुबळेपणाचं !त्यापेक्षा स्वत:ला खंबीर बनवलं तर? आत्यंतिक गरज असेल तर मदत मागण्यात गैर नाही पण कायम आधार शोधत राहिलो तर निकामी होऊ आपण. आपली दिशा आपणच शोधणं यातच खरं समाधान. एकदा स्वत:च्या आत डोकावून पाहिलं तर आपलंच प्रतिबिंब दिसतं त्याच्याशी करावी मैत्री कारण स्वत:ची सोबत शेवटपर्यंत असणार हे खात्रीशीर! ऊन,वादळ,पाऊस,कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करु शकणारं खंबीर मन आपल्याकडे असायला हवं.