Vgshjsksldv Gshshshs

Inspirational

2.0  

Vgshjsksldv Gshshshs

Inspirational

पोह्यांचा कार्यक्रम

पोह्यांचा कार्यक्रम

9 mins
9.3K


पोह्यांचा कार्यक्रम

   आईबाबांच्या दबावानंतर आज मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला तयार झालो. मला पावडर लावायला आवडत नाही. पण आईच्या इच्छेने फेअर अँड हँडसम लावायला तयार झालो. खरचं एक गोष्ट आजिबात कळत नाही एकदा मी फेअर अँड हँडसम लावला तर काळ्याचा गोरा होणार आहे का ? पण ठीक आहे. ऑफिस मधून सुट्टी मारली होती. मी आईबाबा, वहिनीदादा, दादाची मुलगी, मावशीकाका, मामामामी एवढी मोठी गॅंग घेऊन मारामारी करायला जात होतो असं वाटत होत. खरचं मुली बघायचा कार्यक्रम मला बिलकुल आवडत नाही. शोभेची वस्तू ठेवल्यागत मुलीला सर्वाना दाखवत फिरणं मला योग्य वाटत नाही. पण आपली जुनी परंपरा आणि काय. सगळे तयार होऊन TV बघत बसलेत.

मी: अरे चला आता कुणाची वाट बघताय ?

मावशी: हो कळतेय तुझी घाई. मुलगी कुठे पळून जाणार नाही.

मी: आई कोण येणार आहे अजून.

आई: तू शांत हो बाळा. अरे मामा गाडी आणायला गेलाय.

मी: परत तेच

बाबा: तू शांत बस. तुझं तत्वज्ञान तुझपाशीच ठेव.

(माझं डोकं फिरलं होत तरीही मी गप्प बसलो. आणि  मी वाद घातला तर

उगाच आलेल्या  पाहुण्यांनामध्ये तमाशा होईल.)

बेल वाजली

दादा: चला सर्वजण खाली. गाडी आलीय.

( माझं तोंड बघून दादाला बोलला.)

दादा: लग्नाआधीच का असं तोंड केलंस.

मी: दादा तुला माहिती आहे मला या गोष्टी पटत. मुलगी बघायला एवढ्याजनांनी जण मला पटत नाही. आणि गाडी कशाला पाहिजे. आपण काय मोठे जहागीरदार आहोत का ? असला दिखावा कशाला.

दादा: तू शांत होशील. अरे कधी कधी मोठ्यांचा मान ठेवावा लागतो. तोंड सरळ कर उद्या होणाऱ्या बायकोला असं तोंड दाखवू नको.

(दादा दरवेळी विनोद करून मला शांत बसवतो. सगळे खुश होते जाऊदे त्याच्या आनंदावर माझ्यामुळे विरझण नको.)

गाडीत बसलो. थेट मुलीच्या घराजवळ उतरलो.
बाहेरूनच घर एकदम मस्त बंगल्यासारखं दिसत होत. मी पण पाहून खुश झालो. पहिल्या माळ्यावरच्या खिडकीतून मुली पाहत होत्या. त्या पळत आत गेल्या.
त्यांच्यापण घरात भरमसाठ पाहुणे आलेच होते. सगळ्याशी ओळख झाली. गप्पा सुरु झाल्या.
मुलीला पोहे घेऊन बोलवण्यात आलं.

वा खूप सुंदर अशी अप्सरा हातात ट्रे घेऊन नजरेसमोर आली. घरात आलेले सर्व पाहुणे माझ्याकडेच बघत होते. किचन मधून लपून लपून बायका बघत होत्या.

माझी नजर मुलीवर पडली आणि क्षणात ती आवडली.

नंतर बरोबर मधोमध पाटावर तिला बसवून आमच्या कुटुंबाचे कौन बनेगा करोडपती प्रश्न सुरु झाले.

मावशी: बाळा तुझं नाव काय पूर्ण ?

(मावशीचा प्रश्न ऐकून प्रश्न पडला हिने पत्रिका कशी बघितली जर हिला नावच माहिती नाही.)

मुलगी: रंजना दामोदर राजे

मामी: तुझं शिक्षण ?

रंजना:  M.A

( खरं आमच्याकडे पद्धतच नाही मुलांनी प्रश्न विचारायची. नुसतं तोंड  बंद करून याच आणि तोंड बंद करून जायचं. )

काका: पुढे काय शिकायचं विचार आहे ?

रंजना: स्पर्धा परीक्षा MPSC UPSC

बाबा: छान म्हणजे सरकारी अधिकारी बनायचं स्वप्न. खूप छान.

काका: तुम्हाला काय मुलाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा.

मुलीचे बाबा: तुमचं ऑफिस आहे कुठे ?

मी: रबाळे, नवी मुंबई.

मुलीचे काका: काय करता आपण ?

मी: आमची कंपनी निरनिराळे रोबोट बनवतात. ते बनवण्यात मी मदतीचं काम करतो. प्रोजेक्ट इंजिनीअर आहे.

मुलीचे मामा: तुम्हाला पगार किती.

मी: कंपनी छोटी आणि नवीन आहे पगार जास्त नाही. १५००० प्रति महिना.

मुलीचे बाबा: आम्हाला सांगण्यात आलं होत कि तुमचा पगार २५-३० हजार आहे. आणि MNC कंपनी आहे.

मुलीचे मामा: आमच्या मुलीला २५००० प्रति महिना पगार आहे.

(आईने डोळ्याने माझ्याकडे बघून शांत बसायचे इशारे केले. तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. परत डोक्यात राग पेटला.)

मी: तुम्हाला मिळालेली सर्व माहिती चुकीची असावी. जी खरी माहिती आहे ती मी सांगतो.

(मी असं बोलल्या बोलल्या माझ्या घरातल्यांची चेहरे बघण्यासारखे झाले.)

मी:
माझ्या नोकरीबद्दल जास्त कुणाला माहिती नाही, आणि मी पण कुणाला काही सांगत नाही, त्यामुळे कदाचित तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असावी.

मी एक डिप्लोमा इंजिनीअर आहे.
एका छोट्या आणि खाजगी कंपनीत काम करतो.
मला १५००० महिन्याचा पगार असून तो १२००० पर्यंत हातात येतो.
स्वतःसाठी महिन्याच्या खर्चाला १००० बाजूला ठेवून बाकीचा पगार मी घरच्या कामासाठी घरात देतो.
माझं बँक ऑफ इंडिया बँकेत खात आहे त्यात माझी १०,००० बचत आहे.
माझ्या नावावर कोणतीही घर, बंगला, गाडी नाही. जे काय आहे ते माझ्या आईवडलांनी शून्यातून प्रगतीकरून मिळवलं आहे. त्यात माझा स्वतः असा काही सहभाग नाही.
मला कोणताही व्यसन नाही.
कंपनीच्या कामासाठी मला १५-२० दिवस कधी कधी बाहेर राहावं लागत. त्यासाठी मला वेगळा भत्ता मिळत नाही.
मला खरं आणि स्पष्ट बोलायला आवडत. खोट्या गोष्टीची चीड येते.
माझं घरात जास्त कुणाशी पटत नाही.
मी खूप रागीट स्वभावाचा आहे.
मी लपून एक गोष्ट करतो जी मी कुणाला आतापर्यंत सांगितली नाही. ऑफिसवरून लवकर सुटल्यावर आमच्या बाजूच्या शाळेत १० वीच्या मुलांना मोफत गणित विषय शिकवतो.

मुलीचे बाबा: ही तर चांगली गोष्ट आहे. यात लपवण्यासारखं काय आहे.

मी: नाही. काही लोकांना असा वाटत कि ज्याने स्वतःची प्रगती केली नाही त्याने समाजकार्याचा विचार करू नाही.
मला हे काम आवडत म्हणून मी करतो. आणि आपण समाजाचे घटक असल्यामुळे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोच, माझ्याकडे पैसे दान करायला नाही म्हणून मी थोडास माझ्याकडेच ज्ञान मुलांना मोफत वाटतो.
मी घरातील वृद्ध माणसांचा आणि लहान मुलांचा लाडका आहे. याच कारण म्हणजे मी घरातील वृद्ध माणसांशी त्यांना आवडतील अशा गप्पा मारतो, आणि लहान मुलांशी लहान होऊन मनोसोक्त खेळतो.

ज्या लोकांचे विचार मला पटतात त्याचे चांगले विचार आत्मसात करण्याचा विचार करतो, ज्यांचे विचार मला पटत नाही त्या लोकांपासून दहा हात लांब राहतो.

( माझ्या खऱ्या पणामुळे सर्वांची तोंड पडली होती. तरीही सर्वजण माझं बोलणं शांतपणे ऐकत होते.)

मला पोलीस गुन्हा शाखेत काम करायची इच्छा आहे, त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.

याव्यतिरिक अजून खास असं काही नाही सांगण्यासारखं.

माझ बोलणं झाल्यावर सर्वानी थोड्या गप्पा मारून आम्ही निघालो.

जस गाडी सुरु झाली तसं शिव्यांचा पाऊस सुरु झाला.

मावशी: मी सांगितलं होत तू इंजिनीअर आहेस. तिथं कशाला डिप्लोमा सांगितलंस. सर्वांची इज्जत घालवली ताई तुझ्या पोरंन.

मामी: अरे थोडं खोटं बोलावं लागत. आता खऱ्याची दुनिया राहिली नाही.

आई: आख्या भावकीत आमचं नाक कापलास.

बाबा: स्वतःला मोठा हरिश्चंद्र समजतो. म्हणून १० वीत चीट करून पास झालास. तिथं पण खरा अभ्यास करून पास व्हायचं.

दादा: तू स्वतःला अति हुशार समजतोस. शाळेत मुलांना मोफत शिकवतोय. आणि घरातली काम काय सांगितली कि नाही म्हणतो.

गाडी सिग्नलला उभी राहिली. मी लगेचच उतरून वाट दिसेल तिथं चालू लागलो. खरं बोलल्याचं परिणाम गाडीतले शब्दांचं युद्ध होत. कुणाला काही न बोलता मी तिथून सरळ जवळच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसलो. रात्री १२ ला घरी गेलो.
सर्वजण झोपले होते.

आई: या हरिश्चंद्र जेवायला ठेवलय ते गिळा आणि माझ्यावर उपकार करा.
जेवून मी झोपलो. सकाळी ४ ला उठलो. सर्व उठण्याच्या आधी निघून ऑफिसला निघून जायचं ठरलं होत. पण माझ्या मनातल्या गोष्टी मला आईबाबांना सांगायच्या होत्या म्हणून पत्र लिहलं. पत्र आईच्या कप्प्यात ठेवलं आणि मी निघून गेलो.

पत्र
प्रिय आईबाबा,

आईबाबा माझ्या मनातल्या गोष्टी मी तुम्हाला तोंडाने सांगितल्या कि तुम्हाला ऐकायची इच्छा नसते. म्हणून पत्र लिहतोय इथे ऐकावं लागणार नाही इथे फक्त वाचून समजावं लागेल. बाबा मला मान्य आहे कि मी माझ्या खिशात चिट होती पण ती माझी नव्हती मित्राची होती, चिट करून पास झालोच असतो तर ५०% मिळाले नसते ७०% मिळाले असते. दादा बोलतो मी घरातली काम करत नाही. हो हे खर आहे दिवसभर बाहेरून काम करून कटांळून आल्यानंतर घरातली काम करायची इच्छा नसते. काल झालेल्या गोष्टीवर तुम्ही माझ्यावर खूप रागावले आहेत याची मला कल्पना आहे. पण जी गोष्ट मी खोटं बोलून करतो ती गोष्ट मला त्रास देत राहते. खरं बोललो कि कुणाची भीती राहत नाही. मला जे आहे जस आहे तसं स्वीकारायची सवय आहे.
लहापणी तुम्ही मला देवळात घेऊन जायचा आठवत असेलच. आई तेव्हा तू बोलायची कि खोटं बोललो कि देव कान कापतो. खरंच लहानपणी मला खरं बोलायला सांगणारी आई आता का खोटं बोलायला का सांगतेय ? चला खरं खोटं ते बाजूला राहूदे. आजकाल काय झालाय ते मी तुम्हाला सांगतो. आताच्या मुली मुलांपेक्षा हुशार आहेत. त्या सर्व क्षेत्रात पुढे जात आहेत तर त्यांच्या अपेक्षा मोठ्या असणारच. मुली जास्त शिकणे यात त्यांची काय चुकी आहे. आणि मुलं शिकून नोकरी नसणं यात त्यांची पण काही चुकी नसते असं मला वाटत. आत्ताचा काळ मुली मुलामध्ये फरक करण्याचा राहिला नाही. मुलालाच जास्त पगार असला पाहिजे असं काही नाही. मी अभ्यास नाही केला म्हणून मी मागे राहिलो आणि हे सत्य तुम्ही स्वीकारावं असं मला वाटत. मुलगा म्हणून तुम्ही मला सर्व दिल जे कुणाला भेटत नाही ते सर्व मला भेटलं. पण मलाच तुम्ही दिलेलं व्यवस्थित घेता आलं नाही. त्यात माझी चुकी आहे. मग माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला का करून घेताय हेच मला कळत नाही. मला खरंच शिक्षणात रस नव्हता, मला पगाराची भूक नाही. जे मिळेलंत त्यात मी सांभाळून घेतो. मला या गोष्टीच वाईट वाटत आपण देखावा का करतो. मामाची गाडी आणण्याची काही गरज नव्हती. बाबा तुम्हाला मध्यस्ती करून ज्या माणसाने मुलीच्या वडिलांशी भेट घालवून दिली त्याला माझी पूर्ण माहिती आहे कि नाही याची खात्री का तुम्ही केली नाही. माफ करा पण हे खोटं बोलणं खोटं वागणं मला पटणार नाही. आयुष्यभर अविवाहित जगणं जमेल, पण खोटं बोलून क्षणाक्षणाला मरण जमणार नाही. मला दुसरे काय बोलतात याकडे मी कधीच लक्ष देत नाही. सर्वजण तुमच्या शून्यातून केलेल्या प्रगतीवर जळतात. कृपया पुढच्यावेळी स्थळ बघायला मला घेऊन जाऊ नये. मला जे स्पष्ट बोलायचं आहे ते तुम्ही माझ्यावतीने मुलीच्या आईबाबांना सांगावं. माझी मुलीकडून कोणतीही अपेक्षा नाही. काळी असो, अपंग असो, अशिक्षित असो काही फरक पडत नाही. या गोष्टीचा आपल्या नातेवाईकांना फरक पडेल मला पडणार नाही. काकाच्या मुलाला इंजिनीअर मुलगी मिळाली, मामाच्या मुलीला IPS मुलगा मिळाला, दादाला शिक्षक वाहिनी मिळाल्या म्हणून मला पण भरपूर शिकलेली, सुंदर मुलगीच मिळाली पाहिजे ही अपेक्षा सोडा. प्रत्येक माणूस हुशार असतो फक्त तो हुशार त्याच्या विचार आणि अभ्यासाने ठरतो, सुंदरता आज असेल उद्या नसणार. आपल्या यशाची किंवा प्रगतीची कधीच तुलना दुसऱ्यासोबत करू नका. आणि तरीही तुम्हाला माझे विचार पटत नसतील तर बिन्दास्त बोला. मी आपल्या समोरच्या इमारतीत भाड्याने राहायला जाईन. माझ्या आता मरण्याच्या आधी दोन इच्छा आहेत. एक जो पर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत जमेल तेवढं समाजकार्य निस्वार्थी हेतूने करत राहीन, दोन म्हणजे  मला तुम्हा दोघांना खूप खुश पाहायचं आणि ठेवायचं आहे. नातेवाईकांच्या शब्दात तुमची इज्जत नाही. नातेवाईकांच्या शब्दाच्या जाळ्यात तुम्ही अडकू नका एवढीच विनंती.

तुमचा विचित्र मुलगा

घरातून ऑफिस ला आल्यापासून कुणी मला फोन पण केला नाही. कदाचित माझे विचार आईबाबांना पटले नसावेत. स्वतःच्या मनाला स्वतःच समजूत घातली. जाऊदे हा वेळ नंतर सगळं नीट होईल. आईला दोनदा फोन केला पण तिने उचलला नाही. ऑफिस मधून निघालो खरा पण घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती. मग काय सरळ समुद्राशी गप्पा मारायला समुद्रापाशी बसलो. समुद्र माझं बोलणं ऐकतो आणि मला आधार पण देतो.

रात्रीचे ११ वाजल्यावर आईचा फोन आला.

आई: घरी कधी येणार आहेस.

मी: निघालोय, पोहचेन अर्ध्या तासात.

आई: लवकर ये अजून कोण जेवलं नाही. सगळे तुझी वाट पाहतायत.

चला आईच्या बोलण्यामुळे जीवात जीव आला. घरच वातावरण शांत झालं वाटत. मी घरी पोहचलो. आईने दरवाजा उघडून आई स्वयंपाक घरात गेली. अंधार होता. कदाचित सगळे झोपले असावे.

मी बूट काढले तशी लाईट लागली सगळ्यांनी हसत हसत टाळ्या वाजवल्या माझं अभिनंदन केलं.मला वाटले सगळे पाहुणे गेले असतील. पण सगळे होते.
आई हसत आली. आणि मिठाई चारली.

असं वाटत होत मला मोठ्या रक्कमेची लॉटरी लागली कि काय.

मी: काय झालं ?

मामा: तुझ्या खरं बोलण्याने तुझं रंजनाशी लग्न ठरलं

दिवसभरच्या टेन्शन नंतर चेहऱ्यावर माझ्या हसू उमटलं.

बाबा: अरे रंजनाचे ते नातेवाईक मिठाई घेऊन आले होते. सर्वाना तू खूप आवडलास. मुलगा कुणाचा आहे ?

आई: हो माझाच आहे. बाळा तुला मुलगी पसंद आहे ना ?

सगळे जण माझ्याकडे बघायला लागले

मी पण खाली बघून लाजत होकर दिला.

एक शब्दात घरात रात्रीची पार्टी सुरु. काकाने सर्वांसाठी आईसक्रिम आणले,

आईबाबांनी बाजूला घेतलं मला

आई: तुझं पत्र वाचाल आणि डोळ्यात पाणीच आलं. आम्हाला भीती वाटत होती कि तुझं लग्नाचं काय होतंय पण लग्न ठरत नव्हतं. एकदा २८ पार झालं कि लग्न होत नाहीत.

बाबा: खरं बोलणाऱ्याला लोक खूप त्रास देतात. पण सगळं ठीक झालं. आणि आम्हाला सोडून जायची गोष्ट परत करू नको. आता आम्ही म्हातारे झालोय थोडा त्रास देणारच ना ?

मी: माफ करा बाबा. नाही जाणार कुठेच.

आयुष्य असच आहे.
तुमच्या आयुष्यात पण कठीण प्रसंग येत राहतील.
तुम्ही निराश व्हाल,
सगळं सोडून जावस वाटेल.
पण
तरीही फक्त संयम ठेवा
आणि
वेळ जाण्याची वाट बघा.
वेळेसोबत सर्व गोष्टी आपोआप ठीक होतात.

जसे
काळे ढग साठल्यावरच थंडावा देणारा पाऊस पडतो
तसेच
कठीण प्रसंग आल्यावर समाधानी आयुष्य मिळत.

आपल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे मन एक लेखक या पानाला  एका वर्षात २१ कथेमुळे  १५०० पेक्षा जास्त वाचक फॉलो करत आहे त्यासाठी मी आपल्या सर्व वाचकांचा आभारी आहे. आपलं हे प्रेम असच वाढत राहो हीच इच्छा माझी ही

कथा आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया संदेश, कंमेंट, लाईक, शेअर स्वरूपात कळवाव्यात.

वाचकांच्या हृदयाचा मोफत भाडेकरू,
मन एक लेखक



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational