मन आतलं
मन आतलं
दिपाकडे Personality Development चा Course करत होते, तेव्हा बाबांनी दोन पुस्तक विकत आणली. यातील एक ए पी जे अब्दुल कलाम यांचे आहे तर दुसरे गौर गोपाल दास लिखित - मराठी अनुवाद - जीवन समजून घेताना .... - हे आहे.
पूर्वी आयुष्य-जीवन-सकारात्मकता असे शब्द डोईजड वाटायचे. गंभीर-जबाबदारी निभावण्यासाठीचे, विपरीत अथवा नकारात्मक परिणाम होऊच द्यायचे नाहीत - असं काय अन् काय! आणि आताशा लेखनात एकदा का असेना अनुषंगिक अथवा गरज नसतानाही उल्लेख होतो.
हा आहे प्रवास! जो लखलखीतपणे दिसतो आणि शब्दात मांडता येतो. शब्द वाचता येतात, समजतात, आकळतात आणि म्हणून पुन्हा आपल्या भावना, विचार, मत यांना शब्दांच्या साथीने बांधता येतात, व्यक्त होता येते.
या सगळ्यांचा पायरी-पायरीने उल्लेख करण्याचा हेतू असा की, Personality Development Class मुळे मन आणू विचार स्थिरावायला सुरुवातही झाली आणि मदतही होत आहे. आणि हेच कारण आहे की, गौर गोपाल दास ( हे नावच फार आवडलं ) लिखित - 'जीवन समजून घेताना....' या पुस्तकात "कृतज्ञता", ती व्यक्त करणे, व्यक्त करण्यामागची मीमांसा यावर एक पूर्ण प्रकरण आहे. वाचता क्षणी त्यात गुंतून गेले, कारण त्याचा अर्थ मनाला प्रचंड भावला आणि चित्तात हा शब्द कोरला गेला.
तेव्हापासून ठरवलं की 'कृतज्ञता' व्यक्त करायची आहेच. पण सुरुवात कशी करावी? कोणापासून करावी? प्रश्नमालिका तयार झाली, म्हणून उत्तर शोधायला सुरुवात केली, त्यातूनच आताचा हा लेख तयार झाला. भावस्पर्शी आहे का?
नसू देत! कारण 'कृतज्ञते'चं प्रथम पुष्प या शब्दमोत्यांना आणि कागदावर या सर्व गोष्टी मनातल्या इतक्याच सुंदर शब्दात-भावात लिहिणाऱ्या लेखणीला सोबतच कागदाप्रतिही अर्पण! शिवाय भावनांना विचारांमध्ये गुंफून एका मार्गाला लावणाऱ्या या चंचल स्वभाव असणाऱ्या मनालाही अर्पण!!