लता मंगेशकर यांना पत्र..
लता मंगेशकर यांना पत्र..
प्रिय लतादीदी
तुमचा काळजाला भिडणारा,हेलावून सोडणारा, अंतर्मुख करणारा, डोळ्यातून अश्रू वाहायला लावणारा आवाज, हीच तुमची शक्ती आहे. तुम्ही व्याख्येत न मावणारी स्वरसम्राज्ञी आहात..तुम्ही काहीजणांचे दैवत आजात. तुम्हीअनेकांच्या भिंतीवरील फोटो प्रेम आजात. मनाच्या चौकटीतील एक सुंदर चित्र आहात .एकच गीत अनेक जण गातात, पण हसवायचे, रडवण्याचे सामर्थ्य काही जणांमध्ये असतं, त्यापैकी एक तुम्ही. तुम्ही असे चुंबक आहे,जिथे सर्व विशेषणे आपोआप चिकटतात.
गाणं अजरामर करणं तुमच्याडून शिकायला हवं. ये मेरे वतन के लोगो ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते. पंडित नेहरूंच्या डोळ्यात व आमच्या डोळ्यात पाणी आणलत.
सुखामध्ये जीवनात ही घडी अशीच राहु दे असंवाटतं. हे क्षण असेच पकडून ठेवावेत, त्याला दृष्ट लागू नये असं आपल्याला वाटतं.ऊत्तुंग प्रतिभेच्या आविष्काराला साथ देणारा आवाज हवा. गीत आणि सूर हातात हात घालूनच जायला हवेत, तरंच मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा हे शक्य आहे.
तुम्ही प्रेमिकांच्या आयुष्यात बहार आणली आहे . लहान मुलांना नाचायला शिकवले. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आई मी पावसात जाऊ कां? जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून, वृद्धांना संध्याछायेची आठवण करून दिली आहे .एक-दोन-तीन-चार या जावेदच्या मासिक बाराखडीच्या गाण्याला तुम्ही रंगत आणली. काही गाणी तुमच्यामुळे लक्षात राहतात. मोगरा फुलला ,चाफा बोलेना, ही गाणी जणू तुमच्यासाठीच होती. आपली नक्कल करू नये, म्हणत तुम्ही सृजनाचा मार्ग मोकळा ठेवला आहे. अनेक लता आहेत,अनेक आशा आहेत, हवाय फक्त आधार. भीक मागणाऱ्या सुरांना जेव्हा आधार मिळतो, तेव्हा त्याला राजमान्यता मिळते, त्याच सोनं होतं.अनेक राणुमंडलआहेत.
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया गेला बाबा हे खरंच ठरलंय. मंगेशकर घराण्याची लता, तिचा वेलू गगनाला भिडतोय. मंगेशकर घराण्याने सुरांचा उष:काल करत आशा पल्लवित केल्या आहेत. तूम्ही आमच्या सर्वांच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तुमच्या सुरमयी आवाजाने आमचे जीवन सुरमयी झाले आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं,तुमचं मधुर गाणं ऐकणं असतं.
सूर तेची छेडिता, गीत उमटे तुमचेंच हे पदोपदी जाणवते. तुमची गाणी मुदतीची ठेवं आहे. सुरांचे व्याज देणारी, मानवी जीवन समृद्ध करणारी् तुमच्या मधुर, दर्दभऱ्या गाण्यांनी जीवनात आशा पल्लवित केल्या आहेत. अनेकांची दुःख सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे. अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे. वास्तवाची जाण करून दिली आहे.
