कोरोना काळातील अनुभव
कोरोना काळातील अनुभव
कोरोना विषाणू महामारीचा अवतार घेऊन आला आणि अख्ख्या जगात हाहाकार माजला.
आला आला कोरोना आला
माणुसकीचा अंत होताना पाहिला....
हाय रे दैवा!असा कसा आला हा अनुभव चांगला आणि वाईट माणुसकी दोन्हीचे दर्शन झाले.
पहिले लाॅकडाऊन २३ मार्चपासून सुरू झाले. अचानक सुरू झाल्याने घरातील भाजीपाला, किराणा यावर भागवले. सर्व दुकाने बंद. सोसायटीतील वाॅचमनला मग मी रोज चहापाणी, बिस्किटे, उपीट, पोहे मला जसे जमेल तसे चार जणांना देऊ लागले. त्यातील एकजण घरी आला, सांगू लागला, "ताई, माझ्या घरी पाहुणा आलाय त्याला परत विदर्भात पाठवायचाय मला १०००/- मदत करा आणि पगारातून कट करायला सांगा." मी विश्वास ठेवून त्याला हजार रू. दिले. चार दिवसांनी तो मला दिसेना. चहापण एक कप कमी झाला.
मी दुसर्या वाॅचमनला विचारले, तो कुठे आहे? आणि मला जे समजले ते जरा धक्कादायक होते. त्याने माझ्यासहीत सोसायटीतील अनेक लोकांकडून उधारी घेतली होती. अंदाजे २०,०००/- एवढी रक्कम होती.
हा झाला एक किस्सा. त्याच्या जागी दुसरा वाॅचमन आला. तो जरा तरूणच होता. तो येऊन महिना होत आला. त्याचा वरखर्च निघण्यासाठी तो गाड्या धुवायचा. माझ्या मुलाने त्याला विचारले. ५००/- ॲडव्हान्स दिले. कारण तो बोलून गेला, "दादा, घरात खायला काही नाही." मुलाने त्याला पैसे दिले. पैसे देऊन दोनच दिवस झाले हा पठ्ठा पण पसार... खरंचंच मला, मुलाला माणसं समजली नाहीत की काय? असे वाटायला लागले.
आपण माणुसकीचा हात दाखवला पण त्यांना तो घेता आला नाही.
तिसरा अनुभव म्हणजे घरातील किराणा सामान संपायला आले होते. आता काय करावे हाच विचार चालू होता. एवढ्यात व्हाॅटसॅपवरच यादी आली. जी घरपोच किराणा व भाजीपाला मिळेल अशा मजकुराची यादी होती. मला आनंद झाला. त्यातील एक नं. मी सेव्ह केला आणि त्या नंबरवर hi केले आणि विचारले की, "सर, आपला नं. व्हाॅटसॅपला आला होता. घरपोच किराणा, भाजीपालासाठी तर मला मिळेल का?" अगदी साधा प्रश्न होता.
त्या माणसाने मला मेसेज पाहून फोन केला. माझ्याशी रूडली बोलला, "तुम्ही कोण? मला मेसेज का केला?" माझा डिपी मला पाठवला आणि "याच न तुम्ही, तुमची पोलीस कम्लेंटच करतो." असे चिडून बोलला. मी त्यांना माझी परिस्थिती व्हाॅटसॅप नं. कसा मिळाला हे सांगितले. पण त्या माणसाची भाषा बदलेना. शेवटी मी त्याला sorry असे खूप वेळा बोलले.
चुकून झाले हे. त्यांना मला आलेला मेसेज फाॅरवर्ड केला. तो जरा शांत बसला.
माझ्या sorry ला शह दिला. असा हा वेगळा अनुभव आला.
माझा चौथा अनुभव, माझ्याच घरातला. माझ्या मुलाचाच.
कोरोना वाढत चाललाय. बी.पी., शुगर अशा पेशंट्सला त्रास, धोका जास्त आहे हे सतत दाखवत होते. मी शुगर पेशंट आहे. घरातील अत्यावश्यक साहित्य घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. पण माझ्या मुलाने मला गाडीतून खालीही उतरू दिले नाही कारण आईला शुगर आहे आणि तिला त्रास व्हायला नको, हा त्याचा मानस. इथे मी मनातून खूप सुखी झाले. मला समजले की, मुलगा आत्तातरी आपल्यावर खूप प्रेम करतोय. आणि मी सुखात न्हाले.
बाकी माझ्या पालकांना, घरातील काम करणार्या मावशींना आर्थिक मदत केली. जशी मला जमेल तशी.
खरंचंच या कोरोनामुळे घरातील सदस्यांची नव्याने ओळख झाली. आपुलकी वाढली. जुने खेळ परत खेळले गेले. उदा. काचकवड्या, पत्ते, लगोरी, सागरगोटे या प्रकारचे खेळ खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
वृद्धांची सेवा केली. त्यांच्यात वेळ घालवला...
कोरोनाने शिकवले आपल्याला
माणुसकीचा ठेवा जपायला
सारीच फळे काही गोड नाही मिळाली
पण कोरोना संपताना काही ठिकाणी
माणुसकीही हो संपली...