खरा मित्र- अपयश
खरा मित्र- अपयश
आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे सखे-सोयरे, मित्र-मैत्रिणी भेटतात. काही जण आयुष्यभर सतत आपल्या सुख-दुःखात सामावली असतात तर काही अर्ध्यावरतीच साथ सोडतात. काहीजण आपल्या स्वार्थासाठी दोस्ताना करतात तर काहीजण निस्वार्थी मनाचे असतात. मित्र-मैत्रिणी खूप असतात पण आपल्या विश्वासातील खूपच थोडे असतात. पण, खरेपणाही आजकाल दुर्मिळ झाला आहे. तो सहजासहजी कोणाच्या वाट्याला येत नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांचा स्वार्थ, धोकेबाजी, दगा-फटका तर काही मनोरंजनात्मक.
"मैत्री असावी तर
शंभूराजे आणि कवी कलशांसारखी
मैत्री असावी तर
श्रीकृष्ण आणि सुदामासारखी"
मैत्रीमध्ये कधी आपण आपला स्वार्थ साधू नये. नेहमीच खऱ्याचा न्याय व्हावा. मैत्रीतून खूप काही शिकता येतं नवे मी तर म्हणतो आयुष्यच जगता येतं. काही मित्र-मैत्रिणी तर आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम करतात. आपण त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे. त्यांच्याबद्दल माया, लळा, प्रेम ह्या भावना सतत असल्या पाहिजेत. काही चुकल्यास मोठ्या मनाने त्यांना माफ केले पाहिजे जर का आपलंच चुकत असेल तर 'क्षमस्व' म्हटलं पाहिजे. माफी मागताना गर्वाचे हरण झाले पाहिजे.
वाईटही वाटते एका गोष्टींचं म्हणजे ज्यांना मित्रच नाहीत. त्यांनी कोणाजवळ मन मोकळं करावं असं ज्यांना एकही हक्काचा माणूस नाही त्यांचं. स्वतःची समजूत काढत ते आपली सुख-दुःख दैनंदिनी, डायरी लेखणातून, कवितेतून व्यक्त करतात आणि त्यांनाच आपले जवळचे मित्र बनवतात. त्यातलाच मी पण एक.
"मैत्रीचं नातं हे कोळ्याच्या
जाळ्यापेक्षाही बारीक असतं
ते तुटलं तर विश्वासाने सुटतं
नाहीतर वज्रघातानेही नाही"
माझाही असाच एक सवंगडी आहे. आज पर्यंत तर कधीच साथ सोडली नाही. नेहमी अंधारातल्या सावलीसारखा माझ्यावर पाळत ठेवून असतो. त्याच्या नजरेतून मी तर अजूनही सुटलेलो नाही. हो, मी अपयशा बद्दलच बोलतोय. माझा सगळ्यात जवळचा मित्र त्याला पाहिल्यानंतर माझ्यावरती दुःखाचे डोंगर कोसळतात. पण, तोच माझी समजूत काढतो. स्वतः सांगतो मी जरी 'अपयश' असलो तरी माझ्यात " यश " हे आहेच. सकारात्मक विचार ठेव. माझ्या पासुनीही नवीन काही शिक. माझा हा अनोखा मित्र माझा आरसाच आहे. माझं अस्तित्व, माझी किंमत, माझी लायकी तो तर मला दाखवतो. तो मला खोटं बोलण्याचा भानगडीतही पडत नाही.
माझ्या सर्व चुका तो तर दाखवतो. माझ्या अनुभवांची डायरी जपतो. माझ्या कठीण प्रसंगांचा हिशोब ठेवतो. माझ्या दुःखांचाही विचार मनी बाळगतो. तो जवळ असताना तर मला लोकांचे खरे रूप दिसते. मला खऱ्या सोबतींची ओळख पटवून देतो.
"अपयश ही यशाची पायरी असते
आयुष्यातील अनुभवांची डायरी असते"
त्याच्यासोबत भांडण झाले तर गर्व वाढायला लागतो. जमिनीवरती पायही राहत नाहीत. हवा भरलेल्या फुग्यासारखा फुगे पाहतो. खरच माझ्या जवळच्या मित्राची प्रत्येकालाच गरज आहे. म्हणून तो कितीही कोसळला तरी आपण सकारात्मक दृष्टीने त्याला मिठी मारली पाहिजे. लोक काय बोलतच राहतील, लोकांचं कामच ते आहे. एक दिवस मला नक्की खात्री आहे नाही नाही, विश्वासच आहे. हा अपयशच माझा खरा सोबती म्हणून माझी ढाल बनेल. मला प्रत्येक कठीण परिस्थितीतून वाचवेल.
तात्पर्य : आयुष्यातील प्रत्येक अपयशाला आपला खरा मित्र बनवा, रंगीबेरंगी आयुष्य जगा.