विश्वास
विश्वास
विश्वास
आज मी काही कारणांमुळे मानसिक दृष्ट्या थोडा खचलो होतो. समजत नव्हतं काय करावं. माझी एक कॉलेजमधील मैत्रीण होती. आमचं काही कारणांमुळे खूप दिवसांपूर्वी भांडण झालतं. त्यातलं एक कारण म्हणजे "विश्वास". पण, आज आम्ही पुन्हा एकमेकांसोबत ऑनलाइन मेसेज वरती बोलत होतो. खूप कंटाळवाणे झाल्यामुळे काहीतरी लिहिण्याचा निश्चय केला पण काही लिहायचं हा मोठा प्रश्न होता. पण मी माझ्या मैत्रिणीला सहजच विचारलं एखादा विषय दे. मी त्यावरती काहीतरी लिहितो, म्हणजे मी त्यात मग्न होऊन थोडासा तरी ताण-तणाव नाहीसा होईल. मी तसं पण कोणत्याही विषयावर लिहू शकत होतो, आंतरजालावरती लेख, कवितांचे विषय शोधले असते. मग, मी तिलाच काय विचारलं ह्या प्रश्नात पडलो. त्याच्या मागचे कारण एकच की माझा त्याच्यावर विश्वास आहे. तिचा कदाचित नसेल. मग, हा विश्वास म्हणजे नेमकं काय असतं? असा प्रश्न घेऊन माझ्या मनात खूप मोठं प्रश्नचिन्ह उभे राहिले. मग, मी खूप खोलात जाऊन विचार करू लागलो. मग, मला समजलं
"कमवायला वर्षे लागतात
पण, गमवायला
सेकंदही पुरत नाही "
आज आमच्या मैत्रीचा 357 वा दिवस. 357 दिवसांपूर्वी आमची मैत्री झालती. हळूहळू आमची खूप घट्ट मैत्री झाली. दोघांचे विचार जुळू लागले. कधी चुकलं तर ती हक्काने सांगायची. माणसाने सुखात नव्हे तर दुःखात हक्काने साथ द्यावी. त्याची आभाळाएवढी दुःख असतील, तर ते आभाळ मोजण्यासाठी आपण त्याच्यासाठी चार इंच उंच टाचा तरी वर कराव्यात. असाच माझा तिच्यावरही विश्वास बसायला लागला. अशी एक वेळ आली की स्वतःपेक्षाही तिच्यावर जास्त विश्वास ठेवू लागलो. माझ्या मोठ्या मोठ्या संकटाचं उत्तर हे तिच्या सरळ बोललेल्या वाक्यातून ही मिळू लागले.
पण दुर्दैवाने अचानक गैरसमजाचे लोट आमच्यामध्ये भिंती बांधू लागल्या. जास्त काही नाही जवळपास आमची मैत्री तीन महिनेच टिकली. पुन्हा तर काय लाॅकडाऊनच झाले. आता नाही गैरसमज दूर करता येत होते ना तिला समजवता येत होतं. कधी मेसेज केला तरी प्रतीउत्तर मिळत नव्हतं. कधीकधी समोरच्यान न उत्तर दिल्यामुळे आपल्यामध्ये ही अचानक गैरसमजाचं वारं वाहू लागतं. माणूस गर्विष्ठ होऊन जातो. खरं तर माणूस माणसात राहतच नाही. कदाचित यालाच आपण विश्वासघात झाला असं समजतो.
काहींच्या आयुष्यातील गैरविश्वासाचे डोंगर आपोआप नाहीसे होतात आणि पुन्हा एका नव्या विश्वासाची चाहूल लागते. ते पुन्हा त्या जुन्या विश्वासाला जागे करतात. तर काहींच्या आयुष्यात मरेपर्यंत तसेच राहतात. पण, आपण जर का झालेला गैरसमज ज्याच्याशी झाला आहे त्याला जर लगेच सांगितला तर तो लगेच आयुष्याच्या हद्दपार होतो. आणि जर का नाही सांगितला तर दोघांनाही खूप पश्चाताप होतो. विश्वास, विश्वासघात ह्या घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतात.
जेव्हा आपण "विश्वास" हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या विचारांची घुसमट चालू होते. खूप लोकांचे चेहरे, झालेल्या घटना. सरासार आपल्याला भूतकाळ आठवू लागतो. विश्वास हा आपल्याला आनंदाश्रू नाहीतर अश्रूच देतो. प्रत्येक नात्यात "विश्वास" हा अलिप्त होऊन दडलेला असतो. तो हळूहळू जाणवू लागतो. विश्वास हा पैशाने विकत घेता येत नाही आणि तो देताही येत नाही. आपण तो कमवला पाहिजे. आपल्या वर्तणुकीतून, वागण्यातून, वैचारिक दृष्ट्या तो मिळवला पाहिजे. आपण इतका समोरच्याचा विश्वास जिंकला पाहिजे की समोरचेच्या मनात कधी आपल्याला फसवणूक करण्याचा विचार आला तरी त्याला स्वतःचा अपमान झाला पाहिजे असं वाटलं पाहीजे. विश्वास हा काचेच्या पेल्यासारखा असतो, तो पेला एकदा का खाली पडला की त्याला पहिल्यासारखा जोडता येत नाही तसा. म्हणूनच कधीही कोणाचा विश्वास तोडू नका.
" विश्वासाचं नातं
हे कोळ्याच्या जाळीपेक्षाही
बारीक असतं
तुटलं तर
श्वासानेच तुटते
नाहीतर वज्राघातानेही नाही "
पण, कोणाचा विश्वास जिंकण्यासाठी स्वतःमधील आत्मविश्वास कधीच गहाण ठेवू नका. माणसांवरती, प्राण्यांवरती, फुला-फळांवरती, झाडांवरती खूप प्रेम करा. आयुष्य हे एकदाच मिळतं. विश्वास असणाऱ्या माणसांकडून कधीच स्वार्थ पाहू नका जर का तुम्ही स्वार्थ साधणार असाल तरी विश्वासाला विसरलेच पाहिजे.
असं जगा की आपण मृत्युमुखी पडल्यानंतरही आपली जागा स्मशानाऐवजी हजारोंच्या हृदयात असली पाहिजे. आणि ही जागा फक्त तुम्हाला 'विश्वासच' मिळवून देऊ शकतो. आमच्या दोघातही बर्यापैकी अशाच काही गोष्टी घडल्या. तब्बल आज नऊ महिन्यांनी अशी जाणीव झाली की विश्वासाचं पुन्हा आमच्या मैत्रीमध्ये आगमन झालं आहे. जेव्हा आपण दुसऱ्याचा विश्वास जिंकतो त्यावेळीचा आनंद हा वेगळाच असतो.
आयुष्यात विश्वास, आत्मविश्वास, प्रेम, माया, लळा, जिव्हाळा, कुतुहल, इत्यादी या गोष्टी असल्यास पाहिजे. पण जर स्वतःवरच विश्वास नसेल तर जीवन व्यर्थ आहे हे नक्कीच. विश्वास हा आपल्या यशाची दिशा ठरवू शकतो. कधीकधी अति विश्वासाने आपलाच घात होतो ना? विश्वास या संकल्पनेवर लिहावं तेवढं खूपच कमी आहे.
"जयासी समजे विश्वास
तया जिवनी लागे अर्थ
कदापि ना समजे विश्वास
तयास हजारो जीवन व्यर्थ "