गाव करील ते राव काय करील
गाव करील ते राव काय करील


एका गावामध्ये एक संपतराव पाटील नावाचे गृहस्थ होते. तसे ते स्वभावाने चांगले होते परंतु लोकांशी फटकून राहात असत.
त्याचं कारणही तसंच होतं त्यांचे वडीलदेखील पाटील होते. परंतु भोळेभाबडे वारकरी होते. सिनेमात दाखवतात तसं हे पाटील घराणे नव्हतं त्यामुळे त्यांच्या वारकरी वडिलांकडून खूप लोकांनी उसने पैसे घेतले आणि परत कधी केलेच नाही. "त्यांनी गोड ऊस झाला, म्हणून मुळासकट खाल्ला" आणि "अतिपरिचयात अवज्ञा झाली..."
त्या अनुभवावरून "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" या न्यायाने संपतराव लोकांशी फटकून राहू लागले. परंतु ते लोकांना त्रासदायक देखील नव्हते.
जिथले गावचे रितीरिवाज असतात तिथल्या तिथे पाळत असत. गावचा दसरा पाटलांचा सोनं लुटण्याचा पहिला मान घ्यायचा तेथे हजर असत. गावच्या देवाच्या जत्रेलादेखील हिरहिरीने भाग घेत.
"गावात मड आणि पाटलाला कोड" या न्यायाने अगदी अडचणीला लोकांना मदत करीत. पण बाकी वर्षभर ते कोणाला आपल्या दारात उभं करत नसत.
तशातच गावामध्ये एक घटना घडली. एका बाळंतीण बाईचा एसटी अभावी मृत्यू झाला म्हणजे तिला सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी काहीच वाहन उपलब्ध नव्हते. गावाला पक्का रस्ताच नव्हता सरकारदरबारी बरेच खेटे घालून रस्ता सॅन्क्शन झाला होता. खडी पण येऊन पडली होती, पण पुढे काहीच नाही. आता होईल मग होईल, गावकरी वाट बघत होते. हाता-तोंडाशी पावसाळा आला होता. त्यामुळे आलेली खडी आणि वाळू एकदा का वाहून गेली की पुन्हा वर्षानुवर्ष "ये रे माझ्या मागल्या"अशी परिस्थिती झाली असती.
मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदान करून रस्ता बांधण्याचे ठरवले जेणेकरून पुन्हा एखादी गावच्या लेक-सुनेचा बळी जायला नको. पण पुढाकार कोण घेणार. सदर गोष्ट गावातील एका सुशिक्षित तरुणाने पाटलांच्या कानावर घातली. करतात श्रमदान! करू दे ना बापडे. मला काय करायचं गावचा रस्ता आहे बांधतील. "म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकवायला नको..." एकदा का आपणच सरकारी कामे परस्पर करू लागलो की सरकार लक्षही देणार नाही असं पाटील म्हणाले.
त्यावर तो म्हणाला, पाटील अहो यांचा "तेरड्याचा रंग तीन दिवस" टिकेल नंतर यांचा उत्साह ओसरून जाईल. त्यापेक्षा तुम्हीच पुढाकार घ्या आणि सर्वांना हाक द्या.
अरे पण ते सरकारचे काम आहे, पाटील म्हणाले.
त्यावर तो तरुण म्हणाला, अहो कुठेही जा "पळसाला पाने तीनच..." त्यापेक्षा आपण "आपला हात जगन्नाथ" असे करूया. शेवटी "गंगेत घोडं न्हाल्याशी मतलब..."
मग पाटलांनी सगळ्यांना आवाज दिला आणि श्रमदानाचे आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवले आणि म्हणाले, मी एकटा काही करू शकत नाही आपण "एकीचे बळ" दाखवू या आणि लोकांना दाखवू या "गाव करील ते राव काय करील..."