पेल्यातील वादळ
पेल्यातील वादळ


सकाळी सकाळी दोघांचं कशावरून तरी कडाक्याचं भांडण झालं अगदी दोघांच्याही खानदानाचा एकमेकांनी उद्धार केला नाही तरी नवरा बायकोंच्या भांडणाला काही मोठं कारण लागत नाही अगदी शिल्लक अशा गोष्टीवरून भडका उडतो आणि मग दोघांचाही इगो एकमेकांना घासून जातो.
आयुष्यात कधी मेल सुख म्हणून ते नाहीत उगाच आपला फरपट करीत संसार केला प्रेम कशाशी खातात हे तरी तुला माहित आहे का तिने विचारलं
अगं प्रेम नसतं केलं तर दोन मुलं झाली असती का ती काय अशीच झाली त्याने विचारलं
मुलं व्हायला काय प्रॉब्लेम करावं लागत नाही ती तर जनावरांना देखील होतात मी म्हणून तुझ्याबरोबर राहिले दुसरी एखादी असती तर केव्हाच सोडून गेली असती हा परवलीचा शब्द बोलून ती मोकळी झाली.
अगं तुझ्यासारख्या कजाग बाई बरोबर मी म्हणून राहिलो, दुसरा असता तर केव्हाच सोडून मोकळा झाला असता.
जरा चार लोकांकडे कधी कान देऊन ऐकत जा, लोक काय काय बोलतात ते !मग कळेल .
मग संसार पण चार लोकांबरोबर करायचा ना! तिने भडकून उत्तर दिलं
आजपासून मला तुझं तोंड बघायचं नाही ते म्हणाली
नकोच बघूस देव करो आणि तुझे शब्द खरे ठरवत इथून पुढे माझं तोंड तुला बघायला नको माझं रस्त्यातच काहीतरी होऊ दे असे म्हणून धारकंद दरवाजा लावून तो कामावर गेला भरलेल्या डब्बा तसाच ठेवून गेला .
नाही नेला तर नको नेऊ दे ,"माझ्या काय मेहरबानीला खातोय "एक तर स्वयंपाकात काडीची मदत करत नाही.
त्यांच्या आधी उठायचं दोघांचे डबे भरायचे ,साहेब आरामात उठणार, सकाळी घाईच्या वेळी पेपर वाचत बसणार, पण एखाद्या कामाला हात लावतील तर शपथ!
त्याचा भरलेला डबा तिथे तसाच उचलला आणि कामावर गेली..
एकदा कामावर गेले की आजूबाजूचे माहोल ,सहकारी ,शिवाय नेमून दिलेले काम, त्यात ती बुडून गेली इतकी की, तीला दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत भांडणाची आठवणच उरली नव्हती.
जेवणाच्या वेळी डब्बा बाहेर काढताना ,एकदम त्याचा डबा हातामध्ये आला आणि तिला सकाळच्या भांडणाची आठवण झाली .
आज रोजच्या प्रमाणे त्यांनी फोन देखील केला नाही.
त्याचा फोन
आला नाही, स्वारी आज जरा जास्तच घुश्यात गेलेली दिसते. नंतर तिचा आपोआप भांडणाचा मूड गेला खरंतर कोणाचं चुकलं याबाबत ती विचार करत होती.
कारण अगदी छोटसं होतं, बाथरूम घासली गेली नव्हती व तो सकाळी सकाळी बाथरूम मध्ये पाय घसरून पडला.पण जणू काय बाथरूम घासणे हे फक्त तिचेच काम होते जाऊ दे !
आज मी पण फोन करणार नाही, अडलय माझं खेटर! त्यानंतर कामाच्या रगड्यात ऑफिस सुटेपर्यंत सर्वच गोष्टीचा विसर पडला होता.
घरी आली, पाहते तर घराला मोठे कुलूप! म्हणजे अजून तरी तो आला नव्हता.
मग तिने स्वतःच्याच किल्लीने दार उघडलं, सकाळच्या भांडणाचा किडा डोक्यात थोडासा वळवळत होताच. स्वतःसाठी तिने मस्तपैकी कॉफी बनवली, तोपर्यंत मुलगा मुलगी दोघे पण ट्युशन /शाळा सर्व काही करून घरी आले .
त्यांचे खाणे ,पिणे, शाळेत घडलेल्या गोष्टी, काय शिकवले? कोणाशी भांडण झाले? काय गंमत जंमत झाली या सर्वांची विचारपूस करत तिचा वेळ गेला. मुले खाऊन पिऊन उद्याच्या तयारीला लागली.
होमवर्क करायला बसली आणि ती संध्याकाळच्या तयारीला लागली.
शेगडीवर कुकर चढवला, पण एक कान मात्र त्याची चाहूल घेत होता. अजून आला नाही, अजून आला नाही ,साधा फोन देखील केला नाही! जाऊ दे आज मी पण करणार नाही .दरवेळी मीच काय म्हणून माघार घ्यायची.
बघता! बघता! नऊ वाजले, सहा वाजता येणारा माणूस आज नऊ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता, आता मात्र तिच्या अस्वस्थतेत भर पडली. सगळा स्वयंपाक झाला, मुलांचा अभ्यास झाला, तिच्या आत बाहेर चकरा सुरू झाल्या.
तो कधीही असा लेट करत नाही, मुलांनी पण बाबा कधी येणार ?म्हणून विचारले .
अग आई बाबा कधी येणार?
अरे येतील एवढ्यात!
मुलांची तिने समजूत घातली ,त्यांची जेवण झाली ,आवराआवर केली .
मुलं झोपायला गेली, पण त्याचा पत्ता नव्हता, शेवटी तिने त्याचा मोबाईल लावला, रिंग दिली तर नुसत्या रिंगा वाजत राहिल्या.
काय झालं हा फोन का उचलत नाही? ती पुन्हा पुन्हा रिंगा देत राहिली, आता मात्र तिचा धीर सुटला.
तिचा जीव थार्यावर राहीना,
काय करावे? कोणाला फोन करावा? मित्रांना फोन करावा? का त्यांच्या घरी आईला फोन करावा? का आपल्या आई-वडिलांना फोन करावा?
का त्यांना कशासाठी या वयात त्रास द्यायचा, भांडण आपले आणि मनस्ताप त्यांना का म्हणून! असा विचार करून काही काळजी शांत बसून राहिली पण तिचे कशातच लक्ष लागेना.
खरंच सकाळच्या भांडणाचं त्यांनी एवढं मनावर घेतलं की काय?
आता मी काय करू त्यांनी काही जिवाचे बरे वाईट तर केले नसेल ना? म्हणतात ना "मन चिंती ते वैरी न चिंती "तो असा नाहीये ,गेले दहा वर्षे झाले आपण त्याला ओळखतो, संसार म्हटले की अशी पेल्यातली वादळे उठायचीच!
आज काय पहिल्यांदा भांडण झाले का? उलट अशा भांडणामुळे तर संसाराला गोडी येते .नुसते गोड गोड खात राहिले तर कंटाळा येणार नाही का ?जरा चटणी मिरचीची फोडणी हवीच, आणि अशी भांडणे म्हणजे मनात तुंबलेले घाण असतेना! तिचा निचरा होतो ,आणि पुन्हा एकदा प्रेमाचा खरा अर्थ तिला समजलं, विशुद्ध प्रेमाचा स्वच्छ तिच्या मनात वाहू लागला .
तिच्या मनात विचाराची उलट सुलट आवर्तने चालू होती, परत एकदा तिने त्याचा फोन लावला, कोणीच उचलेना !काय करावं ?लोकल मधून येताना हात निसटला का ?
कुठे पडला का?
येता येता रुळात कोणत्या गाडीने उडवले का ?
नको नको ते नाना विचार तिच्या मनात येऊ लागले .
म्हणजे स्वतःबद्दल आपले मन जितके वाईट करत विचार करते ना तेवढे आपला वैरी देखील आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही .
आजकाल रेल्वेत अपघात घडला तर ताबडतोब मदत मिळाली पाहिजे असा रेल्वेमंत्र्यांनी आदेश काढलाय, पण त्या आदेशाला कोण विचारतो? तो राहिला कागदावरच ,इकडे जनतेचा जीव रामभरोसे!
आणि रस्त्यात कोणी उडवले तर कोण मदत करत नाहीत, का तर पोलिसांच्या भानगडीत अडकायला नको म्हणून!
कोणी म्हणेल पिऊन पडला असेल, कोणी म्हणेल आपल्याला काय पडलय? आपण आपल्या लवकर घरी जाणं महत्त्वाचं.
आजकाल लोकल खाली एखाद्याने जीव दिला , किंवा हात निसटला पडला, तरी लोकांना त्याच्या मरण्याचा दुःख नसतं, उलट म्हणतात "याला मरायला आमचीच गाडी सापडली? आता आम्हाला ऑफिसला उशीर होईल !
दिवसें दिवस माणुसकी हरवत चालली आहे .
एरवी आपण तरी रस्त्याने एखादा पडला असेल तर कुठे लक्ष देतो? या विचारासाठी की स्वतःशीच चमकली. येथून पुढे रस्त्यात असा एखादा कोणी पडला असेल तर आपण त्याला नक्की मदत केल्याशिवाय पुढे जायचे नाही, तिने मनोमन ठरवले.
एरवी देवांची आठवण येत नसली, तरी संकट काळी हमखास येते. आता तिला देवाची आठवण आली, विचाराच्या नादात आज आपण देवाला दिवा देखील लावला नव्हता असे कसे विसरलो आपण? आणि आजच विसरलो स्वतःचे मन तिला कोसू लागले .
तिने पटकन हात पाय धुतले आणि देवापुढे दिवा लावला .
देवा माझा नवरा घरी सुखरूप येऊ दे! आमचे एकमेकांना शिव्या शाप देणे काही मनापासून नसते रे, सिद्धिविनायका मी तुला नारळ वाहीन ,कुलस्वामिनी आई तुझी ओटी भरीन.
जसा जसा उशीर होऊ लागला तशी तशी तिच्या जीवाची तग मग वाढू लागली .
एरवी जुन्या रीती रिवाजावर विश्वास नसला तरी अशावेळी वाटतो. दाराच्या कडेला चिमटा अडकवला, दरवाजात पेला पालथा घालून ठेवला.
लहानपणी वडिलांना यायला उशीर झाला की आई तेच करायची .
नंतर मोठा् झाल्यावर आईच्या या अंधश्रद्धेची ती टिंगल करायची, हसायची, पण आता स्वतःवर वेळ आल्यावर कोणत्याही शुल्लक गोष्टीचा आधार वाटू लागतो.
त्याही परिस्थितीत तिला स्वतःचं हसू आलं .
गेले दोन तास झाले टीव्ही उगाच कोकलत होता, फक्त आवाजाची सोबत वाटत होती.
मुले धड लहान नाही तर धड मोठी नाहीत .
एक आठ वर्षाचा, तर एक सहा वर्षाची. त्यांना काय शेअर करणार? तिने टीव्ही बंद केला आणि डोळे मिटून शांत बसली.
अजून दोन तास वाट पाहू, नाहीतर पोलीस स्टेशन गाठू तिने मनात ठरवलं.
असाच अजून अर्धा तास गेला आणि दारावरची बेल वाजली.
तिने धावत जाऊन दार उघडले तर दारात तो उभा, दिलगीर चेहऱ्याने. मग एवढ्या वेळच्या काळजीची जागा आता राग आणि संतापाने घेतली .तिने परत दार लावण्याचा पवित्र घेतला ,पण त्या आधीच त्याने एक पाय दरवाज्यात अडकवून आत मध्ये प्रवेश केला .
आता घर दिसलं का तुला, आणि फोन उचलायला काय होतं?
100 वेळा मी तुला फोन केले ,मूर्ख वाटले का मी ?
तू मुद्दामच माझा फोन उचलला नाहीस. परत शब्दाच्या लाह्या तडतडू लागल्या, पण उगाच शेजाऱ्यांना तमाशा नको, रात्री अकरा वाजताच्या शांततेत तिचा आवाज तिला जास्त मोठा वाटला. नकळत तिने माघार घेतली ,
तो आत आला, ती निशब्द पणे कोचावर बसून राहिली .तोही तिच्या शेजारी बसला .
काही काळ शांतता गेली त्याने हलकेच तिच्या डोक्यावरती थापटले आणि मायेने हात फिरवला.
त्या सरशी तीचा बांध फुटला, ती हमसून हसून त्याच्या गळ्यात पडून रडू लागली .
काय नव्हतं त्या रडण्यात? राग, द्वेष प्रेम ,संताप या सर्वांचा सुंदर मिलाप तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
सॉरी बबड्या अरे एकाचा वाढदिवस झाला ,ऑफिस सुटल्यावर त्याने पार्टी दिली,एका हॉटेलात! आणि त्या गोंगाटांमध्ये मला मोबाईलचा आवाज आला नाही.
नंतर बघतो तर तुझे 17 कॉल ,अग मी मुद्दाम नाही केलं ग !खरंच मी चुकलो ,मला माफ कर. तो दहा वेळा माफी मागत होता, त्याला मिठीत घेऊन , शांत करू पाहात होता.
तिचे हुंदके मात्र अजून थांबले नव्हते,
तुला काय माहित ?माझ्या मनात काय काय येऊन गेले ते !
अरे मी तुझ्याशिवाय राहू शकते का? मी तशी कल्पना देखील करू शकत नाही.
एवढंस भांडण झालं तर इतका राग धरायचा?
त्यालाही वाटलं सकाळी आपलं चुकलंच, काही न बोलता घासल असता बाथरूम, तर काय बिघडलं असतं ?
ती पण आपल्या घरासाठी एवढी मरमर मरते. तो तर जेवून आला होता, ती मात्र त्याच्यासाठी उपाशी होती.
त्यांने किचनमध्ये जाऊन ताट वाढून आणलं. तिच्या तोंडासमोर घास धरला.
मला नाही जेवायचे जा !
तिने चार वेळा हात फटकारला.
चार वेळा घास बाजूला ढकलला.
अगं काय देवदासच तर शूटिंग चाललय का? मी शाहरुख आणि तू पारो आहेस का? त्याबरोबर ती
खूदकन हसली आणि त्याच्या बोटाला चावली .
ओय ओय करून तो ओरडला, ताटातले अन्न खाली झाले आणि पेल्यातले वादळ शमले.
*********************************