चिऊताई.........
चिऊताई.........
सपसप सुपाचा आवाज ऐकला की कोंबड्या अन चिमण्यांची दाणे टिपण्यासाठी एकच लगबग व्हायची. माझी आई तांदूळ किंवा धान्य साफ करत असायची, तेव्हा हे द्रुष्य आम्हाला पहायला मिळायचे. पण आताच्या पिढीतील मुलांना हे पहायला मिळतच नाही.
एक घास काऊचा, अन एक घास चिऊचा ,आमच्या आईने आम्हाला भरवल, आम्ही आमच्या मुलांना खाऊ घातल पण रोज घराभोवती दिसणाऱ्या चिमण्या आता कमी दिसू लागल्यात. शहरात तर जवळजवळ दिसतच नाहीत. मानवाने प्रगती केली त्याचे फायदे झाले,त्याबरोबर तोटे ही झाले.घराभोवती दिसणारी चिऊताई आता नाहीशी होत चाललेय.
काडी-काडी जमवून, घरात, वळचणीला, फोटो फ्रेमच्या मागे अशा ठिकाणी चिऊताई घरटे बनवायची.घरात काड्यांची घाण व्हायची,पण माझी आई म्हणायची , असू दे त्यांना, त्यांची अंडी आहेत घरट्यात.मग त्यातून छोटी पिले बाहेर पडेपर्यंत आम्ही रोज निरीक्षण करत असायचो. पिलांना चोचीतून खाऊ घेऊन येणे व त्यांना तो भरवणे, त्यांना उडायला शिकवणे, हे सर्व किती छान असायचे. हे सगळे नयन सुख आताच्या मुलांना अनुभवता येत नाही.
विजेच्या तारेवर भरपूर चिमण्या ओळीने बसलेल्या असायच्या तेव्हा आम्ही त्यांना चिमण्यांची शाळा भरलेय अस म्हणायचो.कावळ्या कावळ्या पाणी दे,चिमणी चिमणी वारा घाल असे बडबड गीत आम्ही म्हणायचो. माझ्या मुलींना मी लहानपणापासूनच निसर्गप्रेमी बनवलय. 20 वर्षापुर्वी एका सकाळी मी शरयूला माझ्या माहेरच्या अंगणातील झाडावर बसलेल्या चिमण्या दाखवल्या, त्यांचा किलबिलाट ऐकवला.तर लगेच ती आनंदाने टाळ्या पिटत ती मला म्हणाली ,मम्मा,चिमण्यांच झाड किती छान, खरच किती योग्य शब्दात तिने वर्णन केलं होत.पण आता हे द्रष्य पहायला मिळत नाही.याच वाईट वाटत.
एक घास काऊचा,एक घास चिऊचा, ही गोष्टी अपुर्ण रहायला नकोय त्यासाठी आपण सर्वांनी चिऊताईला वाचवायला हव. अंगणात, छतावर, खिडकीत त्यांना पाणी,खाऊ ठेवूया, या कडक उन्हाळ्यात त्या पाणी पिऊ शकतील, मस्त डुंबतील.चला सर्वांनी मिळून चिऊताईला वाचवूया.