बदलता दृष्टिकोन
बदलता दृष्टिकोन
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ती बदलत जाणारा दृष्टिकोन ... हा विषय देखील खूप लिहिण्यासारखा आहे . आज वयाची 56 वर्ष पूर्ण केल्यानंतर मागे वळून पाहताना हे जाणवतं की, खरंच काळानुसार किती गोष्टी बदलतात आणि दृष्टिकोन देखील बदलतो.
आपलंच लहानपण आठवा, तारुण्य आठवा, लहानपणी आपल्या वेळी सातच्या आत घरात हा नियम होता. म्हणजे सातच्या आत घरात आलं नाही तर मार खायची तयारी ठेवायलाच लागायची. आणि तेव्हढी हिंमत पण नव्हती.
हळूहळू काळ बदलला, सुरुवातीला आपण देखील मुलांना हा नियम लावू पाहत होतो, की सात वाजता संध्याकाळी घरात पाहिजे ,देवापुढे शुभंकरोती, रामरक्षा म्हटली पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर आम्ही दोघे देखील म्हणत होतो. पण हळूहळू मुले मोठी झाली. त्यांच्या नोकऱ्या, शिफ्ट ड्युटी, त्याच्या आधी शाळा ,परीक्षा, क्लासेस आणि एरवी च्या वेळी मित्र मंडळ ,पार्टी त्यात हा नियम कुठल्या कुठे गेला.
म्हणजे त्याचा आता रागही येत नाही. पण आम्ही मात्र दोघांनी नियम सोडलेला नाही. कारण आपले पूर्व सुरीचे संस्कार!
मी वयात आले तेव्हा पंजाबी ड्रेस घालणे ही सुद्धा फॅशन होती, पॅन्ट ही तर खूप लांबची गोष्ट झाली. तेव्हा गावामध्ये माझ्याकडे फॅशनेबल मुलगी म्हणूनच बघितलं जाई.
त्या काळात आपण आता ज्या वयात आहोत, त्या वयातील लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता आपल्याकडे आला आहे.
काळ बदलला कपडेही तोकडे झाले.
कधीकधी मला प्रश्न पडतो आधी नऊवारी, तेव्हा सहावारी नेसणाऱ्या स्त्रिया म्हणजे मॉडर्न फॅशनेबल. मग आले पंजाबी ड्रेस, मग आली पॅन्ट ,मग आले मिनी स्कर्ट ,फ्रॉक, मग आल्या शॉट्स आता याच्या पुढची फॅशन काय असणार आहे? का सगळ्याजणी हळूहळू उर्फी जावेद च्या मार्गाने जातील, हा देखील प्रश्न पडतो .
पण आता ज्या काळात आपण स्त्रियांनी पॅन्ट शर्ट वापरणे स्लीवलेस घालणे, जाळीदार टॉप घालणे, या गोष्टी लाईटली घेऊ लागलो आहोत, तसा दृष्टिकोन आता आपला बदलत आहे.
पूर्वी लहानपणी च मुलांची लग्न होत असत .तेव्हा नहाण आलेली मुलगी अजून बिन लग्नाची म्हणजे केवढा गजहब !
समाजाचा देखील तिच्याकडे आणि आई-वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम तिरस्कारचा.
अरे! अजून हीच लग्न झालं नाही? तेरा वर्षाची झाली. हा एक काळ होता
नंतर मधल्या काळामध्ये
साधारणता मुलीला शिक्षण वगैरे मिळू लागले तरी पण वीस-बावीस हे लग्नाचे वय होते आणि आता मात्र मुली अगदी 30-35 वर्षाच्या झाल्या तरी करिअरच्या मागे आहेत आणि समाजाचा देखील दृष्टिकोन बदललेला आहे
आता तर लग्न संस्थाच मोडीत निघायला लागली आहे, त्यामुळे बाबारे किंवा बाई ग लग्न कर ,आणि स्त्रीने पुरुषाबरोबर आणि पुरुषांनी स्त्री बरोबर विवाह करावा इतकीच मापक अपेक्षा राहिलेली आहे .
पूर्वी लव्ह मॅरेज म्हणजेच "शांतम पापम" शिवाय त्यामध्ये अगदी जातीतल्या जातीत केले असले तरी, त्याने किंवा तिने आमचा विचार न घेता परस्पर आपलं लग्न ठरवलं!
यात आई बापांचा मोठा अपमान व्हायचा ,इगो दुखवायचा.
अगदी जाती पोट जातीत सुद्धा लग्न व्यवहार होत नव्हते. देशस्थाताचे देशस्थ, अशी कोकणस्ताचे कोकणस्थ ,अशी लग्न केली जात होती मग कराडे देवरुखे जीएसबी सीकेपी गिनतीतच नव्हते.
ते त्यांच्या जातीत बघतील असं काय काय होतं .
नंतर आंतरजातीयच काय! पण आंतरधर्मीय विवाह होऊ लागले ,आणि आता तर लिव्ह इन रिलेशनशिप च्या काळामध्ये,
बाबा रे लग्न करा आणि मग रहा असं म्हणण्याची वेळ आली.
शिवाय अजून एक सरकारने कायदा करून ठेवला आहे, ज्यामध्ये "गे( पुरुषाचा पुरुषाशी विवाह) आणि लेस्बियन ( स्त्रीचा स्त्रीशी विवाह) विवाहाला मान्यता दिल्यामुळे, किमान निसर्ग नियमानुसार समोरच्या व्यक्तीने लग्न कार्य करावे इतकीच अपेक्षा आहे.
काळानुसार आता इतका बदल झालेला आहे.
खाण्यापिण्याच्या बाबतीत तेच, पूर्वी हॉटेलमध्ये खायचं म्हणजेच चुकीची गोष्ट, "शांतमपापम_ बायका तर चुकून देखील हॉटेलमध्ये जात नव्हत्या, आणि चांगल्या घरची मंडळी पण चोरून चोरून हॉटेलमध्ये खात होती.
हळूहळू घर सोडून प्रत्येकाला नोकरी धंद्याच्या मागे दूर जावे लागले, आणि मग हॉटेल आणि खानावळी शिवाय पर्याय राहिला नाही.
आता तर पाच दिवस हॉटेलचा खाना आणि दोन दिवस घरचं खाणं, असं या नवीन पिढीच चाललेल आहे.
पण आपल्या पिढीला देखील बाहेरचे चटपटीत पदार्थ आवडतात, त्यामुळे पूर्वीसारखे मुलांना आपण ओरडत नाही. आपणही त्यांच्यात सहभागी होऊ लागलो आहोत.
सिनेमे नाटके दूरदर्शन वेब सिरीज सगळ्यांमध्ये काळानुसार दृष्टिकोन बदलले आहेत.
पूर्वीच्या भारतीय सिनेमांमध्ये चुंबन दृश्य असेल तर! दोन फुल एकमेकाला लगटलेली, दाखवायची किंवा दोन पक्षी चोचित चोच घालून बसलेले आहेत ,असे दृश्य होते .
हळूहळू चुंबन दृश्य सेंसर मान्य झाली, त्यानंतर सगळ्यात वादग्रस्त ठरलं ते "दयावान" सिनेमा मधलं विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित केलेले एक ते दीड मिनिटाच चुंबन दृश्य.
नंतर तर इमरान हाश्मी नावाचा नट खास चुंबन साठी प्रसिद्ध होता, आणि आता तर तेही सर्वसामान्य किंवा नगण्य झाले .त्याने कोणाच्या दृष्टिकोनात फारसा फरक पडत नाही. वयानुसार आपल्या देखील पडत नाही.
पूर्वी मुले घेऊन असा सिनेमा बघितला जात नसे, आता घरातच प्राईम व्हिडिओ नेटफ्लिक्स अजून काय काय ते नवीन नवीन निघाले आहेत .
त्याच्यावर सगळे सिनेमे दाखवले जातात, शिवाय युट्युब आहेत.
म्हणजे मुलांच्या पासून काही लांब राहिलं नाहीये, आणि आपल्यालाही त्याच फारसं काही वाटत नाही.
पूर्वी कोणत्यातरी एका नाटकांमध्ये बाईच्या कपड्यावर ती निळे डाग दाखवून तिची पाळी आल्याचे सांगितले आहे, तेव्हा बराच या गोष्टीचा बभ्रा झाला होता.
घाशीराम कोतवाल साठी आंदोलन वगैरे झाली होती, पण आता कोणीही ऊठाव आणि कोणत्याही विषयावर काय वाटेल ते बोलावं काय वाटेल ते लिहावं तस झालंय. पूर्वी स्त्रिया तमाशा बघत नव्हत्या आता अभिमानाने तिकीट काढून जातात पूर्वी नाटक सिनेमा स्त्रिया काम करत नव्हत्या त्यांचे पार्ट पुरुष पार्टी करायचे पण आता जर आपल्याला स्त्रीपात्र म्हणून एखादा पुरुष सहन करण्याची वेळ आली तर शक्य होईल का कारण आपला तसा दृष्टिकोन आता झालेला आहे
आता कोणत्याच गोष्टीचा काही फारसं वाटत नाही पाहण्याचा दृष्टिकोनच मरून गेलेला आहे.