अग्गोबाई सुनबाई
अग्गोबाई सुनबाई
काय तरी बाई! आजकालच्या सुना! त्यांना सासूची काळजी म्हणून नाही. कल्पनाताई स्वतःशीच बडबडत होत्या. नुकतेच त्यांच्या लेकाचे लग्न झाले होते.त्या लग्नाला जास्तीत जास्त सहा महिने आठ महिने झाले होते. लग्नामध्येपण त्याने सुनेचे नाव "शुभ्रा" ठेवावे म्हणून मुलाकडे हट्ट धरला होता.परंतु मुलाने स्वतःच्या केदार या नावाला मॅचिंग नाव म्हणून कल्याणी नाव ठेवण्याचे ठरवले.शिवाय केदार आणि यमन कल्याण हे दोन्ही राग देखील आहेत.ते देखील एक प्रकारचे मॅचींग झाले.कल्पना बाईच्या मनाची नुसती, धुसफूस धुसफूस चालली होती.
त्यांच्या मनातील गोष्टी त्यांना मुला जवळ ,सुने जवळ, बोलता येत नव्हत्या."अग बाई! सासुबाई" नावाची मालिका त्या मोठ्या आवडीने बघत असत. त्यामुळे त्या मालिकेतील आसावरी पात्राला त्या स्वतः मध्ये बघत असत. त्यांनादेखील केदार हा एकुलता एक मुलगा होता आणि वडिलांच्या माघारी त्यांनी त्याला लाडाकोडाने वाढवला होता . परंतु तो काही बबड्या झाला नव्हता. तो व्यवस्थित शिक्षण घेऊन नोकरी करत होता. आता साहजिकच बायको आल्यामुळे त्याचे थोडे आईकडे दुर्लक्ष होऊ लागले.आणि मग त्यांच्या मनाने जास्तच उचल खाल्ली. त्यांना असे वाटू लागले शुभ्रा प्रमाणे आपल्या सुनेने देखील आपल्या कडे लक्ष द्यावे .आपल्या एकटेपणाचे दुःख समजून घ्यावे आणि आपले देखील लग्न लावून द्यावे.पण स्वतःच्या तोंडाने बोलणार कसं? त्या घरामध्ये धुसफूस करू लागल्या, मुलाला पण समजेना इतके दिवस अशी चांगली वागणारी आई तिला काय झालं? आता तिच्या मनातलं समजणार कसं?
तेवढ्यात कल्पनाताईंची एक जुनी मैत्रीण आली. तिचं नाव "ललिता" दोघी अगदी शाळेपासून च्या मैत्रिणी.अर्थात ती तशी आली नव्हती.तिला केदारने फोन करून बोलावून घेतले होते."मावशी आईचं काय बिनसलंय ? जरा बघ! आमचं लग्न झालं तर किती खुश होती, आणि आता तिच्या नकळत घरांमध्ये आदळ आपट करते. एवढ्या तेवढ्या गोष्टींवर माझ्यावर ओरडते, कल्याणीवर ओरडते, मी तिचा मुलगाच आहे गं! पण कल्याणी तर दुसऱ्या घरातून आलेली आहे.
तिचा एकदा जर आईबद्दल गैरसमज झाला! तर मात्र आयुष्यभर माझी वाट लागेल. त्यापेक्षा तू एकदा येच बाई आणि आईच्या मनात काय आहे ते विचारून घे! ललिताला बघून कल्पनाबाई ची कळी खुलली. अग ललिता! किती दिवसांनी? तिने अगदी ललिताला गच्च मिठी मारली. खूप दिवसांनी जुन्या मैत्रिणी भेटल्या गप्पाटप्पा झाल्या काय ग? कसं काय चाललंय? ललिताने विचारलं आणि कल्पनाच तोंड सुटलं. अगं काय सांगू? नुसता बायकोच्या मागे मागे फिरतो! माझ्याकडे मुळीच दोघेपण लक्ष देत नाहीत. ती अगबाई सासुबाई मधली "शुभ्रा" बघ ती कशी सासूला आईसारखे मानते.
सासूवर किती प्रेम करते, न सांगता सासूच्या मनातल्या गोष्टी तिला कळतात. आमच्या सुनबाईला एखादं कामसुद्धा सांगितल्याशिवाय करायचं समजत नाही. कल्पनाचा पारा चढला हो हो अगं हो कळतय मला! तुला जरा एकटेपणा वाटतोय. तू माझ्याकडे येतेस का ?थोडे दिवस! तुलाही चेंज होईल! ललिताने विचारलं. नको ग बाई! शेवटी चार दिवसांनी मला एकटीलाच राहायचे ना? शेवटी ललिताने केदारला सांगितलं बाबा रे! तिचं काय बिनसलं मला समजत नाही. मला वाटतं तुझं थोडं तिच्याकडे दुर्लक्ष होतंय.तिला एकटेपणा वाटतोय. तिला असं वाटतं की बायको आल्यामुळे तू तिच्या मागे मागे फिरतोस! आणि आईकडे दुर्लक्ष करतोस .तरी तिला वेळ दे. केदारला आता काय करावे समजेना. ए आई तू असं करतेस का? थोडे दिवस कुठे फिरायला जातेस का? इतके दिवस माझ्या जबाबदारीमुळे, माझ्या डब्या मुळे, तुला कुठे जाता येता येत नव्हतं.
परंतु आता कल्याणी आली आहे तू कुठे तीर्थयात्रेला वगैरे जातेस का? मुलाने असं विचारलं आणि कल्पनाबाईंचा पारा चढला. अरे तुम्हाला मी नकोशी झाले. घरामध्ये तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे असेल ना, म्हणून मला कुठेतरी हाकलत आहे. माझं काय तीर्थयात्रेला जायचं वय झालं का? मला दुबई, युरोप इत्यादी ठिकाणच्या टूरबरोबर फिरायचंय. तुझ्यामुळे आयुष्यात कधी एन्जॉय करता आला नाही. तो मी आता करणार आहे एवढ्यात काही माझं तीर्थयात्रेला जायचं वय झालं नाही.तुम्हाला जायचे तर तुम्ही देव देव करून घ्या. शेवटी मुलाने त्यांना दुबई टूरवरती पाठवले आणि स्वतः खरोखरी कुलदेवतेला जाऊन आले.
आल्यानंतर काही दिवस सरळ गेले, पुन्हा त्यांना एकटे -एकटे वाटू लागले. मग त्यांनी एखादे महिला मंडळ जवळ केले. परंतु त्यांचे मन रमत नव्हते. त्यांच्या डोळ्यापुढे आसावरी आणि अभिजीत राजे यांची जोडी दिसत होती आणि आपल्यालादेखील या वयामध्ये कोणतरी "अभिजित राजे" मिळावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्या स्वतःची बडबडत असताना सूनबाईने ऐकलं, शिवाय "अग बाई सासुबाई" सिरीयल बघताना सासूबाईंच्या चेहऱ्यावर येणारी चमक आणि त्यांच्या चेहर्यावरचे भाव कल्याणीने टिपले. परंतु अशा नाजूक विषयात आपण डायरेक्ट कसं बोलावं हा तिला प्रश्न पडला, तिने आपल्या नवऱ्याच्या कानावर घातले आणि मग मुलाने आईला डायरेक्ट विचारले तुला काय त्रास आहे? तुला काय अपेक्षा आहे? त्यांनादेखील मुलाशी खुलून काही सांगता येईना, मग तोच बोलला आई! या सगळ्या गोष्टी फक्त सीरीयलमध्ये असतात. प्रत्यक्षामध्ये असा अभिजीत राजे मिळत नाही, असा जर मिळत असता तर आपल्या देशातल्या स्त्रियांवर एवढे अन्याय अत्याचार झाले असते का? या फक्त सीरीयलमध्ये दाखवायच्या गोष्टी असतात. बरं मला खरोखरच सांग तुझ्या नजरेसमोर कोणी अभिजीत राजे आहे का? असेल तर माझी ना नाही.
नाही रे! बबड्या, आईच्या "बबड्या" शब्दाबरोबर केदार एकदम खवळला. आई मला बबड्या म्हणू नको. मी काय तुझ्याशी बबड्यासारखा वागतो का? आता मी पण सीरीयलमधल्या बबड्यासारखे वागायला सुरुवात करू का? त्याने आईला विचारले त्याबरोबर मात्र त्या खाडकन जाग्या झाल्या.
अरे खरंच की! आपण चुकतोय इतके दिवस आपण मुलांच्या लग्नाची स्वप्न बघत होतो आणि एकदम स्वतःच्या लग्नाचे स्वप्न कुठे बघायला लागलो. आपली सूनबाई चांगली आहे. तिला मुलीसारखी मानली पाहिजे. ती आपल्याशी चांगलेच वागते. मुली सारखीच वागते. गेले वर्षभर मी उगाचच मुलाशी आणि सुनेशी वाईट वागले असा तर काही त्यांनी कुठला अभिजीत राजे बघितलेला तर नव्हता किंवा त्यांच्या मनातदेखील कोणी नव्हता पण त्यांना उगाचच आसावरी अभिजीत यांचे प्रेम बघून आपल्यालादेखील या वयामध्ये अभिजीत राजेसारखा एखादा सोबती मिळावा असे वाटत होते.
पण सीरियल ही सीरीयल असते. त्याचा वास्तवाशी संबंध नसतो हे त्यांना कळून चुकले आणि त्यांनी केदारला बोलावून सांगितले. मी तीर्थयात्रेला निघतेय! माझे बुकिंग कर. त्यावर त्याने असे सांगितले आई कोरोना संपला की आपण तिघे युरोप टूरवर जात आहोत आणि त्या घरात पुन्हा एकदा खुशीचे वातावरण तयार झाले.