आनंदाचे झाड
आनंदाचे झाड
खूप नाती आपल्या आयुष्यात येत असतात. काही टिकतात काही आपण टिकवतो. काही टिकली असं दाखवावं लागतं. काही नात्यात आपण हरवून जातो. काही नात्यात आपण स्वतःला शोधतो. काही नात्यात आपण स्वतः मुळे नात्याला हरवून जातो. हे सगळं होत असतं ते अपेक्षा मुळे. आणि आपण मात्र कायम समोरच्याला दोष देत असतो की त्याच्यामुळे हे नातं संपलं किंवा आहे किंवा टिकलं किंवा खोटं-खोटं टिकवतो आहे. वास्तविक नात्यात आणि झाडात फार फरक नाही. एखादं रोपटं जसं तुम्ही आणून लावता त्याला पाणी देता खत घालता तेवढा वेळ देता मग ते झाड ते रोपटे बहरायला लागतं. ते रोपटं जेव्हा तुम्ही आणलेलं असतं तेव्हा तुम्हाला माहित नसतं कि ते फुलाचं आहे की फळाच. जसजसा वेळ जाईल त्याचे संगोपन होईल त्याला वेळ रुपी खत आणि पाणी घातलं जातं तसं तसं ते झाड बहरतं. आणि मग आपल्याला कळतं की हे झाड कोणते आहे. तसंच आहे नात्यांच. वेळ देणे हे नात्यांचे प्रमुख खाद्य आहे. एकमेकांना समजून घेणे हे पाणी आहे. आणि याचे गणित योग्य ठेवणे हे माळ्याचे काम असते तरच खऱ्या अर्थाने ते झाड फुलते फळते बहरते आणि त्यातून आनंद निर्माण होतो. आणि मग त्याला आपण म्हणू शकतो आनंदाचे झाड. पण हल्ली सगळ्यांनाच कोणतेही झाड मग ते खरे असो किंवा नात्यांचे इन्स्टंट हवे असते. झाड लावलं की त्याला फुलं नाहीतर फळं आलीच पाहिजेत. तेही लगेच. कित्येकदा आपण व्यवहारात पाहतो की लोक कोणतेही झाड कोणत्याही रोपटे विकत घेताना त्याला फुल असणे गरजेचे आहे किंवा फळ असणे गरजेचे आहे असेच समजतात. आणि त्यामुळे अशा इन्स्टंट झाडांना वेळ न देता निव्वळ खत पाण्यावर ते बहरेल अशी मानसिकता असते. आणि काही प्रमाणात तसे होईलही परंतु त्या झाडाची फुले किंवा फळे तितका आनंद देऊ शकतात का? मग अगदी असंच कोणत्यातरी डोंगरावर कोणत्यातरी माळरानावर फुललेले तसेच त्याच प्रजातीचे झाड आणि अगदी स्पेशल घरात कुंडीत किंवा बगिच्यात थाटात लावलेले झाड यात काय फरक असावा बरं? हा मला पडणारा कायम प्रश्न. पण याचे उत्तर मी शोधून काढले. ते असे की डोंगर माळावर किंवा कोणत्याही जमिनीवर बिनधास्तपणे उगवलेले झाड सगळ्यांना आनंद देऊन जाते. आणि खास विकत आणलेले झाड त्याच्यावर शास्त्रोक्त
केलेले संस्कार हे त्या घराच्या किंवा झाडाच्या मालकाला आनंद देऊन जाते. आता जर माळराना वरती खत आणि पाणी नसताना झाड बहरतेय तर ते घरातही बहरले पाहिजेच, पण कित्येकदा असे होत नाही. कारण त्या झाडा पासून अविरत आनंद मिळवायचा असेल तर त्याला वेळ देऊन त्याचे संगोपन केले पाहिजे. त्याला वेळ देऊन खतपाणी घातले पाहिजे. कारण विशेष लक्ष देऊन संगोपन केलेले झाड आणि त्यात आलेली फुले किंवा फळे ही त्या झाडाला सुद्धा आनंद देत असतात. आणि त्या झाडाचा आनंद वातावरणातून सर्वान पर्यंत पोहोचत असतो. आणि त्या झाडाच्या मालकाला हा सर्वांपर्यंत पोहोचलेला आनंद आनंदाने ओतप्रोत भरून टाकतो.
तसेच असते नाते. कोणतेही नाते नसताना तिऱ्हाईत पणे राहून बहरणे ही खरंतर नात्याची सुंदरता असते. पण ज्यावेळी आपण एखादे नाते तयार करतो तेव्हा ते योग्यरीत्या संगोपित केल्यास त्याचे बहरणे त्या नात्याला पाहणाऱ्या प्रत्येकाला आनंद देऊन जाते. मग ते नातं कोणतेही असो. जे नाते प्रत्येकाला आनंद देते ते नाते एका संपूर्ण बहरलेल्या झाडासारखे असते. कदाचित अशी नाती काल्पनिक असू शकतात. पण अशी नाती प्रत्यक्षातही असू शकतात. नशीबवान लोकांच्या आयुष्यात असे आनंदाचे झाड असते. मग ते कधी आई वडिलांच्या रूपात असेल तर कधी भाऊ-बहिणी च्या रूपात असेल किंवा एखादा मित्र किंवा मैत्रिणीच्या रूपात असेल किंवा ते कोणत्याही रूपात असेल. पण असे कोणत्याही रुपात असलेले झाड तेही आनंदाचे झाड आयुष्यात असणे हे नशिबाने साध्य होते. आपल्या आयुष्यात असे आनंदाचे झाड आहे की नाही हे कुणालाच माहीत नसते. पण आपण एक करू शकतो की आपण कोणाच्या तरी आयुष्यात आनंदाचे झाड होऊ शकतो. जिथे मन बुद्धी विचार शरीर या सगळ्यालाच विसावा मिळेल. आणि म्हणून ते झाड आनंद उत्सवी बनेल. आपण खरं तर प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात असे आनंदाचे झाड प्रत्येक नात्यात जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तरच आयुष्य खर्या अर्थाने नंदनवन होईल.
म्हणूनच प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे एक तरी आनंदाचे झाड असावे ज्या झाडाच्या सावलीखाली सर्व दुःखे सर्व त्रास सर्व वेदना विसरल्या जाव्यात आणि फक्त विसावता यावं तेही आनंदाने आणि समाधानाने.