आई
आई
जेव्हा कधी आपल्या आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतात तेव्हा आपल्या मनात आणि आपल्या ओठांवर "आई" हे शब्द येतातच.
आई साठी लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न करतेय काही चूकभूल झाल्यास क्षमा असावी.
कारण, मी इतकी ही परिपूर्ण नाहीये की सर्वस्व अचूक शब्दांत व्यक्त करेल. चुका या मानवाकडूनच होतात. पण चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता मानवाने घ्यावी.
जेव्हा एखादी स्त्री नवजात बालकाला जन्म देते तेव्हा त्या स्त्रीला मातृत्व प्राप्त होते. ती कायमच आपल्या बालकांवर चांगले संस्कार करत असते. उत्तम शिक्षण देत असताना ती उत्तम गुरू हि बनत असते. ती एवढ्यावरच थांबत नाही तर आपण हि समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव करून देत असते.
समाजात वावरताना आपली प्रतिमा कशी निर्माण करावी याची प्रचिती देत असते. तिच्या ईच्छा आकांक्षा ती कधीच कोणाला सांगत नाही पण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ती आवड जोपासत असते. प्रत्येक नात्याला पूर्णत्वाला नेत असते. ती प्रत्येक भूमिका मध्ये आपल्याला दिसून येते, मग कधी ती आई, बहीण, वहिनी, मावशी, आत्या, काकी, मामी, आजी अश्या अनेक नाती ती जोपासत असते.
स्त्री साठी तीच विश्व म्हणजे तीच कुटुंब असतं.
यश असो की अपयश ,स्त्री कायम कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. कुटुंबातील कोणी सदस्य आजारी असतील तर ती त्यांची जिवापाड काळजी घेत असते आणि घरातील सर्व कामे हि करत असते, पण कधी ती आजारी असली तर ती स्वतःची काळजी न घेता घरातील सर्व कामे व्यवस्थित पार पाडत असते पण आपण कधी तिची काळजी घेत नाही उलट तिलाच आपण विचारतो की,
तु आमच्यासाठी काय केलंस...
जेव्हा तिचे मुले चांगले शिक्षण घेऊन एखाद्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत असतात, हे जेव्हा ती जवळच्या व्यक्तींना सांगते तेव्हा तिच्या आनंदाला सीमा उरत नाही. ती फक्त आपल्या मुलांकडे वेळ मागत असते पण मूले तिला तेवढाही वेळ देत नाही उलट तिच्या समोर वेळेचं गणित मांडत बसतात, जिच्यामुळे आपण ह्या पदापर्यंत पोहोचलो ह्याचा क्षणिक विसर पडतो आपल्याला आणि आपण तिला विचारतो की, तु आमच्यासाठी काय केलंस...
एवढं सगळं सहन करून हि जेव्हा ती आपल्या मुलांचे लग्न करून देते आणि त्यांच्या संसार सुखाचा व्हावा यासाठी परमेश्र्वराकडे मागणे मागत असते. एवढ्यावरच ती थांबत नाही तर ती तिच्या नातवडांवर प्रेम करून त्यांच्यावर ही चांगले संस्कार करत असते, तरी आपण तिला विचारतो की,
आई, तु आमच्यासाठी काय केलंस....
आई, तु आमच्यासाठी काय केलंस....