जीवन अनमोल
जीवन अनमोल
बरसल्या जलधारा मृदगंध दरवळला
ठाव घेई मनाचा आठवला जगपोशिंदा
सांगतो तो ,घेऊन तळपता सूर्य डोईवर
राबराब राबतो मी दिवसभर .1
रूसतो जेव्हा बळीराजा आस एकच असते नेत्री
वाट पाहतो मेघांचे कलश रिते होण्याची
मातीच मायबाप आम्हा कृषीवलांची
दया कर देवा ह्या धूसरलेल्या पापण्यांची. 2
खोल डोळे सुरकुत्या चेहऱ्यावरती
उपवर पोरं, भुकेले ढोर ,अश्रू गालावरती. ...............
वारी करू कशी मी विठ्ठला पंढरपूरची
तूच आण पाणी विनवणी कर चंद्रभागेची. 3
बी-बियाणं ही गेले वाया धरती भेगाळ
पाण्याविना शिवारही झालं कसं ओसाड
काळजाच्या भेगा नाही दिसत कुणास
किती साहू क्लेश वाटते संपवावे जीवास. ४
कष्ट करू, घाम गाळू नाही भीत कामाला
दया कर आम्हावर विनवणी करतो देवाला.....
पोटास चिमटा, अभाग्याच्या घरी उतरंडी खाली
नशिबावर फोडू खापर कोण आमचा वाली. ५
शेतच माझे तीर्थ रामेश्वर अन् काशी
पाण्याविना फोडतो हंबरडा खेळतो जिवाशी .
पोटात भूकाग्नी पेटलेला, माल नाही पैसा नाही
कोरडा गळा जरी मेघ दाटले आकाशी. ६
वाट पाहते बीज ,धडपडते होण्या बिजांकुर
कष्टाची ओंजळ वाहतो घाल प्रेमाची फुंकर
विठुराया दोन्ही हातांनी हे आभाळाचे द्वार खोल
येऊ दे मेघसरींना तूच म्हणतोस ना जीवन हे अनमोल.