जाण असो उरात
जाण असो उरात
वसुंधरेला विवस्त्र करताना
कसा रे तुझा हात अडखळला नाही..........
माहित होतं ना या कलियुगात
तो कृष्ण धाव घेणार नाही. ........१
जिच्या अंगाखांद्यावर खेळलास
तिच्याच हृदयावर घाव केलास.
वृक्षांची कापणी पाण्याची नासाडी
पर्वत तोडून फैलवले प्रदूषणास. २
आसमंत सारा दूषित केलास धुराने
धरेची छाती पोखरली खनिजसंपदेसाठी ऋतुचक्राचे नियम चुकले तुझ्यामुळे
किती कृतघ्न होशील मानवा तु स्वार्थासाठी ३
वृक्ष लताच नाहीत पाणी धरण्या भूमध्ये
तृष्णा कशी होईल तृप्त नदी-नाले आटले
उजाड झाली सृष्टी सारी काळीज तिचे दुभंगले
डोळ्यात आसवे अन दुष्काळाचे मेघ दाटले. ४
सिमेंट रेतीची जंगले सजली
भूमातेची हिरवाई रुसली
हाक तिची अंतरात भिडली
आशा तिची मनात दडली .५
वृक्ष अभावी प्राणवायू नष्ट झाला
कधी कोरोना, त्सुनामी ,प्रलय निसर्ग प्रकोपला .
जागृत हो मानवा समज हा दैवाचा विपरीत घाला
जल ,वृक्ष ,वायू दैवत आमुचे आदर करूया चला . ६
एकेक श्वास आमचा ह्या प्रकृतीचा ऋणी
रसायनाने जाळली करपली तिची कांती
आता तरी वनसंवर्धन करूनी वाढ करू जलाशयांची
दिवस सुगीचे येऊ दे.ऐकूदे करलव पक्ष्यांची. ७
सर्व शक्तिमान ही सृष्टी साऱ्या ब्रम्हांडात
हास्य तिचे उमलू दे विविध रंगाच्या फुलांत....
बरसू दे मेघांना धरेच्या चिरा-चिरात
शेवटी तिच्यातच विसावायचे आहे जाण असो उरात.८