आस नको!
आस नको!
धुमसत्या निखाऱ्यात, ज्योत पुन्हा तेववू नको,
समांतर वाटेवरूनी,वळण हे घेऊ नको ।।धृ।।
पुसट, धुसर ठशांवरूनी, माग हा काढू नको,
कोमेजलेल्या पाकळ्यांचा,मंदगंध हुंगू नको,
पानझडीचा मोसम हा, हरितपर्ण धुंडू नको,
गतकाळच्या मृत स्मृतींना,उजाळा देवू नको।।१।।
नवरत्न ल्याल्यावर,शाल रेशमी स्मरु नको,
ताग परिधतानाची, चैन सोनेरी आठवू नको,
गालिचावर घालिता पिंगा,कारुण्य दाटू नको,
काट्यात रुंजी घालताना,स्वप्नातही पाहू नको।।२।।
पुरात विखुरले मत्स्य,परतीची आस नको,
शोधतील ते निवारा,रत्नाकराचे अश्रू नको,
पावसाळी सायंकाळी,इंद्रधनू दावू नको,
शरदाच्या संभ्रमी प्रभाती, बहराची आस नको।।३।।
बीजपेरणाचा मोसम,सरल्याची मोजणी नको,
हरित रोपटी तरारली असती,आता स्मृती नको,
आवटणीतही पेरणी राहिली,अश्रू दाटू नको,
फडात उसाच्या,कणीसाची वरीच्या आस नको।।४।।