तू असा जवळी रहा!
तू असा जवळी रहा!
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा...
तू असा जवळी रहा......
"हैलो मैडम,आज अगदी ठरवून मी छान तयार झाले आणि प्रयत्न पूर्वक सुरजच लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क सूचक वाटेल असं, वर तुम्हाला सांगितलेलं गाणं देखील म्हटलं पण काही परिणाम झाला नाही त्याच्यावर. तो सरळ पाण्याची बाटली घेवून किचनमधे जसा आला होता तसा परत त्याच्या रुममधे निघून गेला. मला वाटतेय की, तो जरा जास्तच दुखावला गेला आहे. त्यामूळे मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे !"
"हरकत नाही रीना, वेळ गेला तरी धीर सोडू नकोस आणि प्रयन्त करणेही! मुळात तू अगदी प्रैक्टिकल विचार करणारी मुलगी आहेस आणि सुरज इमोशनल! त्यातून तो शब्द न शब्द तोलून, मापून बोलतो. त्याच्यासाठी त्यामागचा टोन आणि त्यामूळे बदलणारे अर्थ हे सगळं खूप महत्वाचं आहे. तू बोलताना अगदी सहज बोलते पण त्याचा परिणाम सुरजवर होतो. त्याच्यासाठी त्याची फैमिली महत्वाची आहे. मला वाटते आपण तुझ्या कम्यूनिकेशन स्किल वर आधी काम करू. तुला जे म्हणायचं आहे तोच भाव समोरच्या पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. इतका बदल जर तू स्वत:मधे करू शकलीस तर आयुष्यात पुढे अनेक चांगले बदल सहज घडत जातील."
रीनाला कोचचे म्हणणे पटले आणि तिने सुरजला तिच्यापासून कायमचे वेगळं होण्याच्या त्याच्या मनात आलेल्या विचारांपासून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. सुरुवाती पासून सगळ्या घटना ती आठवत गेली आणि कुठे सुधारणा होऊ शकली नाही आणि वाद वाढले ते नमुद करून ठेवू लागली.तिला पहिला संवाद आठवला.
"सॉरी सुरज आपल्या लग्नाला अवघे सहाच महीने झालेत आणि मला एका प्रोजेक्टच्या निमीत्ताने जर्मनीला जाण्याची संधी मिळते आहे जावे की नाही? काय करावे? सुचत नाही!"
"त्यात न सुचण्या सारखे काय आहे. तू बिनधास्त जा. दोन वर्षांच्या तर प्रश्न आहे.आपण रोज स्काइप वर बोलू, मग नाही फार अंतर जाणवणार.अशी संधी वारंवार चालून येत नाही. आम्ही सगळे तुला मदत आणि चिअर दोन्ही करूत."
सुरज आणि रीनाने समजूतदारपणे निर्णय घेतला. रीना जर्मनीला गेली देखील...पण अधून मधून इतक्या दूर राहूनही एकमेकांबद्दल ओढ वाटण्या पेक्षा त्यांच्यात खटकेच जास्त उडत होते. बोलता बोलता दोन वर्षे पूर्ण झाली, पण वाद निवळले नाही.
"मी किती वेळा तुला मेसेज केला सुरज! कॉल लावले पण तू रिस्पॉन्स देत नाहीस. माझा हा प्रोजेक्ट संपलाय आणि मी भारतात येण्यासाठी उद्या इथून निघते आहे.खुश व्हायचे सोडून तू काय लहान सहान गोष्टी मनाला लावून घेत अबोला धरतोस?"
"तुला या गोष्टी लहान वाटत असल्या तरी मला शब्द बोचतात. चुकीचा टोन किंवा शब्द वापरून तू विसरते. काही साध्या गोष्टी तुला पटत नसल्यातरी मला किंवा माझ्या घरच्यांना बर वाटावेे यासाठी तू त्या करू शकते ना? आता तू येतच आहेस तेंव्हा आपण समोरासमोर बोलू!"
रीनाला हे सारे आठवून गेले आणि तिला सुरजने ती भारतात आल्यावर थोड्याच दिवसात माहेरी का पाठवून दिले हे उमजलं.ते दोघेही त्यांच्या स्वभावानुसार वागत होते आणि जे त्यांना योग्य वाटत होतं त्यांमूळे कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. शेवटी सहा महिने ते दोघेच एका वेगळ्या फ्लैटमधे एकत्र राहून भांडण मिटवू शकले नाही तर वेगळे होण्याच्या निर्णयाकडे वळणार होते. त्याआधीच स्वत:च्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळावी याकरता रीनाने कोचची मदत घेतली होती.
प्रचंड इच्छाशक्ती,पुन्हा सारे सुरळीत करण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची तयारी, चिकाटी या सगळ्याच्या बळावर धीराने तोंड देत तिने शेवटी सुरजचे मन जिंकले. एकाच घरात राहून जो सुरज तिच्याशी एकही शब्द बोलत नव्हता किंवा वळून पहात नव्हता तो तिला आता कायमचे सोबत ठेवत त्याच्या आयुष्यात त्याला करायच्या सगळ्या गोष्टीत सहभागी करुन घेत होता.
"थँक यू वेरी मच मैडम! आज खास तुम्हाला मी आनंदाची बातमी द्यायला फोन केला आहे. तुमच्या मदतींने आता मी आणि सुरज एकमेकांसोबत सुखी आहोत. लॉकडाऊन काळात सुरजची नोकरी गेली पण माझे IT field असल्याने घरुन काम चालू होते. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली आहे त्यामूळे आम्हाला अडचण आली नाही.आम्ही लवकरच आता कॅनडाला शिफ्ट होतोय. सूरजच्या मनात त्याचा स्वत:चा फूड बिज़नेस सुरु करण्याची कल्पना आहे. त्याचे अनेक मित्रही आहेत तिथे. हे सगळं आम्ही दोघांनी आपसात अगदी शांतपणे बोलून ठरवले याचा मला आनंद आहे. स्वत:मधे आम्ही दोघांनी केलेले छोटे छोटे बदलदेखील आम्हाला सुखावून गेले."
सेशन्स संपले तरी, रीनाने जाण्यापूर्वी आठवणीने केलेला फोन,त्यांच्या सुखी आयुष्याकडे त्यांनी पाऊल उचलल्याची पुन्हा एकदा ग्वाही देवून गेला.