Vrushali Thakur

Horror Fantasy

1.6  

Vrushali Thakur

Horror Fantasy

तृष्णा - अजूनही अतृप्त (भाग 3)

तृष्णा - अजूनही अतृप्त (भाग 3)

11 mins
809


" कसं वाटतंय आता....?" बाबांनी अनयच्या डोक्यावर थोपटत विचारल. मागचा अर्धा तास तो बेशुद्ध पडून होता. बाबांनी आजूबाजूच्या सर्व डॉक्टरांना कॉल पण कोणीच नेमक शहरात नव्हत. बाबा एकटेच त्याला उचलून तर कुठे घेऊन जाऊ शकत नव्हते. त्याला तिथेच कसबस बेडवर ठेवत त्याच्या बाजूला बसले. त्याच्या कपाळाला विभूती लावून केवळ परमेश्वराचा नामस्मरण करत होते. मंत्राच एक आवर्तन पूर्ण होताच अनयने डोळे किलकीले केले आणि बाबांच्या जीवात जीव आला. 

" बाबा...मी ते....तिला.." अनयने जे काही पाहिलं होत ते त्याला सगळच सांगायचं होतं पण पुन्हा त्या घटना डोळ्यासमोर जश्याच्या तश्या उभ्या राहिल्या. आणि त्याचा श्वास गुदमरला. 

" नको... काही सांगू नका. मला माहितेय काय पाहिलं असेल..." बाबांनी हातातील जपमाळ बाजूला ठेवली. त्यांना तर आधीचा अनुभव होताच. " चला इथून तुम्ही.. जावईबापू... तुमच्या जीवाला धोका आहे.. माझ्या मुलीपायी मला तुमच्या जीवाशी खेळायच नाही.." 

" असुदे.. पण मला वाचवायच तिला.... काहीही होऊदे मग..." अनय निग्रहाने ओरडला. 

" तुम्ही चला इथून.... बाहेर बोलूया.." बाबा अनयला जवळजवळ ओढतच घराबाहेर घेऊन आले. त्यांच्या ओढातानीत बाबा मगाशी छोट्या टेबलवर ठेवलेली जपमाळ घ्यायला मागे वळले आणि थबकले. पाठीमागून धुक्याचा एक मोठा लोट वादळासारखा घोंघावत वेगाने त्यांच्याच दिशेने येत होता. धुक्यातून अक्राळविक्राळ आकार आपला जबडा वासून झडप घालण्याच्या पवित्र्यात धावत होता. " अनय पळ...." कशीबशी जपमाळ खेचत त्यांनी मागे वळत पाऊल टाकले. आणि नेमकी जपमाळ टेबलाच्या निघालेल्या खिळ्यात अडकून ओढली जाऊन तुटली. जपमाळेतील रुद्राक्ष धाग्यातून विलग होऊन टप टप करत जमिनीवर विखुरले गेले आणि धुक्याचा स्पर्श त्यास होताच छोटासा स्फोट घडून आला. रुद्राक्षाच्या ऊर्जेने धुक्याचा आकार विखुरला गेला. त्याचा वेग मंदावला. ही संधी साधून अनय आणि बाबा दोघेही हरणाच्या वेगाने घराबाहेर पडले.

" जय श्री शिवशंकरा..." बाबांचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्यांनी दरवाजाकडे पाहत हात जोडले.

" ती एकटीच आहे आत.." अनय तिच्या काळजीत पडला.

" ही शक्ती तिला काहीच नाही करत आणि तिला हे सगळ बाहेर घडतंय ह्याचा अंदाज पण नसेल." बाबा शांतपणे उत्तरले.

" तुम्हाला तिची काळजी नाही का हो.." अनय रागाने ओरडला. सगळ्या त्रासाने लाल झालेले त्याचे डोळे अजुनच आक्रमक झाले. बाबांच त्रयस्थासारखं वागणं त्याच्यासाठी कोडच होत. जणू त्यांना काही काळजीच नसावी तिची. 

त्याच्याकडे लक्ष न देता बाबा घराच्या दिशेने जायला वळले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अनय अजुनच वैतागला. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत तो दुसऱ्याच रस्त्याने निघून गेला. बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. चेहऱ्यावर प्रचंड पश्चात्ताप आणि डोळ्यात केविलवाणे भाव होते. कदाचित आता त्यांच्या चेहरा अनयने पाहिलं असता तर कळलं असत की जगातील सर्वात हतबल व्यक्ती तेच असावे.

------------------------------------------------------------------------

आताच प्रणयात न्हाऊन निघालेल अंग सावरत ती तिच्या मऊशार बेडवर विसावली. बाजुचीच मऊ गुलाबी फुलांची चादर तिने आपल्या देहाभोवती गुंडाळली... बराच वेळ झाला तो कुठेतरी निघून गेला होता.. आताशा तिला त्याला अजिबातच सोडवत नव्हतं. काय काय आणि कसं कसं सुख पेरत होता तो तिच्या आयुष्यात. तिच्या मऊ तांबूस सोनेरी कुरळ्या केसांना अजूनही त्याच्या स्पर्शाचा गंध येत होता. हलक्या नाजूक मोरपीसासारखी फिरणारी त्याची बोटं अजूनही तिच्या मानेवर रेंगाळत होती... नुसत्या त्याच्या स्पर्शाच्या आठवणीने ती रोमांचित झाली... त्याच्या खट्याळ आठवणीने ती स्वतःशीच हसली. हा माणूस असता तर.. हे असं लपून लपून भेटण्यापेक्षा किती मनमुराद जगलो असतो.. नाहीतर तो अनय... शी... बाबांना हाच विचित्र मनुष्य भेटला होता का माझं लग्न करायला... पण दुसर होत तरी कोण मला स्वीकारणार... तो... तो तर सगळ्यात चांगला मुलगा होता माझ्यासाठी पण मला सोडून निघून गेला... माझ्या प्रेमाला समजून न घेता पायदळी तुडवून गेला... त्याने एकदा हाक मारली असती ना सगळ सोडून विरघळून गेली असती त्याच्यात.... आणि हा... हा तर कसल्या शक्तीचा प्रकार आहे काय माहित... जेव्हा जवळ येतो तनामनावर मोहिनी घालतो... आठवत नाही बाकी काहीच.... मग आज तो कसा आठवला... ती चपापली... काहीतरी नक्कीच चुकलं होत.... इतक्या वर्षांनी तो आठवला होता..

-----------------------------------------------------------------------

ओम जसा जसा पुढे जात होता तसा समोर दिसणारा प्रकाश अजुन प्रखर होत होता. त्या प्रकाशापासून हातभर अंतरावर असताना अगदी लख्ख उजेड पडला. त्या तेजाने बावरून ओमने आपल्या उजव्या हाताने डोळ्यांना आडोसा दिला. हळू हळू करत त्याने डोळे उघडले. समोर एक उंचच उंच फुलं आणि वेलींच नक्षीकाम केलेली पुरातन दगडी भिंत होती. अगदी उंचावर बारीक जाळीच कोरीवकाम केलेल होत. भिंतीवर मधोमध पुरुषभर उंचीचा नक्षीदार खांब कोरलेला होता. त्या खांबाच्या टोकावर साधारण फुटबॉल एवढ्या आकाराचा एक ओबडधोबड दगड होता. त्या दगडातून इतका प्रखर प्रकाश पाझरत होता. त्याने हळूच गळ्यातील लॉकेट पाहिल ते ही समोरच्या दगडाइतकच झळाळत होत... कदाचित त्याच्या गळ्यातील खडा हा त्या दगडाचाच भाग असावा...

आता पुढे काय...त्याच्या तिन्ही बाजूला तशाच मोठाल्या भिंती होत्या. मागे परतून पुन्हा काळोखात बुडून जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. इथूनही कुठे जाता येणार नव्हतं. त्यात श्वास घेणही अवघड होऊ लागलं. जमिनीपासून हे भुयार बरच खाली असाव. लवकर मार्ग शोधला नाही तर इथेच गुदमरून मरण्याची शक्यता होती. त्याने पुन्हा एकवार भिंतींवर नजर फिरवली. उंचच उंच नक्षी शिवाय त्याला काहीच सापडलं नाही. काहीतरी आठवून त्याने भिंतीवर हात फिरवला. कदाचित कुठेतरी कळ असावी. परंतु कितीही त्या भिंतीना चाचपडल तरीही काहीच होत नव्हतं. भिंतीवरच्या नक्षीतील फुल, वेली सगळ पुन्हा पुन्हा चाचपडून झाल. तो वैतागुन गेला. आधी इतका विचित्र प्रवास आणि त्यात हे भुयार.. तो थोडा मागे सरकला. आधीच इथे बंदिस्त वातावरण असल्याने हवेत दबाव जाणवत होता. त्यात धडपड करून फक्त दमायला होत होत. त्याने खांबाकडे पाहिलं. त्यावर अतिशय नाजूक कोरीवकाम करून खांब सजवला होता. परंतु मधल्या भागावरची नक्षी थोडी विसंगत भासत होती. त्याने सहजच खांबावर हात फिरवला मात्र त्यावरची विसंगत वाटणारी बरीचशी नक्षी कोसळून पडली. ओम घाबरून गेला... हे काय आता नवीन... त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याच्या छातीची धडधड त्याच्या कानाना ऐकू येऊ लागली. त्याने पुन्हा वाकून तुटलेल्या भागाकडे पाहिलं. आतल्या बाजूला काहीतरी कोरलेल होत. प्रथमदर्शनी कोणत्यातरी प्राचीन भाषेत लिहिल्याप्रमाणे वाटत होत. त्याने हळुवारपणे त्या शब्दांवर हात फिरवला. त्याला काहीतरी आठवल्यासारख वाटलं. त्याच्या डोळ्यांसमोर उडत उडत काही शब्दांनी फेर धरला. त्याला ती लिपी ओळखीची वाटत होती परंतु समजत नव्हती तरीही उगाचच वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्यालाही कळायच्या आधी नकळत त्याच्या तोंडून काही शब्द उच्चारले गेले. त्याक्षणी ते दगडी खांबातील कोरलेली अक्षरे अचानक सोनेरी रंगात चमकू लागली. भूकंप झाल्यासारखी पायाखाली जमीन हादरू लागली. भिंती जोराने हलू लागल्या. पूर्ण भुयार डळमळू लागलं. आणि बघता बघता भिंती बाजूला सरकून पुढे जायचा मार्ग मोकळा झाला. 

धूळ खाली बसताच ओमने आपले गच्च मिटलेले डोळे उघडले. भिंतीच्या आत अजुन एक भुयार होते. आतल्या भागात दोन्ही बाजूला दिवे जळत असल्याने ओमने निर्धास्तपणे चालायला सुरुवात केली. इथल्या भागातील वातावरण अगदी मोकळे आणि तणावमुक्त होते. त्याने आधी छातीभरून शुद्ध हवेत एक खोल श्वास घेतला. मगापासून अंगभर पसरलेली मरगळ क्षणात दूर झाली. आणि दुप्पट उत्साहाने व वेगाने तो पुढे चालू लागला. पूर्ण रस्त्यात दोन्ही बाजूला सुगंधी जळते पलीते असल्याने अंधाराचा मागमूस नव्हता. त्या गुहेतून एका बाजूने छोटासा झरा खळाळून वाहत होता. त्या झऱ्याच्या आवाजाची एक मधुर खळखळ वातावरण प्रसन्न बनवत होती. पायाखालची माती इतकी मऊ होती की पावलांचा आवाजही उमटत नव्हता. पुढे जांभळट दगडी पायऱ्यांची चढण होती. त्यावर दोन्ही बाजूला लाल मातीच्या पणत्यांची आरास होती. पायऱ्या चढून वर आल्यावर एक छोटंसं दगडी सभागृह होत. तिथे मध्येच यज्ञाभोवती काहीजण त्याची वाट पाहत असल्यासारखे उपस्थित होते. 

" ये ओम " त्यातील एका पाठमोऱ्या व्यक्तीने मागे न बघताच त्याच स्वागत केलं. 

" गुरुजी... " आवाजावरून ओमने पटकन त्यांना ओळखलं. जेव्हा पहिली भेट झाली होती तेव्हा ते किती थकल्यासारखे वाटत होती. त्याला पटकन पहिली भेट आठवली. आणि आज मात्र त्यांच्यात नवचैतन्य संचारलं होत. कोणी विश्वासही ठेवला नसता की हे तेच गुरुजी आहेत.

" ये... बस इथे.." गुरुजींच्या आवाजाने त्यांची तन्द्री भंग झाली. चुपचाप आवाज न करता तो गुरुजींनी बोट दाखवलेल्या मृगजीनावर जाऊन बसला. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. एक प्रकारची शांतता पूर्ण वातावरणात भिनली होती. गुरुजींच्या अनुयायापैकी कोणीतरी त्याला एका मातीच्या वाडग्यात कसलस लाल रंगाचं द्रव्य आणून दिलं. ते पाहताच त्याला भुकेची आठवण झाली. कधीपासून तो भयंकर खडतर प्रवास करत इथे येऊन पोचला होता. तहान भुकेपलीकडे इथे येऊन पोचायची ओढ इतकी जबरदस्त होती की घरातून निघाल्यापासून साधं पाणीही त्याने प्यायल नव्हतं. 

" ओम.. ते द्रावण पिऊन टाक.." गुरुजींनी अत्यंत प्रेमळ स्वरात आज्ञा केली. 

त्यानेही क्षणाचा विचार न करता तो वाडगा तोंडाला लावला. खारट, तुरट, कडवट चवीने त्याच तोंड वाकडं झाल. आणि गुरुजींकडे नजर जाताच त्याने एका घोटात सगळ द्रावण पिऊन टाकल. जाळ निर्माण करत ते द्रावण घश्यातून पोटात उतरलं आणि मेंदूला झिणझिण्या आल्या. क्षणासाठी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारून आल आणि सर्वांगाला दरारून घाम फुटला. गुरुजींनी पुढे होत एक राखेच बोट त्याच्या कपाळाला टेकवल. थरथरत बऱ्याच वेळाने तो नॉर्मल स्थितीत आला. 

" घाबरु नको.. हे तुझ्या संरक्षणासाठी होत... तुझं मानवी शरीर ते पचवायला जरा वेळ घेईल..." गुरुजींनी त्याच्या डोक्यावर थोपटल. 

" गुरुजी.. मी ते स्वप्नात.." ओम त्याच स्वप्न सांगायचा प्रयत्न करत होता. पण नुकत्याच प्यायलेल्या द्रावणाची चव त्याच्या जिभेवर येत त्याला त्रास देत होती.

" माहित आहे सगळ... म्हणूनच तुला इशारा मिळाला इथे यायचा.." गुरुजींना भविष्यातील घटनांचा इशारा आधीच मिळाला होता.

" पण मीच का.. आणि तो ओसाड भाग..ते दुभांगणार झाड...काय होत हे सगळं.. " ओमने कडवट चव गिळत विचारलच.

" सगळ सांगतो... तू विज्ञानाच्या जगात जन्मलेला.. तुझं ह्या सगळ्यांवर विश्वास बसत जरा कठीण आहे म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने साधना करवून घ्यावी लागली तुझ्याकडून... तू आता ज्या जागेत आहेस ती जागा भगवान शंकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. कित्येक हजारो वर्षांआधी ही जागा म्हणजे एक घनदाट जंगल होत... अगदी पाऊल ठेवण्यास जागा नव्हती एवढं घनदाट... अशा जंगलात हजारो अघोरी लोक येऊन इच्छापुर्तीसाठी साधना करत असत.. काहींची साधना परमेश्वरभेटीसाठी होती.. तर काहींना सर्वशक्तिमान व्हायचं होत. सर्वच्या सर्व अगदी कडक तपस्वी... शेकडो वर्ष काहीही न खाता पिता, मल मुत्राचा त्याग न करता त्यांच्या पूजनीय शक्तीला अखंड साद घालत होते. सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेने हा प्रदेश इतका भारला गेला की ती ऊर्जा सहन न होऊन त्या जंगलाचं रूपांतर ह्या उजाड माळरानात झाल. दोन्ही ऊर्जेच्या चकमकीत इथे काळ थांबून गेला. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या तपश्चर्यादेखील पूर्ण झाल्या नाहीत. कित्येक वर्षांनी जेव्हा त्यांनी देहत्याग केला तरीही आत्म्याच्या स्वरूपात ते भटकतच राहिले. चांगल्या आणि वाईट दोन्ही आत्म्यांच्या टोळ्यांमध्ये वर्षानुवर्षे युद्ध चालत होत.... ज्याचा काहीच अंत नव्हता. सर्वच अघोरी भगवान शिवाचे भक्त असल्याने शेवटी त्यांना प्रकट व्हावं लागलं. त्यांनी जगाच्या हिताच्या दृष्टीने त्या आत्म्यांना काही बंधन टाकली आणि ह्याच जागी ह्याच गुहेत अंतर्धान पावले. त्यामुळे इथे कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. येथील कोणतीही शक्ती कोणाला हानी पोचवू शकत नाही. व बाहेरील कोणालाही मग तो मनुष्य असो वा एखादा आत्मा कोणीही इथे प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणूनच ह्या आपल्या कामासाठी ह्याच्यापेक्षा उत्तम व सुरक्षित जागा दुसरी कोणतीच नाही. केवळ आणि केवळ ज्याला सर्व सिद्धी प्राप्त आहेत व ज्याचं तपोबल ह्या शक्तीपेक्षा जास्त आहे तो व्यक्तीच इथून सुरक्षित ये जा करू शकतो. "

" मग मी कसा...?" ओमने त्यांना मध्ये तोडल.

" धीर धर... सांगतो... पूर्वीचे लोक भलेही चांगल्या किंवा वाईट वृत्तीचे असुदे ते देवावर विश्वास ठेवायचे. म्हणूनच भगवान शिवाची बंधने त्यांना ताब्यात ठेवून होती. सगळ तोपर्यंत ठीक चालत होत जोपर्यंत करालचा जन्म झाला नव्हता. करालचा जन्मच मुळी ह्या कलयुगात हाहाकार माजविण्यासाठी झाला होता. भयंकर हट्टी आणि अती महत्त्वाकांक्षी असा कराल त्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी मागे पुढे पाहत नसे. तो स्वतःला देवापेक्षाही उच्च समजत असे. ह्या जगावर नुसत तात्पुरतं राज्यच नाही तर अनंत काळापर्यंत त्याला आपली सत्ता प्रस्थापित करून ठेवायची होती. आणि त्यासाठी देवाची वर्षानुवर्षे पूजा करण्यापेक्षा मानवातील तामसिक गुणांना वाढीस लावून त्यांच्या मनात स्वतःची भीती प्रस्थापित करून त्यांच्यावर राज्य कारण जास्त सोप होत. आजही बघ ना.. आपण एकतर अंधश्रद्धा बाळगतो अथवा सरळ नास्तिक बनतो. ईश्र्वरावर सात्विक श्रद्धा ठेवणारे फारच कमी मिळतील... कर्म वगैरे लांबची गोष्ट... करालने ईश्वरी नाही तर अमानवी अघोरी शक्तींना आवाहन करायला सुरुवात केली. आपणही पूजनीय होऊ शकतो व इच्छित गोष्ट मिळतेय ह्या हेतूने अघोरी शक्ती त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला हवी ती मदत करायच्या. बऱ्याचश्या शक्ती त्याच्या ताब्यात असल्याने तो खूप जास्त शक्तिशाली बनला. त्याच्याच बळावर त्याने व त्याच्या शक्तींनी नास्तिकता पसरवायला सुरुवात केली. अर्थात ईश्वरी शक्तीवरील विश्वास कमी झाल्याने साहजिकच त्यांच्या मनात भीतीने वास करायला सुरुवात केली. आणि ते सहजच करालच्या तावडीत सापडत गेले. असाच बळी पडला तो अवंतीनगरीतील सम्राटाचा लहान भाऊ चांद्रहास... चांद्रहास लहानपणापासून हट्टी, उचापती आणि भयंकर लोभी. असच त्याच मन नगरीतील एका वेश्यालयातील सर्वात सुंदर वेश्येवर जडल... तीच नाव होत शशिकला... नानाप्रकारे तिच्यासोबत रासलीला रचल्यावर त्याला तिचा मोह सोडवत नव्हता. ती त्याला कायमस्वरुपी स्वतःसोबत पाहिजे होती. मात्र अवंतीसम्राट ह्या विरोधात होते. वेश्या कधीही राजघराण्याची कुलवधू बनू शकत नाही. जर ती पाहिजे असेल तर राजे चांद्रहास यांना राजघराण्याशी संबंध तोडावे लागतील अशा परखड शब्दात सूनावून सम्राटांनी त्यांची बोळवण केली. प्रणयाच्या कलेत शशीकलाही त्यांच्याप्रमाणे पारंगत असल्याने ते आयुष्यभर तिच्या बाहुंत पडून राहण्यास तयार होते. मात्र त्याचवेळी त्यांची भेट करालशी झाली. आणि इथेच ठिणगी पडली. करालने घडल्या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या मनात सम्राटांबद्दल काळबेर पसरायला सुरुवात केली. आपल्या सम्राट पदाचा एकट्यालाच उपभोग घेता यावा ह्यासाठी छोट्याश्या कारणावरून त्यांना राज्यत्याग करावयास भाग पाडले ही गोष्ट करालने पुरेपूर चांद्रहासांच्या मनावर बिंबवली. आणि मग सुरू झालं मृत्यूच तांडव. करालची जगावर सत्ता प्रस्थापित करण्याची लालसा आणि चांद्रहासांची सूडाची आग ह्यात संपूर्ण अवंती नगरी पापण्या लवण्याआधीच जाळून खाक झाली. आणि चांद्रहास शशिकलेसोबत करालचे परमभक्त झाले. एवढ्यावरच न थांबता ' तुला संपूर्ण जगाचे सम्राटपद मिळवून देतो ' ह्या बोलीवर त्याने चांद्रहासाना स्वतःचा गुलाम बनवून टाकले. कित्येक वर्ष ते दोघे आपल्या अनुयायांसहीत पृथ्वीवर भयाच सावट पसरवायला यशस्वी झाले होते. काळया जादूचे कित्येक प्रकार त्यांनी शोधून काढले. सगळे प्रकार आजमावून बघायला त्यांना हवालदिल जनतेच्या स्वरूपात आयते सावजही मिळाले होते. पृथ्वीवरून देव हा प्रकारच नष्ट होण्याच्या मार्गात होता. त्यात निसर्गाने साथ देणं बंद केलं होत. पृथ्वीभोवती सतत काळया ढगांचे सावट पसरलेले असे. क्वचितच कधीतरी सूर्यकिरणांचा स्पर्श धरेला होई. अन्न धान्य पिकण कधीचं बंद झालं होत. विहिरी नाले नदीचं पाणी किड्यांनी भरून दूषित झाल होत. सर्वत्र रोगराई पसरली होती. माणस एकमेकांच्या रक्ताने स्वतःची तहान भागवत होते. नाती गोती कधीच लुप्त होऊन मागे पडली होती.

तरीही काहीजण परमेश्वर भक्तीची कास धरून लढा द्यायला उभे होते. मात्र करालच्या अमानुष महाभयंकर अत्याचारांसमोर कोणाचाच टिकाव लागला नाही. हे सगळं होत असताना एक व्यक्ती अखंड तपश्र्चर्येत लीन होती ती म्हणजे विश्वनाथशास्त्री. त्या भयंकर कोलाहलात स्वतःच्या मनाची शांती ढळू न देता भगवान शिवाची उपासना करणे हे एकच सत्य होत त्यांच्यासाठी. त्यांच्यावर प्रसन्न होऊन पुन्हा भगवंतांनी विश्वनाथशास्त्रीना आशीर्वाद दिला तो ह्याच भूमीवर. शत्रूचा नाश करायचा असेल तर आधी त्याचा मित्र व्हावं लागत ह्या उक्तीप्रमाणे विश्वनाथशास्त्रीही करालच्या समुदायात सामिल झाले. ह्या जगापासून अनभिज्ञ अशा कित्येक प्रकारच्या उपासना करालचे चेले करायचे. म्हणूनच आजवर कोणत्याच पुण्यात्म्याला करालला साधा स्पर्शही करणं जमलं नव्हत. तिथले प्रकार जाणून एक गोष्ट पक्की होती की सरळ लढून ही लढाई जिंकण अशक्य होत. करालला नेस्तनाबुत करण्यासाठी त्याचाच कपटीपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे होता. परंतु ते एकटे कितपत यशस्वी झाले असते ह्याच्यावर त्यांना स्वतःलाच शंका होती.

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror