STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

2  

Pandit Warade

Tragedy

सरिता-१

सरिता-१

7 mins
110

  "आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना कळकळीची विनंती आहे की, जेवणासाठी पंगत बसत आहे. तरी कृपया सर्व पाहुणे मंडळींनी जेऊन घेण्याची कृपा करावी." लग्न मंडपात लावलेल्या लाऊड स्पीकरचा माईक हातात घेऊन संजूमामा जोरजोरात ओरडत होता. लग्न मंडपातला माईक त्याच्या हक्काचं बोलायचं ठिकाण होतं. एरवी घरात त्याचं बोलणं अगदी तितक्या पुरतं तितकंच होतं. घरी तो जास्तीत जास्त ऐकून घेण्याचीच भूमिका बजावत असे. कारण तो बोलला तरी त्याचं ऐकून कोणीच घेत नव्हतं, म्हणूनच अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी तो बोलायची हौस भागवून घ्यायचा. बऱ्याच लोकांची हीच परिस्थिती असते असं म्हणायला काही हरकत नसावी.


  "लग्नाची वेळ होत आलेली आहे, ही शेवटचीच पंगत आहे. या नंतर लग्न लागल्या शिवाय पंगत बसणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. गावात, कान्या कोपऱ्यात, इकडं तिकडं बसलेल्या पाहुण्यांनी लवकरात लवकर मंडपात येऊन जेवून घ्यावे. लाईट गेल्यास गैरसोय होऊ शकते. लवकरात लवकर बसून घ्यावे. ही नम्रतेची सूचना." पुन्हा एकदा जेवणासाठी सूचना. शेवटची म्हणत म्हणत ही पाचवी पंगत बसत होती. शिवाय, 'लग्नाची वेळ होत आली' हे ऐकून सर्वजण हसत होते, कारण लग्न पत्रिकेवरील मुहूर्ताची वेळ केव्हाच उलटून गेली होती. दुपारी १२.३५ चा मुहूर्त होता. आता जवळपास साडे पाच वाजत आलेले होते. गेल्या पाच तासा पासून 'लग्नाची वेळ होत आली' हे वाक्य किमान दहा वेळेस ऐकवून झाले होते. सर्व मंडळी डीजेच्या आवाजाने वैतागली होती. चार दोन जणांनी नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु तो अयशस्वी ठरला होता. त्यामुळे अगोदर जेवणाचा कार्यक्रम उरकून घ्यायचे ठरले होते.


  "वाढेकरी मंडळी, आपापले भांडे घेऊन वाढायला लागा. आटपा पटापट. ऐ पोळीवाल्या, अरे त्या पलीकडल्या पंगतीला जा की बाबा. भाजी ss भाजी अरे कुणी भाजीची बकेट घ्या बरं पटकन, भाजी फिरवायची राह्यली. चला, हात उचला. थांबू नका. फिरत रहा." मध्येच कुणी तरी पंगतीत फिरून कुठं काय राहिलं ते सांगत होता, वाढणाऱ्यांवर ओरडत होता. 


  "सर्वांना वाढून होऊ द्या. रजा दिल्याशिवाय जेवायला सुरुवात करू नका. झालं का सर्वांना वाढून? बाळू काका, त्या तिकडं कोपऱ्यावर आलं का भात भाजी सगळं? द्यायची का रजा?" इकडं तिकडं पहात सूचना देणं सुरू होतं. 


  "थांबा थांबा! अरे मिठाचं आणा बरं, इकडं मीठ राह्यलं वाढायचं. अरे, तिकडं भात राह्यला. आणा लवकर. हांगी आस्सं. हं! द्या आता रजा." पंगतीतून ऑल क्लियरचा निरोप आल्या बरोबर माईकमध्ये 'वदनी केवळ घेता....' चा श्लोक झाला, 'बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल!श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय! घ्या मंडळी, करा सुरुवात' म्हणायच्या आधीच सुरुवात झालेली होती. 


  सहा वाजले तशी सर्वांच्याच संयमाची हद्द संपली. 'साडेसहा वाजले तरी नवरदेव मांडवात यायला तयार नाही. आता काय करायचं? लग्न केव्हा लावायचं?' अशी चर्चा आपापसात व्हायला लागली. 


  "एवढा कुठं उशीर असतो का राव? मनाला येईल तसं काहीही करावं का?" एक जण दुसऱ्याला म्हणाला.


  "हौ ना राव. तासाभराचा उशीर समजू शकतो. बाकीच्या लोकांना काही काम धंदे आहेत की नाही?"


   तिकडे डीजेच्या तालावर नाचणारे काही जण नाचून दमले होते. त्यांना भूकही लागली होती. त्यांनाही आता बस करावं असं वाटत होतं. परंतु नवरदेवाच्या खास मर्जीतले चारपाच मित्र मात्र ऐकायलाच तयार नव्हते. डीजेला जागेवरून हलू देत नव्हते. कुणी सांगायला गेलेच तर त्यालाच रिंगणात ओढून घेऊन बळेच नाचायला लावायचे. दारूच्या नशेत असलेल्या त्या तरुणांना समजावण्याचा नाद सर्वांनीच सोडून दिला होता. गावातील सरपंच दामू अण्णा समजावण्या साठी गेले असता त्यांचंही कुणी ऐकलं नाही.


  "रुपये चाळीस हजार मोजलेत डीजे साठी, ते काय जास्त झाले होते म्हणून दिले काय? अशी वेळ काय पुन्हा पुन्हा येत असते काय? काही हौस मौज असते की नाही?" मित्र कंपूतला एकजण सरपंचांना म्हणाला.


   "सोयरे हो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. लग्न आयुष्यात एकदाच होत असतं. हौस मौज करायलाच पाहिजे. परंतु त्यालाही काही लिमिट असते की नाही? दुपारचा मुहूर्त असतांना सायंकाळच्या मुहूर्ताची वेळ झाली तरी तुम्ही मंडपात येत नाही म्हटल्यावर काय म्हणावं तुम्हाला? बस करा आता." दामू अण्णा.


  "ओ पाव्हणं! नका मूड ऑफ करू आमचा. जरा नाचू द्या." एकजण जरा धावत अण्णांच्या जवळ येऊन म्हणाला. तसा अण्णांनी तिथून काढता पाय घेतला. 'हे तरुण काही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. विनाकारण आपला अपमान करून घेणं बरं नाही.' असा विचार करून ते तिथून सटकले. परंतु मनाशी काहीतरी ठरवूनच.


  इकडे सरिता, नवरी मुलगी चारदा मेकअप करून बसली होती. 'कधीही नवरदेव मांडवदारी येईल तेव्हा आपल्याकडून उशीर व्हायला नको. नाही तर आपल्याच डोईवर खापर फुटायचं.' ती विचार करत होती, होत असलेल्या उशिरा बद्दल चिंतीत होत होती. तिची आई तर रडतच बसली होती. बापही चिंतातुर होऊन डोक्याला हात लावून बसलेला होता.


   "गणपतराव, असं डोक्याला हात लावून बसला तर भागल का? हात पाय हलवावेच लागतील. काहीतरी करायलाच पाह्यजे आता. या जरा इकडं." दामू अण्णा वधुपित्याला त्यांच्या बैठकीच्या खोलीत घेऊन गेले. सध्याच्या परिस्थितीवर काही तरी तोडगा काढलाच पाहिजे. म्हणून आणखी दोघातिघांना बोलावणं पाठवलं. बाबुराव, बाजीराव, माणिकराव, अशोक शेठ, इत्यादी मंडळी तिथे आली. सर्वांना चहा मिळाला. चर्चेला सुरुवात झाली.


  "मंडळी, हे जे काही चाललंय ते बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं?" दामू अण्णांनी चर्चेला तोंड फोडले.


   "ह्यो डीजे कोण्ही काढला काय म्हाईत, पोऱ्हं पार बिघडून गेलीत. वायकरणीचाच खर्च हाय ह्यो." बाबुराव म्हणाले.


   "खर्चाचं सोडा हो. पण येळ किती वाया चाललाय हा. त्याची काही गिणती?" बाजीराव.


   "सर्वां एकाच मापात तोलून कसं चालंल? डीजे सारेच लावतात पण एवढा उशीर? लोकांना काही काम धंदे आहेत का नाही?" अशोक शेठ आपल्या व्यापारी भाषेत बोलले.


   "अण्णा, या लोकांना चांगला धडाच शिकवला पाहिजे. काहीतरी असं करावं की पुन्हा कुणी असला प्रकार करूच नये." माणिकराव बरेच तावात आलेले होते.


   "मला बी त्येच वाटतंय. पुन्हा कुणाची हिंमत व्हायला नाही पाह्यजेल असे काय तरी करायला पाह्यजे." बाबुराव म्हणाले. 


   "तेवढ्या साठीच तर बोलावलंय सर्वांना मी इथं. गणपतराव, तुमची तयारी असेल तर या लोकांचा कार्यक्रमच लावून टाकू आज." दामू अण्णा वधुपित्याकडे बघून विचारते झाले.


  "माझं तर काही डोस्कच चालना बघा. तुम्हाला सर्वायला जसं पटंल तसं करा. लेक तुमचीच हाय. माह्या सरुचं ज्येच्यात भलं व्हईल त्ये करा." गणपतराव अगतिक झालेले होते.


  "हे पहा. ज्या मुलाला चार चौघांच्या वेळेचं महत्व कळत नाही. वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान समजत नाही. अशा मुला सोबत आपली सरिता कशी काय सुखात राहील?" दामू अण्णा.


   "पर मंग आता कसं करावं?" गणपतराव रडकुंडीला आले होते.


   "हे बघा गणपतराव, आपल्या शंकररावांचा मुलगा संजू कसा वाटतो तुम्हाला? चांगला शिकलेला आहे. घरी तेव्हढ्यास तेवढं बरं आहे. शिवाय नात्याचा प्रश्नच नाही. भाचाच तर आहे तुमचा." अण्णा बोलले तसे इतरांचे चेहरे उजळले. गणपत रावांची चुलत बहीण सखू गावातच दिलेली होती. तिला एकुलता एक मुलगा संजू. खूप शिकला पण नोकरी नाही मिळाली म्हणून घरी शेती करतो. परिस्थिती जेमतेम असली तरी स्वभावानं मनमिळाऊ होता. सर्वांनाच हा विचार पटला.


  "पर त्यो तयार व्हईल का आसं ऐन येळला?" गणपत रावांची शंका.


   "ते माझ्या वर सोडा. तुमची तयारी असेल तर शंकर रावांना मी तयार करतो." अशोक शेठने हमी भरली. 

  

  झालं! ठरलं सारं. अशोक शेठने लगेच शंकर राव आणि संजूला बोलावून घेतलं. दामू अण्णांनी समजवल्यावर दोघेही तयार झाले. ऐनवेळी संजूला लग्नमंडपात स्टेज वर नवरदेव म्हणून चढवायचं. कुणालाच काही कळू द्यायचं नाही. असं ठरवून मंडळी पांगली. आपापल्या गल्लीतून मांडवात आली. 'अजून कसा नवरदेव येईना' म्हणून सर्वांच्या सारखं चर्चाही करायला लागले. 


  माईक वरून वधू वराच्या मामांच्या नावाने ओरड सुरू झाली.


  "वधूचे मामा, वधूला घेऊन लवकरात लवकर मांडवात येणे. तसेच नवरदेवाच्या मामांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी नवरदेवाला लग्नमंडपात घेऊन येणे."


   "आज आपण एक नवीन पद्धत सुरुवात करणार आहोत. आधीच वेळ झालेली आहे. या ठिकाणी आलेले सर्वच पाहुणे आमचे मान्यवर आहेत. सर्वांचे केवळ शब्दसुमनांनी स्वागत होईल. सत्कार कुणाचाही होणार नाही. चला भटजी बुवा, माईक हाती घ्या आणि मंगलाष्टकांना सुरुवात करा. चला अंतरपाट धरणारे स्टेजवर व्हा. वधूवरांच्या मध्ये अंतरपाट धरा." असं म्हणत माईक देवबाप्पांच्या हातात सोपवला गेला. सर्वजण अचंबित झाले होते, नवरदेवाची वरात अजून बरीच लांब होती. डीजे जोरात वाजत होता. त्यांच्या नाचगाण्यावरून ते अजून दोन तास तरी मांडवात येत नाहीत, असे सर्वांना वाटत होते. आणि तेवढ्यात .....


   एक बुरख्याची दमनी पाच सहा तरुण ओढत घेऊन आले. स्टेजच्या अगदी पायरी जवळ दमनी उभी केली. गाडीतून चेहरा पूर्णपणे झाकलेले वधू आणि वर उतरले आणि स्टेजवर चढले. वधुप्रमाणेच वरच्याही चेहऱ्यावर उपरण्याचा बुरखा होता. व्रकडे मंडळी चुळबुळ करू लागली. डीजे वाजतोय, नवरदेवाची वरात अजून दूर आहे. कदाचित डीजे समोर नाचणाऱ्यांना तसेच नाचत ठेऊन नवरदेव आणला असावा. अशीच काही तरी गडबड नक्कीच आहे. हे त्यांना जाणवलं. हे लक्षात घेऊन माईकवरून पुन्हा धमकी वजा सूचना आली.


  "कुणीही जागा सोडून उठायचा प्रयत्न करू नये. बंदोबस्ता साठी आमची तरुण मंडळी सर्वांना घेरून उभी आहे. सर्वांना अक्षता आल्या असतीलच सर्वांनी वधूवरांना आशीर्वाद द्यायचा आहे. 


   "साssवssधाssन" गुरुजींच्या आरोळीने सर्वजण आपापल्या जागेवर सावध बसले. स्टेजवर वधूवरांसोबत गावातीलच तरुण उभे केलेले होते. त्या गर्दीत वधू वरांच्या पाठीमागे उभे असलेल्या मामांचे चेहरेही कुणाला दिसत नव्हते. मंगलाष्टकांना सुरुवात झाली. आणि एकदाचे शुभमंगल सावधान झालं. एकमेकांना हार घालतांना वधूवरांचे चेहरे बघून बाहेर गावाहून आलेल्या वरा कडील मंडळींचे चेहरे बघण्या सारखे झाले होते. फटाक्यांच्या आवाजाने वरातीपुढे नाचणारे आणि नवरदेव अचानक झोपेतून जागे झाल्या सारखे मंडवकडे धावले आणि आरडाओरडा करायला लागले. 

  

  "हा आमचा अपमान आहे. आम्ही तो कदापिही सहन करणार नाही."


  "आमच्या सोबत दगाबाजी झालीय. आम्ही हे चालू देणार नाही. आम्ही आमची वधू घेऊन जाऊ." 


  अशा प्रकारच्या आरडा ओरडीला गावातील तरुणांनी भीक घातली नाहीच उलट परंतु त्यांना जागेवरच थोपवले.


  दामू अण्णांनी माईक हाती घेतला आणि


  "सोयरे हो, झालेल्या प्रकारा बद्दल आम्ही खरोखर दिलगीर आहोत. परंतु आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. लग्नाचा मुहूर्त दुपारी साडेबाराच्या असतांना संध्याकाळी सात वाजेपर्यंतही तुमची मिरवणूक चालते आणि समजवण्या साठी गेलेल्या वडीलधाऱ्या माणसांचा अपमान केला जातोय. हे कितपत योग्य आहे? संयमाचीही काही मर्यादा असते. ज्या मुलाला वेळ, प्रसंग कळत नसेल,आपल्या मित्रांचा सल्ला किती पाळायचा याची मर्यादा लक्षात येत नसेल अशा मुलाने लग्न करून एखाद्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळं तरी करू नये. असे आमचे, आमच्या गावकऱ्यांचे मत झाले. आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला हा सारा खटाटोप करावा लागला. पाहुणे मंडळी कडील कुणी जेवायचे राहिले असल्यास जेवून जावे, तसे जाऊ नये. ही नम्र विनंती. गावातील तरुण मंडळींनाही माझी नम्रतेची विनंती आहे की ही मंडळी आरामात गावाच्या बाहेर जातील याची काळजी घ्यावी. ते आज अतिथी आहेत, त्यांना त्यांच्या गावाच्या सीमे पर्यंत पोहचवून यावे." मांडवातील मंडळी उठून आपापल्या गाड्यामध्ये बसली. डीजे आणि वराची गाडी त्या गाड्यांसोबत घेतली. आणि वधूला सोबत न घेताच परत निघाली. गावातील तरुण त्या सर्वांना त्यांच्या गावाच्या सीमेपर्यंत सोडवायला गेले. 


*****


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy