Pranjali Lele

Inspirational

3  

Pranjali Lele

Inspirational

सप्तरंगी इंद्रधनु

सप्तरंगी इंद्रधनु

6 mins
384


सायलीचे शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या एक चांगले स्थळ येताच तिच्या आईवडिलांनी तिचे मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावले.. मुलगा चांगला शिकला सवरलेला शिवाय मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता.. तेव्हा जास्त विचार न करता त्यांनी हाती आलेले स्थळ जाऊ दिले नाही. लग्न होताच आठ दिवस सासरी राहून सायली आणि समीर त्याच्या नोकरीच्या गावी गेले आणि दोघांच्या नवीन संसाराला सुरुवात झाली.


लग्नानंतरचे नवे नवलाईचे दिवस समीर सायलीचे खूप मजेत जात होते. स्वयपाकाची विशेष सवय नसलेली सायली हल्ली नवनवीन डिशेस यू ट्यूब वर बघत शिकून समीरसाठी बनवायला लागली.. तो देखील आपल्या बायकोचा उत्साह बघून त्यात थोडे कमी जास्त झाले तरी तिचे भरभरुन कौतुक करत असे..


काही ना काही सणानिमित्त तिचे माहेरी पण अधूनमधून जाणे होत तेव्हा आईला पण ती आपल्या नव्या पदार्थाच्या प्रयोगाचे यथेच्छ वर्णन करी.. नवऱ्याला खुश ठेवणे जमतय आपल्या सायलीला हे बघून आईला पण बरे वाटे.. आई वडील चांगला जावई मिळाला म्हणून निश्चिंत होते. सगळा अगदी आनंदी आनंद होता..


सायली आणि समीर बहुतेक वीकेंडला त्याच्या आईबाबांकडे जात असत. तेव्हा मात्र सायलीला सगळ्यांचा व्यवस्थित स्वयपाक करावा लागे आणि त्यात तिची खूप तारांबळ उडत असे.. त्यातल्या त्यात सासूबाईंना थोडेही कमी जास्त खपत नसे.. त्यामुळे तिच्या स्वयपाकावर त्या बऱ्याचदा टीका करत.. अग डाळ जरा आधी भिजवावी म्हणजे छान एकजीव शिजते.. आईने शिकवले नाही वाटत या लहान सहान गोष्टी.. फारच मीठ पडत भाजीत तुझ्या हातून.. अशा प्रकारची वाक्ये त्या सहज बोलून जात.. आणि सायलीला मात्र मनातल्या मनात खूप वाईट वाटत राही.


इकडे घरी आल्यावर हळूहळू समीर देखील हल्ली त्याच्या आई सारखाच तिच्या स्वयंपाकाला नावे ठेवू लागला होता... खाण्यात काही कमी जास्त झाले की माझ्या आईकडून शिकून घे जरा असे हमखास तिला म्हणत असे.. काही महिन्यांपूर्वी आपल्या हातचे काहीही केलेलं गोड मानून अगदी प्रेमाने खाणारा नवरा किती बदलला याचे तिला वाईट वाटत पण मुळातच शांत, सुस्वभावी सायली उलट तोंडाने कुणालाही उत्तर देत नसे. पण या अशा बोलण्याचा तिला फार त्रास होई.


कधी सासू सासरे इकडे राहायला आले की तिला फार टेंशन येई. तिच्या प्रत्येक कामात सासू खोट काढी.. आमच्या समीरला खाण्याची एवढी हौस पण काय करणार आम्ही राहिलो दूर.. बिचाऱ्याचे खाण्याचे नुसते हाल होताहेत इथे... सायलीला ऐकू जाईल असे उपरोधिकपणे त्या सासऱ्यांना सांगे.. सासरे शांत स्वभावाचे असल्याने त्यांना पटो न पटो तरी बायको म्हणेल ते निमूटपणे ऐकत असे आणि गप्प बसत. ते ऐकून सायलीचे डोळे रडून लाल होई पण नवऱ्याजवळ बोलण्याची देखील सोय नव्हती कारण तो आईच्या शब्दाबाहेर नव्हता.


एव्हाना लग्नाला वर्ष झाले तरी हीची कुस उजवली नाही म्हणून तिला सासरहून वरचे वर टोमणे ऐकायला लागत होते.. हळूहळू समीरचे वागणे तर फारच विचित्र झाले होते.. ऑफिसहून खूप उशिरा तो घरी येत असे आणि हिने जेवायला वाढले की बाहेरूनच जेवून आलो असे सांगून झोपायला निघून जाई.. दोघांमध्ये कसले संभाषण नाही की काही नाही.


हल्ली घरी ड्रिंक्स घेण्याचे पण व्यसन त्याला लागले होते.. कधी कधी एखादा पेग तो घेत असलेला तिला माहित होते पण आता आता त्याचे ड्रिंक्स घेण्याचे प्रमाण फार वाढले होते. ही काही बोलायला गेली की सायलीवर तो चिडे.. तूच याला कारणीभूत आहेस असा तो तिच्यावर उलट दोषारोपण करी.. हे सगळे आता सायलीच्या सहनशीलते पलीकडचे होते.


आपल्या आईबाबांना उगाच कसला त्रास नको या विचारानं ती सगळ निमूटपणे सहन करत होती. बाळ झाल्यावर सगळं ठीक होईल हा विश्वास तिच्या मनात होता. मनातल्या मनात ती देवाला प्रार्थना करी की लवकर एक बाळ आमच्या घरी येऊ दे आणि सगळं ठीक होऊ दे. तिच्या शेजारीच राहणारी तिची मैत्रीण सविता आणि ती एकत्र बाजारात खरेदीला जात. एकमेकींची सुखदुःखे शेअर करत. सायलीला सविताचा खूप आधार वाटे.


सविताला मात्र सायलीची ही दशा पाहून खूप वाईट वाटत असे. ती तिला म्हणत ही, "माझी सासू जरी समजूतदार नसली तरी माझा नवरा मला समजून घेतो म्हणून तर निभावते आहे मी नाही तर एक क्षणही मी घरी राहू शकले नसते. " आणि तू अग, किती सहन करतेस.. समीरने किती भावनिक छळ चालवला आहे तुझा.. त्याला काय हक्क आहे तुझ्याशी असे वागण्याचा... त्याला स्पष्टपणे सांग हे दारूचे व्यसन घरी चालणार नाही.. हल्ली तो रात्री पण बराच उशीर येताना दिसतो.. तुमच्यात सर्व ठीक आहे ना.. तशी रडवेली होऊन सायली तिला म्हणाली, हल्ली आमच्यात कसलच बोलणं नाही की काही नाही.. दोन अनोळखी व्यक्तींसारखे दोन वेगळ्या रूममध्ये आम्ही राहतो.. त्याला मी अगदी नकोशी झालिये हे सांगत सांगता तिचा अश्रूंचा बांध फुटला आणि ती हमसून हमसून रडली.. सविताने अलगद तिला मायेने थोपटले आणि मनाशी काहीतरी निश्चय करून ती घरी गेली.


दुसऱ्या दिवशी सायलीच्या आईला फोन करून सविताने सायलीचे होणारे हाल त्यांना सांगितले आणि सायलीला भेटायला या असेही कळविले. ती तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काहीही सांगत नाहीये पण तिची परिस्थिती मला बघवत नाही.. पार ढासळली आहे ती.. सविताचे बोलणे ऐकून लगेच तिचे आईबाबा दुसऱ्याच दिवशी तिच्या गावी पोहोचले.. आई बाबांना असे अचानक आलेले बघून सायलीला खूप आनंद झाला.. समीर तेव्हा घरी नव्हता.. आईने ही संधी साधून तिला बोलत केलं.. आम्हाला सविताने सगळं सांगितलय तू उद्याच आमच्या बरोबर घरी चलते आहेस असे बाबा तिला स्पष्टपणे म्हणाले.


रात्री समीर नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला. आजही त्याने ड्रिंक्स घेतले होतेच. घरी येताच त्याने सायलीला उपरोधिकपणे बोलणे सुरू केले तेवढ्यात तिचे बाबा समोर आले.. त्यांना बघून तो अजुनच चिडला आणि त्यांचाही त्याने अपमान केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सायलीला घेऊन ते निघाले. घरी आल्यावर सायली आईजवळ मनमोकळं रडली.. आईला पण आपल्या लेकीचे हाल बघून खूप वाईट वाटले. त्यांना वाटल, आपणच घाईच केली हिच्या लग्नाची.. मुलाची नोकरी शिक्षण बघितलं पण घरच्यांचा स्वभाव मात्र आपल्याला कळला नाही.. पण आता अजून आपल्या मुलीला त्रास सहन करू द्यायचा नाही याची त्यांनी खूणगाठ बांधली.


इकडे आठ दिवस झाले सायलीला घरी येऊन आणि समीरचा ना फोन ना कसले बोलणे.. उलट ती आपणहून घर सोडून गेली आहे तर तिनेच सासरच्यांची माफी मागावी आणि मग घरी यावे असे सासरहून निरोप आला. ते बघून सायलीचे बाबा संतापले आणि त्यांनी कळविले की, "तुमच्या मुलाने तिची माफी मागावी त्याच्या गैरवर्तन बद्दल.. आणि तरीही तिने परत यायचे की नाही हे तिचे तिचं ठरवणार. आमची मुलगी तिचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे."


सायलीला त्या नरकयातना भोगायला परत जायचे नव्हते... तिने समीरला डिव्होर्स द्यायचा निर्णय घेतला.. आईबाबा तिच्या निर्णयाशी ठाम राहिले.. आणि त्यांनी तसे तिच्या सासरी कळविले. पण पोटगी द्यावी लागणार म्हणून ते डिव्होर्स द्यायला तयार होत नव्हते.. त्यांचा हा मनसुबा ओळखून शेवटी त्यांनी मुलाकडून काहीही न घेता डिव्होर्स ची पुढची सगळी प्रोसिजर लवकरात लवकर पूर्ण केली कारण त्यांना सायलीला या त्रासातून लवकर मोकळे करायचे होते.


इकडे सायलीला काही महिने लागले त्या धक्क्यातून सावरायला.. पण हळूहळू तिने हा बदल स्वीकारला आणि मग बीएड ला एडमिशन घेऊन कोर्स पूर्ण केला आणि शाळेत टीचर म्हणून नोकरीला लागली. आई बाबांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि सविताच्या प्रोत्साहनामुळे ती त्या सर्व भयानक परिस्थितीतून बाहेर पडू शकली. आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली.. आज एक आवडती शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यां मध्ये तिची ओळख होती. आणि पुढे मग तिच्याच शाळेत नोकरीला असलेल्या एका होतकरू, प्रामाणिक शिक्षकाशी ती प्रेम बंधनात आणि पुढे विवाह बंधनात अडकली.. या बदलाने तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आणि तिच्या आयुष्यात नव्याने प्रेमाचे सप्तरंगी इंद्रधनु फुलले.


(लग्नानंतर असा अनुभव काही मुलींच्या वाट्याला येतो...तेव्हा ते मूकपणे सहन करत कुढत आयुष्य जगायचे की आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून आपल्या आयुष्यात चांगला बदल घडवायचा हे ज्याच्या त्याच्या हातात असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला की आयुष्य जगणे सुकर होते.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational